Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Vidhan parishad election : विधान परिषदेचे रण तापले! मविआमध्ये रस्सीखेच, उद्धव ठाकरेंसाठी पडद्याआड मोठ्या घडामोडी? काय सांगतोय गणिताचा हिशोब?

MLC News : विधान परिषदेच्या 9 जागासाठी विधानसभेतील 286 आमदारांना मतदानाचा अधिकार असणार असून त्यामुळे विजयाचा कोटा काय असणार? यावरून नंबर गेम ठरणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : विधान परिषदेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदारांच्या आमदारकीची मुदत 13 मे 2026 रोजी संपणार आहे. त्यामुळे या नऊ जागेसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यातच मंगळवारी विधिमंडळात या निवृत्त होत असलेल्या नऊ सदस्यांचे शेवटचे अधिवेशन असल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जुगलबंदी रंगली होती. त्यातच आता विधान परिषदेच्या 9 जागासाठी विधानसभेतील 286 आमदारांना मतदानाचा अधिकार असणार असून त्यामुळे विजयाचा कोटा काय असणार? यावरून नंबर गेम ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येणार असल्याने या जागेवर उद्धव ठाकरेंना पुन्हा संधी दिली जाणार का? अन्य कोणाची वर्णी लागणार यावरून सस्पेन्स वाढला आहे.

येत्या काळात रिक्त होत असलेल्या विधानपरिषदेतील नऊ जागा विधानसभेतील आमदारातून निवडून द्यावयाच्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या नऊ जागेसाठी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे. विधानपरिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह कार्यकाळ संपत असलेल्या नऊ आमदारांना निरोप देण्यात आला. त्यामध्ये भाजपचे चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर काँग्रेसचा एक सदस्य निवृत्त होणार आहे.

निवृत्त होत असलेल्या या नऊ आमदारांची निवड 14 मे 2020 रोजी करण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे (BJP) चार, एकत्रित शिवसेनेचे दोन, एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन व एक काँग्रेसच्या आमदाराची वर्णी लागली होती. त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या डॉ.नीलम गोऱ्हे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे अमोल मिटकरी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर हे सदस्य निवृत्त होत आहेत.

विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या या नऊ सदस्यांपैकी कोणते सदस्य पुन्हा निवडून येणार याची उत्सुकता लागली आहे. विधानसभेत सध्यस्थितीत संख्याबळ पाहता 286 आमदार आहेत. दोन जागा रिक्त आहेत. त्या जागेसाठी पॊटनिवडणूक होत आहे. तर विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांची आवश्यकता आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार पहिले तर महायुतीमधील भाजपचे 131 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे पाच आमदार निवडून येतील. पाचव्या आमदरासाठी त्यांना नऊ मतांची आवश्यकता असणार आहे. त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली अधिकची बारा मते त्यांना मिळू शकतात.

एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची संख्या 57 असल्याने त्यांचे दोन आमदार सहज निवडून येऊ शकतात. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा एक आमदार निवडून येऊन त्यांची बारा मते शिल्लक राहू शकतात. तर दुसरीकडे खरी रस्सीखेच महाविकास आघाडीकडे असणार आहे. आघाडीतील तीन पक्षाचे एकत्रित आमदारांची संख्या 46 असली तरी एक आमदार सहज निवडून येऊ शकतो तर दुसरा आमदार निवडून येण्यासाठी त्यांना दहा मतांची आवश्यकता भासणार आहे. तेवढा आकडा गाठणे अवघड असणार आहे.

महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत तर काँग्रेसचे 16 आमदार तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार आहेत. एकूण संख्याबळ 46 इतके होत असल्याने दोन जागा निवडून येण्यासाठी 56 मतांची आवश्यकता आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार जादा असल्याने त्यांचा या जागेवर दावा आहे. विशेषतः नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जागा सोडण्यासाठी ठाकरे यांच्या शिवसेनेने माघार घेतली होती. त्याचवेळी विधानपरिषदेची ही जागा उद्धव ठाकरे यांना सोडण्यासाठी चर्चा झाली असल्याचे समजते.

ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका निर्णायक

महाविकास आघाडीतील ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्रित आल्यास आवश्यक 28 चा आकडा गाठणे शक्य होणार आहे. त्याशिवाय ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस एकत्र आल्यासही उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र, काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्रित आल्यास त्यांचा आकडा 28 होत नसल्याने उमेदवार निवडून येणार नसल्याने ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.

एप्रिल महिन्यात होणार निवडणुकीची घोषणा

या आकडेवारीनुसार भाजपचे पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर महाविकास आघाडीचा एक आमदार निवडून येऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एप्रिल महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काळात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळणार आहे.

काँग्रेसच्या वाट्याला काय येणार?

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी जागा सोडावी लागली होती तर आता विधानपरिषदेची जागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोडावी लागणार असेल तर काँग्रेसच्या वाट्याला काय येणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीन पक्षात काय फॉर्म्युला ठरणार याची उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT