Mumbai News: एकीकडे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच राजकीय क्षेत्रातून एक मोठी दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालं आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या.शालिनीताई पाटील यांनी मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आवाज उठवणाऱ्या महिला राजकारणी म्हणून ओळख असलेल्या डॉ.शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांची प्राणज्योत शनिवारी (ता.20 डिसेंबर) मालवली. तसेच आरक्षणासाठी शालिनीताई यांनी आपल्या खुर्चीचीही तमा बाळगली नाही. राजमाता जिजाऊ यांच्यावर जगात पहिला चरित्र ग्रंथ लिहणाऱ्या लेखिका म्हणजे शालिनीताई पाटील होत्या. शालिनीताई यांनी नेहमीच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला होता.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या शालिनीताई दुसऱ्या पत्नी होत्या. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शालिनीताई पाटील यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एक कणखर महिला राजकारणी म्हणून ओळख होती. पण आता त्यांच्या निधनानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. पण शालिनीताई वसंतदादांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या.
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरेनी शालिनीताईना महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा उल्लेख केला होता.वसंतदादाच्या निधनानंतर व मुलगा चंद्रकांत पाटील यांच्या अपघाती निधनाने शालिनीताई एकाकी झाल्या. पुढे शालिनाताई सातत्यानं पक्षांतर करत राहिल्या.
१) सन १९५१ : राष्ट्रसेवा दलाची क्रियाशील कार्यकर्ती म्हणून राजकीय जीवनाची सुरूवात. सातारारोडची शाखा प्रमुख.
२) मार्च १९५७ : पुणे विद्यापीठातून बी.ए. ऑनर्स राजाराम कॉलेज कोल्हापूर.
३) एप्रिल-१९५७ : काँग्रेस पक्षाचे तिकीटावर जिल्हा लोकल बोर्ड सांगलीची निवडणूक लढविली आणि जिंकली. जिल्हा लोकल बोर्डाचे नंतर जिल्हा परिषदेमध्ये रूपांतर झाले.
४) १९६३ : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून एल. एल. बी. सर्वप्रथम.
५) १९६४ अखेर जिल्हा परिषद सांगलीचे सदस्य म्हणून कामकाज.
६) सन १९६२ ते ६४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला फ्रंटची प्रमुख.
७) १९६४ ते ७२ सेक्रेटरी टू वसंतरावदादा पाटील.
८) १९७१ भारत देशातील महिलांची सहकारी बँक श्री. लक्ष्मी महिला सहकारी बँक लि.. सांगलीची स्थापना केली, गेली ३२ वर्ष बँक यशस्वीरित्या कार्यरत.
९) १९७४ मा. वसंतदादा पाटील व शंकरराव चव्हाण यांनी एकत्र बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा सुसंवाद घडविणे बाबत विशेष प्रयत्न.
१०) १९७४ महाराष्ट्रात राज्यभर दौरा करून राजमाता जिजाऊसो यांचे जीवन चरित्रावर संशोधन, अभ्यास व लेखन.
११) १९७७ राजमाता जिजाऊसाहेबांच्या जीवनावरील ऐतिहासिक ललीतचरित्र ग्रंथाचे यशवंतराव चव्हाण अर्थमंत्री भारत सरकार यांचे शुभहस्ते श्री शिवाजी मंदिर मुंबई येथे प्रकाशन.
१२) १९७७ ते ७९ काँग्रेस संघटनेत विविध पातळीवरील जबाबदारी सांभाळली.
१३) १९७९ एस् काँग्रेसमधून बाहेर पडून आय् काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय.
१४) जानेवारी १९८० सातारा लोकसभा मतदार संघातून काँग्रेस (आय) पक्षाची उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्याचवेळी कोरेगांव-खटाव तालुक्याकरीता सहकारी साखर कारखाना काढण्याचा संकल्प केला.
१५) जून १९८० सांगली मतदार संघातून काँग्रेस आय् पक्षाची उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली आणि जिंकली.
१६) १९८२ अंकलखोप, जि. सांगली येथे मा. वसंतदादा पाटील आणि मा. यशवंतराव चव्हाण मनोमिलनासाठी यशस्वी प्रयत्न.
१७) जून १९८० ते ऑक्टोबर १९८१ - महसुल व पुर्नवसन मंत्री म्हणून महाराष्ट्राचे मंत्रीमंडळात काम केले. या कालावधीत - वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट या संस्थेस २०० एकर शासकीय जागा दिली व संस्थेच्या कामाचा शुभारंभ केला. व्ही.एस.आय. ही आज एक साखर कारखानादारीला मार्गदर्शक म्हणून काम करणारी अग्रगण्य संस्था आहे.
