Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

धमक असेल तर MIDC कोरेगावला नेऊन दाखवा... जयकुमार गोरेंचे रामराजेंना प्रतिआव्हान

विशाल गुंजवटे

बिजवडी : मी क्रियाशील आणि कर्तृत्ववान आहे, म्हणूनच म्हसवडची एमआयडीसी मंजूर झाली. हा प्रकल्प माझ्याच माणमध्ये होणार आहे. रामराजेंच्यात धमक आणि राजाचे रक्त असेल तर त्यांनी एमआयडीसी कोरेगाव तालुक्यात नेऊन दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंना दिले आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार गोरेंच्या निष्क्रियपणामुळे म्हसवड एमआयडीसी कोरेगावला गेली, धमक असेल तर त्यांनी ती परत आणावी असे आव्हान दिले होते. त्यावर बोलताना आमदार गोरेंनी रामराजेंना प्रतिआव्हान दिले आहे.

आमदार गोरे म्हणाले, रामराजेंचे वय झालं आहे. 'साठी बुध्दी नाठी'च्या पलीकडे ते गेले आहेत. त्यांच्या मेंदूचे संतुलन बिघडले आहे. अनेक वर्षे सत्तेत राहून त्यांनी मंत्रीपदे भोगली आहेत. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. पवार साहेबांनी त्यांना कायम सत्तेच्या सिंहासनावर ठेवले. मात्र हे महाभाग सत्ता गेली की बाहेर तोंड काढतात.

मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. आताही विधान परिषदेवर निवड झाल्यावर सत्ता गेली की लगेच त्यांनी भाजप किंवा शिंदे गटात जाण्याचे प्रयत्न केले होते. आपण सत्तेशिवाय रहायचे का. आपल्यावर केसेस होतील, आपल्याला तुरुंगात टाकतील, आपल्यावर ईडीची कारवाई होईल, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा उद्योग केला होता. अशा एहसान फरामोश माणसाने एमआयडीसीबाबत माझ्यावर बोलणे हस्यास्पद आहे.

रामराजेंनी आत्तापर्यंत एमआयडीसी असेल तिथे जमिनी खरेदी करुन कोट्यवधींची माया जमविली आहे. कोरेगाव तालुक्यातही त्यांनी जमिनी खरेदी करुन ठेवल्या आहेत. एमआयडीसी तिकडे झाली तर ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शेकडो कोटी मिळविण्याचा डाव होता. अजित दादांसोबतच्या बैठकीत त्यांनी म्हसवडबाबत खोटी प्रतिकूल माहिती देवून एमआयडीसी पळविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले.

कोरेगाव भागातील लोकांनी आम्हाला भूमिहीन व्हायचे नाही, एमआयडीसी आमच्याकडे नको असे सांगून रामराजेंना अक्षरशः शिव्या दिल्या. लोक त्यांच्या अंगावर गेले. ज्या आयएएस अधिकाऱ्याने एमआयडीसीसाठी प्रयत्न केले, असे रामराजे खोटेच सांगतात. तो अधिकारी आयुक्त असताना माणमध्ये दोन गुंठ्याचा प्रकल्प मार्गी लावू शकला नाही. ऐऱ्यागैऱ्यांची नावे घेऊन ते काहींची लाल करायचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही आमदार गोरेंनी लगावला.

राष्ट्रवादीशी एहसान फरामोशी...

ज्या राष्ट्रवादीने रामराजेंना कायम सत्तेच्या सिंहासनावर बसविले त्या राष्ट्रवादीशी एहसान फरामोशी करुन त्यांनी सत्ता गेली की दोन वेळा भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशी प्रवृत्ती भाजपमध्ये नको म्हणून मी आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

माझ्या तीन मागण्या होत्या...

भाजपमध्ये जाताना मायणी, कुकुडवाडसह ३२ गावे तसेच जिहे कठापूर वाढीव योजेनेला सुधारित प्रशासकिय मान्यता देऊन उत्तर माणमधील ३२ गावांना पाणी आणि माणधील एमआयडीसी प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली होती. या तीन मागण्या आता पूर्णत्वाकडे निघाल्या आहेत. माझ्या मतदारसंघातील कसपटही मी बाहेर जाऊ देणार नाही त्यामुळे एमआयडीसी तर नाहीच नाही, असा विश्वास आमदार गोरेंनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT