Satara Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political : सातारा, माढ्याचा खासदार मोदींच्याच विचारांचा...

Umesh Bambare-Patil

Satara Political : पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाला पुढे नेऊ शकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देश जगभरात एक शक्ती म्हणून उभा राहिला. हे घडत असतानाच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे चाखायला मिळू लागली. म्हणून देशाचे नेतृत्व तिसऱ्यांदा मोदी यांच्या हाती देण्यासाठी सातारा आणि माढ्याचा खासदार मोदींच्या विचारांचाच असेल, असा नारा देत येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर महायुतीच्यावतीने रविवारी संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोकसभेचे रणशिंग फुंकण्यात आले.

विरोधकांवर फारशी टीका न करता मोदींच्या नेतृत्वाची आवश्यकता आणि गेल्या दहा वर्षात झालेल्या विकासकामांच्या मुद्द्यांवर सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या भाषणात दिलेला भर हे आजच्या सभेचे वैशिष्ट्य ठरले. साताऱ्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला असलेली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची साथ राज्याच्या विकासासाठी कशी गरजेची आहे, हे सांगत सर्वच नेत्यांनी उमेदवार कोणीही असू द्या, मोदींचे नेतृत्व भक्कम करण्यासाठी त्याला निवडून आणण्याचा निर्धारही केला.

मेळाव्यात बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, आपला आमदार, आपला खासदार यांच्या माध्यमातून आपली कामे मार्गी लागली पाहिजेत अन आजचा महायुतीचा मेळावा त्याच पद्धतीने आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म सम भाव ही संकल्पना आणली अगदी आज त्याच पद्धतीने मोदीनी आणली आहे. यामुळेच आज देश एक वेगळ्या उंचीवर गेला आहे.

उमेदवार कोण आहे हे महत्वाचे नाही पण तो मोदी यांच्या पाठीशी राहणारा असेल. 48 च्या 48 खासदार हे मोदी यांच्या विचारांचे असतील. प्रत्येकाला वाटत असेल की स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलो असेल पण नाही जनतेला केंद्र बिंदू मानून आम्ही एकत्र आलो आहे. मराठा आरक्षणामध्ये इतर राज्याने वाढ केली तर आपल्या राज्याने ही पुढाकार घेतला पाहिजे. अगदी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आपल्याला आरक्षण देता येऊ शकेल.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, तिसरी अर्थव्यवस्था म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते नरेंद्र मोदी होय. त्यांना 2024 मध्ये पंतप्रधान करायचे आहे म्हणून एकत्र आलो आहे. शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे निर्णय असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल याचे निर्णय हे मोदींनी घेतले आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदी शपथविधी होईपर्यंत आम्हाला माहीत नव्हते. पण दिल्ली भाजपने सातारा जिल्ह्याच्या माणसाला मुख्यमंत्री केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

44 हजार कोटींची मदत देणार आपलं सरकार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार अनुदान देण्याचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ मध्ये घेवून 17 हजार कोटी देण्याचा निर्णय झाला. महायुतीच सरकार आल्यानंतर महिलांना टक्के मोफत प्रवास देण्याचा निर्णय घेतला अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरे यांच सरकार असताना एक रुपया ही वाढवता आला नाही.

प्रतापगड, सैनिक स्कुल, मेडिकल कॅालेजच्या कामांना वेग दिला. यामध्ये 200 कोटींचा निधी प्रतापगड हा पुन्हा दिसण्यासाठी दिला. प्रतापगड येथील अतिक्रमण हटवण्याच काम या सरकारच्या काळात झाले आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील दोन्ही खासदार यांना निवडून द्यायचे आहे.

जयकुमार गोरे म्हणाले,  कार्यकर्त्यांचा मेळावा हा नेहमी सभागृहात होत असतो पण आज गांधी मैदान येथे होत आहे. मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेतील त्यावेळी त्यांच्यासमवेत सातारचा खासदार असला पाहिजे. कोरोनाच्या काळात सावरण्याच काम मोदींनी केले आहे. आज आपण बाहेर पडलो ते मोदींनी दिलेल्या लसीमुळे. सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे येत आहे. आज भारत जगात मजबूत म्हणून उभा आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आज केंद्र व राज्यसरकारच्या माध्यमातून लोकांना, शेतकऱ्यांना लाभ होत आहे. उद्या कातकरी समाजाच्या लोकांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. माढा, सातारा लोकसभा मतदार संघात भाजपचा खासदार होण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. आजपर्यंत आपण वेगवेगळे लढलो असलो तरी आज देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. 

