Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : राज्यात उद्भवलेली परिस्थिती अभूतपूर्व ; टँकरचालक संपावरून राऊतांचा हल्लाबोल...

Amol Sutar

Sanjay Raut : टँकरचालक संपावर गेल्याने इंधनपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे राज्यात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा खंडित होणार आहे. गोंधळाची स्थिती निर्माण होत असून हा प्रकार गंभीर आहे. याचा त्रास सामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. यावर लवकर तोडगा न निघाल्यास वातावरण चिघळणार आहे.

राज्यात उद्भवलेली परिस्थिती अभूतपूर्व असल्याचे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. टँकरचालक संपावरून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकांवरील अत्यंत कठोर तरतुदी केंद्र शासनाने केल्या आहेत. त्याचे पडसाद देशभरात उमटले. ट्रक आणि टँकरचालकांनी संप पुकारला.

त्यावर राऊत म्हणाले, राज्यात गोंधळाची स्थिती आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत, तर पोलिसांवर हल्ले झाले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडे चर्चा करणे गरजेचे. 'हिट ॲन्ड रन' हा गंभीर प्रकार आहे त्याच्याविषयी दुमत नाही. पण जी परिस्थिती राज्यात उद्भवली आहे ती अभूतपूर्व आहे.

हे प्रकरण चिघळत गेले तर सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागेल. जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा यांच्या माध्यमातून होत असतो, तो बंद होण्याची शक्यता असल्याचे राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत उत्तम संवाद...

महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चांवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले, काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे.

चर्चा होत आहेत, लवकरच जागावाटपांबाबत प्रक्रिया पूर्ण होईल. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम संवाद सुरू आहे आणि त्यातील जागाबवाटपांबाबत आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही. भविष्यात गरज पडली तर दिल्लीत जाऊन विषय सोडवू. आम्ही सगळे एक आहोत. आमची वज्रमूठ हीच आमची ताकद आहे. एक-दोन जागांसाठी आम्ही महाविकास आघाडीत कोणताही तणाव निर्माण करणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याबद्दल मी काय बोलणार...

राधाकृष्ण विखे - पाटील (Radhakrishn Vikhe - Patil) यांनी काँग्रेसचे नेते लवकरच भाजपप्रवेश करतील, असे वक्तव्य केले होते. त्यावर राऊत म्हणाले, त्यांनी अनेक पक्ष बदलेले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि आता ते भाजपमध्ये आहेत. अशा नेत्यांना पक्षांतराची जाण नसते. त्यांचे आयुष्य काँग्रेसमध्ये गेले. ते शिवसेनेतही होते त्यांच्यावर मी काय बोलणार.

कोण कुठे जातंय हे येणारा काळ ठरवेल आणि उद्या भाजपची सत्ताच येणार नाही. त्यावेळी तुम्ही कुठे असणार हे लक्षात ठेवा, असा सवाल राऊत यांनी विखेंना केला.

'ईडी'ने बोलावले... ते आता सरकारच्या कॅबिनेटमध्ये...

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना 'ईडी'ची नोटीस गेली आहे. त्यांना फक्त नोटीस गेली आहे. पण त्यांच्या आधी महाराष्ट्रातील नेत्यांना नोटीस आली होती, त्यांचे काय झाले.

ते आता महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला. ते म्हणाले, ज्यांना ईडीने बोलवायला पाहिजे होते आणि ज्यांना पहिले बोलावले होते ते आता भाजपसोबत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. जे त्यांच्यासोबत नाहीत त्यांना 'ईडी'ची नोटीस देऊन बोलावून त्रास देण्याचे काम सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT