मराठवाडा

Dharashiv LokSabha : धाराशिव लोकसभेसाठी उमरग्यातील भूमिपुत्रांनी थोपटले दंड !

अविनाश काळे

Loksabha Election: आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरु केली आहे. धाराशिव लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात असून निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षाची मोर्चेबांधणी सुरु आहे. धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याच पक्षाने उमेदवारांची नावे निश्चित केलेले नसले तरी भूमिपूत्र प्रा. रवींद्र गायकवाड, बसवराज पाटील, प्रा. सुरेश बिराजदार, बसवराज मंगळुरेंची नावे चर्चेत आल्याने उमरगा तालुका केंद्रस्थानी आला आहे.

बार्शी ते कासार शिरशी असा व्यापक मतदारसंघाचा समावेश असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील 63 गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात उमरगा तालुक्यातील भूमिपूत्रांची नावे नेहमी चर्चेत राहिले आहेत. शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांचा 2009 च्या निवडणूकीत माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून पाच हजार मतांनी निसटता पराभव झाला होता तर 2014 च्या निवडणूकीत प्रा. गायकवाड यांनी मोदी लाटेत डॉ. पाटील यांचा दोन लाखाहून अधिक मताने पराभव केला होता.

प्रभावी वक्तृत्वशैलीने सर्वांपर्यंत पोहोचलेले प्रा. गायकवाड यांच्याबाबत मतदारात सहानभूती होती. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादानंतर प्रा. गायकवाड देशभरात चर्चेत आले होते. निवडून आल्यानंतर नॉट रिचेबलच्या शिक्क्याने ती सहानभूती कमी झाल्याने तिसऱ्या टर्मसाठी त्यांना उमेदवारी मिळू शकली नसल्याची अशी चर्चा होतेय. मात्र त्याला हा एकच मुद्दा कारणीभूत नव्हता. तर तत्कालिन स्थितीत शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आणि प्रा. गायकवाड यांचा उमेदवारीबाबतचा गाफिलपणाही नडला होता. ओम राजेनिंबाळकर (om rajenimbalkar ) यांनी उमेदवारीत बाजी मारत विजय मिळवला होता.

प्रा. रवींद्र गायकवाड लोकसभेसाठी इच्छूक

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी डावल्यानंतर प्रा. गायकवाड राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. परंतु त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेबाबत नागरिकांमध्ये चांगली भावना आहे. पण ती पुन्हा टिकवण्यासाठी ते स्वतः राजकारणात सक्रिय झालेले दिसताहेत, त्यांनी आपण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. स्पष्टवक्तेपणा, दुसऱ्याबाबत आकस नसलेला, आपल्या शब्दाने सहज होणारे काम करत कोणतीही अपेक्षा न करणारा राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. कदाचित महायुतीतून शिंदे गटाला धाराशिव लोकसभा सुटली तर ते उमेदवार असतील. पण त्यांच्यासाठी ही निवडणूक सहज व सोपी नाही. उमेदवार असल्याचे जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावरच्या त्यांच्याबद्दलच्या कमेंट बरेच काही सांगून जातात.

भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही चर्चेत !

लोकसभेसाठी भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे, उमेदवार कोण यापेक्षा त्यांच्या वातावरण निर्मितीच्या प्रयत्नाचे कौतुक करायला हवे. आमदार राणाजगजितसिंह पाटील लोकसभेसाठी फारसे इच्छुक दिसत नाहीत. मुरुमचे रहिवाशी बसवराज मंगळुरे यांनी मतदारसंघात स्वतःची ओळख निर्माण करत मतदारांशी संवाद साधताहेत, ते उमेदवार होतील की, नाही हा नंतरचा प्रश्न असला तरी सध्या भाजपाची वातावरण निर्मिती तरी होत आहे. उमरग्याचे भूमिपूत्र, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांचे नावही ऐनवेळी चर्चेत येऊ शकते.

राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश बिराजदार यांचे नाव आघाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) त्यांच्या पाठीशी असतील, शिवाय महायुतीतील भाजप, शिंदे गट शिवसेना यांचे सहकार्यही मिळेल. परंतु निवडणुकीला सामोरे जाताना येणाऱ्या अडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठी प्रा. बिराजदार यांना मोठी कसरत करावी लागेल. राष्ट्रवादीत ऐनवेळी उमेदवारीबाबत वेगळेच खलबते होऊ शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसकडून बसवराज पाटील यांचे नाव चर्चेत

महाविकास आघाडीतून काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील तुल्यबळ उमेदवार ठरतील, त्यांचा राजकारणातला अनुभव प्रदीर्घ आहे. उमरगा व औसा विधानसभा निवडणुकीची प्रत्येकी तीन वेळा त्यांनी निवडणूक लढवली आहे, त्यात ते तीन वेळा विजयी झाले आहेत. सहकार, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम सर्वश्रुत आहे. जिल्हा काँग्रेस समितीच्या ठरावात लोकसभा निवडणुकीसाठी बसवराज पाटील यांचे एकमेव नाव आहे. प्रदेश काँग्रेस समितीच्या ठरावातही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. दरम्यान पाटील तुल्यबळ उमेदवार होऊ शकतात मात्र महाविकास आघाडीतुन उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्याच उमेदवारीला प्राधान्य मिळेल असे वाटते.

शिष्याचे पद गुरुकडे !

माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यात गुरु-शिष्याचे नाते आहे. उमरगा विधानसभा आरक्षित झाल्यानंतर 2009 पासुन सलग तीन वेळा चौगुले लोकप्रतिनिधी आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर चौगुले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिले. प्रा. गायकवाड मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले, तेव्हा आमदार चौगुलेंची चांगलीच कोंडी झाली. ती कोंडी सोडवण्यासाठी बंद खोलीत खलबते झाले अन् प्रा. गायकवाड 'यू टर्न' घेत शिंदे गटाशी एकनिष्ठ झाले. प्रा. गायकवाड यांच्या राजकीय पुर्नवसनासाठी लोकसभा निवडणुकीचा पर्याय देण्यात आला आहे. उपनेते असलेल्या चौगुलेंवर धाराशिव व लातूर लोकसभा निवडणुकीच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, आता शिष्याकडे असलेले पद प्रा. गायकवाड यांच्याकडे आल्याने बदलत्या राजकारणाची चर्चा होतेय.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT