Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून करण्यात आला. यामध्ये पोलीस यंत्रणेने दीडशेहून अधिक जणांची चौकशी करीत आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे या हत्या प्रकरणाला सहा महिन्याचा कालावधी झाला असला तरी या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. आंधळेचा शोध घेऊन तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी देशमुख कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आता आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
या घटनेला सहा महिने झाले असून संतोष देशमुख (Santosh Desmukh) हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. आतापर्यंत या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेला सोमवारी सहा महिने पूर्ण झाले असून या प्रकरणातील फरार असलेला आरोपी आंधळेला त्वरित अटक करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी देशमुख कुटुंबाने केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीना मोक्का लावण्यात आला आहे.
अटकेसाठी मोठे पाऊल उचलणार : धनंजय देशमुख
या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेविषयी आतापर्यंत आम्ही ज्या ज्या वेळी प्रशासनाला विचारले आहे, त्यावेळी प्रशासनाने संपर्कात येत नसल्याचे सांगितले आहे. पण हे कारण आम्हाला जमणार नाही. कृष्णा आंधळेची अटक महत्त्वाची आहे. त्यासाठी आम्ही मोठे पाऊल उचलणार असल्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
न्याय मिळाला पाहिजे : वैभवी देशमुख
या दुखातून सावरण्याचा प्रयत्न आमचं कुटुंब करत आहे. परंतु सर्वांनी दिलेल्या साथीमुळे हा लढा येथेपर्यंत उभारला आहे. आम्ही सध्या दु:ख बाजूला ठेवून वडिलांना न्याय मिळवण्यासाठी वाटेल ते पाऊल उचलायला तयार आहे. माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी वैभवी देशमुखने केली आहे.
आरोपीना फाशीची शिक्षा मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी ते खून हे एकच कनेक्शन समोर आले आहे. सगळ्या यंत्रणेला माहीत आहे आरोपी कोण आहे, टोळी कोणाची, टोळीचा मालक कोण? सर्वांना माहीत आहे. त्यासोबतच आरोपी बचावासाठी जो केविलवाणा प्रयत्न करत आहे तो कधीही यशस्वी होणार नाही. त्यांना फाशीची शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.