१८) ऑक्टोबर १९८२ ते फेब्रुवारी १९८३ - महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळात सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.
१९) मार्च १९८३- स्व. श्री. वसंतदादा पाटील यांचेसाठी आमदारकीचा राजीनामा देवून सांगली विधानसभेची जागा रिक्त केली.
२०) नोव्हेंबर १९८३- सांगली लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूक लढविली व जिंकली.
२१) नोव्हेंबर १९८३ ते नोव्हेंबर १९८४- खासदार म्हणून कामकाज केले. या कालावधीत साखर कारखान्यांच्या लायसेन्सींग पॉलिसी संदर्भातील भारत सरकारचे धोरण बदलले जावे म्हणून यशवंतरावजी चव्हाण यांचे नेतृत्वाखाली खास प्रयत्न केले व जिथे ऊस तेथे कारखाना देणेचे नवे धोरण निश्चित करणेकामी अग्रक्रमाने पुढाकार घेतला व तसे धोरण जाहीर झाले.
या धोरणामुळेच कोरगांव-खटाव तालुक्यासाठी सहकारी साखर कारखान्यास इरादापत्र मिळण्याचा मार्ग खुला झाला. खासदार पदाचे कालावधीतच विषेशतः सांगली जिल्ह्याचा दुष्काळी भाग व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग यावर लोकसभेमध्ये पहिले भाषण केले. त्यानुसार ताकारी योजना मंजूर झाली. या योजनेचा भूमीपूजन समारंभ देवराष्ट्रे या गांवी यशवंतरावजी चव्हाण व मी असा दोघांचे शुभहस्ते संपन्न झाला.
२२) १९८४ ते १९८९- कोरेगांव - खटाव तालुक्यासाठी सहकारी साखर कारखाना काढण्याचे प्रयत्न केले. सन १९८९ मध्ये कारखान्यास इरादापत्र मिळाले.
२३) १९८७- महाराणी ताराराणी या विषयावर प्रबंध लिहून मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळविली.
२४) १९८८- श्रीशिवाजी मंदिर मुंबई येथे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांचे शुभहस्ते महाराणी ताराराणी हा इंग्रजी प्रबंध प्रसिध्द झाला.
२५) १९८९ ते १९९७- कोरेगांव - खटावचे श्रीजरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासंदर्भात कोर्टमेंटर. दोन वेळा सुप्रिम कोर्ट, शासकीय अर्थसहाय्य मिळवणे, शेअर्स जमविणे, कर्ज उभारणी, शासकीय थकहमी इत्यादीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा व त्यात यश मिळवले.
२६) १९९८-९९- श्रीजरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लि., ची उभारणी पुर्ण व ट्रायल सिझनची यशस्वी पूर्तता.
२७) १९९२- स्व. सुपूत्र चंद्रकांत पाटील यांचे नावाने सातारारोड येथे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सुरू केले.
२८) सप्टेंबर १९९९- कोरेगांव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तर्फे निवडणूक लढविली आणि जिंकली.
२९) जानेवारी २००१- सिंदखेडराजा येथे पहिल्या जिजाऊ पुरस्काराने सन्मानीत.
३०) ८ ऑगस्ट २००१- राजमाता जिजाऊ या ललीत चरित्र ग्रंथाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन. मा. नाम. नारायणरावजी राणे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शुभहस्ते संपन्न.
३१) २००२ - श्रीजरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा श्रीजरंडेश्वर उद्योग समुह व्हावा म्हणून प्रयत्नशील. त्याचाच भाग म्हणून पाठपुरावा करून.
१) डिस्टीलरी प्रकल्प.
२) इथेनॉल प्रकल्प यासाठीची लायसेन्स मिळविली.
३) नियोजित चेतक कृषी अवजारे प्रकल्पाचे काम (कार्यालयीन) सुरू.
४) मेडिकल कॉलेजकरीताचा प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू आहे.
५) जून २००४ पासून कोरेगांव येथे कॉलेज सुरू करण्याचे प्रयत्न.
३२) वसना आणि वांगणा प्रकल्प- कोरेगांव तालुक्याच्या उत्तर व उत्तर पुर्व दुष्काळी भागासाठी रू. १८० कोटीच्या वसना व वांगणा उपसा जलसिंचन योजना मंजूर करून घेतल्या. या योजनामुळे २०,००० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून सुमारे ४० गांवे लाभक्षेत्राखाली येणार आहेत. दोन्ही योजनांना प्रशासकीय मान्यता मिळवली. आराखडे तयार झाले. योजनांची कामे प्रगतीपथावर असून या सर्व बाबीकरीता सन १९९५ पासून प्रयत्नशील आहोत. खाजगीकरणांच्या माध्यमातून वरील योजना करून घेण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.