कोणत्याही लाभार्थीच्या योजनेचे पैसे हे त्याच्या खात्यावर थेट जमा होऊ लागले आहेत. आज साखर कारखानदारी पुढे जे प्रश्न होते ते काँग्रेसच्या काळातही होते ते सुटले नाहीत. पण भाजप सरकारच्या काळात ते सुटले ते केवळ अमित शहा यांच्यामुळे. साखर ही 3100 रुपयांच्या खाली न विकण्याचा निर्णय त्यानी घेतला त्यामुळे त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.

मराठा आरक्षण हे हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकल नाही. कारण त्यावेळी नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस नव्हते. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे निश्चितपणे निर्णय घेतील. आज सातारा शहराचा विचार केला तरी 'अ' वर्ग नगरपालिकेला 25 कोटी रुपये फडणवीस यांनी दिले आहेत.

एवढी वर्षे राम हा झोपडीत होता पण आता मंदिरात जाणार आहे. सातारा लोकसभाची उमेदवारी ज्यांना मिळेल त्यांच्या पाठीमागे सर्वांनी ताकत दिली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला कोणी ही हात लावणार नाही. देशाचा पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असतील ही खूणगाठ प्रत्येकाने बांधली पाहिजे.

मकरंद पाटील म्हणाले की, गेल्या पाच सहा महिन्यांपूर्वी अजित दादा यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी द्विधा अवस्थेत होतो. पण राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. या जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे नेतृत्व करत आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून देवेंद्र फडणवीस नेतृत्व करत आहेत. त्यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप आणि सेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

पर्यटन वाढीसाठी हे राज्यसरकार काम करत आहे. येणारी लोकसभा आपल्याला काहीही करून जिंकावीच लागेल. महेश शिंदे म्हणाले, देशाला पुढे नेणारा नेता म्हणून मोदींकडे पाहिले जाते. मुली जन्मल्यापासून शासकीय योजनांबाबत सर्व प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना सहा हजार मिळत आहे, त्याचप्रमाणे राज्याने ही घेतला हा क्रांतिकारक निर्णय आहे.

सातारा जिल्ह्याला सिंचनाचा मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही देत आहे. मोदीना पंतप्रधान करण्यासाठी या ठिकाणी संकल्प करूया. जो उमेदवार खासदारकीला द्याल त्यांना उच्चकी मतांनी निवडून देऊया. संजीवराजे निंबाळकर म्हणाले, मकरसंक्रातीच्या पूर्व संध्येला ठराविक उद्देशाने एकत्र आलो आहे. आजचा उद्देश एकच आहे की आम्ही एकत्र आलो आहोत आज मोदीच देश पुढे नेऊ  शकतात हा विश्वास निर्माण झाला आहे.

आपल्या राज्याचा विकास पुढे नेण्यासाठी आम्ही आमच्यातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलो आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात आहे. आमचे नेते अजित पवार यांनी ही निर्णय घेतला तो देशाचा विकास हा मोदींच्या बरोबर राहून आपल्या राज्याचा विकास करायचा आहे. महायुती बरोबर राष्ट्रवादी पक्ष काम करेल सर्वच निवडणूकित मोदींना साथ देण्यासाठी कटिबद्ध असणार आहे.

यावेळी मुकुंद सूर्यवंशी, युवराज कांबळे, अशोक गायकवाड, आदींची मनोगते झाली. प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले. जय भवानी... जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. यावेळी नरेंद्र पाटील, अतुल भोसले, मनोजदादा घोरपडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील,  पुरूषोत्तम जाधव, दिलीप येळगावकर, आनंदराव पाटील, अमित कदम, बाळासाहेब सोळस्कर,  सुरभी भोसले, रंजना राऊत, गीतांजली कदम, शारदाताई जाधव उपस्थित होते.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT