Ashok Chavan, Amit Deshmukh sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024 : नांदेडात आता 'अशोका'ची पतझड; अन् वसंत ऋतू सुरू...

Jagdish Pansare

Nanded Loksabha News : लोकसभेच्या प्रचाराला मला नांदेडला यावं लागेल असं कधी वाटलं नाही. पण 'तुमने पुकारा और हम चले आये, जान हथेली पे ले आये रे' असे म्हणत काँग्रेसचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख यांनी चांगलीच टोलेबाजी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत अमित देशमुख यांनी वसंत ऋतूचा उल्लेख करत अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला.

'अशोका'ची पतझड झाल्यावर वसंत ऋतू सुरू होतो, असे म्हणत अमित देशमुख यांनी वसंत चव्हाण यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. वसंत चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तळपत्या उन्हात नांदेडमध्ये महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर गुरुद्वाराजवळील मैदानावर झालेल्या सभेत अमित देशमुख यांनी लातूर कायम नांदेडच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही दिली.

भाषणाच्या सुरुवातीलाच अमित देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर चिमटा काढला. लोकसभेच्या प्रचाराला मला नांदेडला यावं लागेल असं कधी वाटलं नाही. आदरणीय अशोक चव्हाण होते, पण ते आज काँग्रेस पक्षात नाहीत. आज वसंतराव चव्हाण साहेब आहेत. त्यामुळे नांदेडचा सुरू झालेला राजकीय प्रवास चव्हाणांपासून चव्हाणांपर्यंत, म्हणजेच आदरणीय शंकरराव चव्हाणांपासून वसंतराव चव्हाणांपर्यत या जिल्ह्यात होतोय असं मी म्हणालो तर चुकीचे होणार नाही.

नांदेडची निवडणूक आता सामान्य माणसाच्या हाती गेली आहे. ही निवडणूक सामन्य विरुद्ध धनदांडग्यांमध्ये आहे. अशा लढायांमध्ये सामान्य माणूस जिंकतो. मराठवाड्याचे आधुनिक भगीरथ म्हणून आपण शंकरराव चव्हाण यांना ओळखतो. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा विचार आपण बळकट करण्याचं काम केलं. आता तीच जबाबदारी आपल्या प्रत्येकावर येऊन ठेपली आहे. ही भूमी क्रांतीकारकांची आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा याच नांदेडनं दिला. ही गौरवशाली परंपरा मराठवाड्यानं अबाधित ठेवली आहे.

पण, आज सत्ताधारी त्याला धक्का पोचवण्याचा प्रयत्न करत, असल्याची टीका अमित देशमुख यांनी राज्यातील महायुतीच्या सरकावर केली. शेतकऱ्याच्या आत्महत्या, त्याच्या मालाला भाव नाही, उत्पन्नात दुप्पटीनं वाढ करू सांगितले, ते तर दूरच पण रास्त भावही मिळंत नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतीला वीज मिळत नाही, मजुरी वाढली अशी दयनीय अवस्था ग्रामीण भागातल्या आमच्या मतदाराची झाली आहे. हे चित्र बदलायचे असेल तर काँग्रेसला साथ द्या. वसंत चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले.

नांदेड-लातूरचे ऋणानुबंध इथून पुढेही जपायचे आहेत. विलासरावांनी निधी देताना कधी पक्ष पाहिला नाही, की अटी घातल्या नाहीत. या राज्याची एक गौरवशाली राजकीय परंपरा आहे. फोडाफोडीचे राजकारण त्यांनी कधी केले नाही, असे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. सामान्य माणसाला फोडाफोडीच्या राजकारणाचा वीट आलायं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदार आता मतदानाची वाट पाहतोय. नांदेड लोकसभेचा निकाल लागला, वसंतराव चव्हाण निवडून आले, कारण सामान्य माणूस महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला. वसंत ऋतू सुरू आहे, नियतीसुद्धा आपल्यासोबत आहे. अशोक पतझड झाल्यानंतर वसंत ऋतू येतो, असा टोला त्यांनी अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर लगावला.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT