Manoj Jarange Patil |Raju Shetti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : लोकसभा लढविण्यासाठी जरांगेंवर वाढता दबाव; आंबेडकरांपाठोपाठ स्वाभिमानीचाही पाठिंबा

Arvind Jadhav

Nashik Political News : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने आयुष्यभर रस्त्यावर येऊन संघर्ष केला. संसदेत जाऊन शेतकरीहिताचे निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडले.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि बहुजन समाजाच्या हितासाठी रस्त्यावरच्या लढाईबरोबर कायदेमंडळात जाऊन मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचे असेल तर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवायला हवी.

जालना मतदारसंघातून ते लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी आवाहन केले.

देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जनआंदोलन उभे करून सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडता येते. आजपर्यंत अनेक जनआंदोलनांनी जनतेच्या हिताचे निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडले आहेत, पण या जनआंदोलनातले काही लोकप्रतिनिधी हे जर कायदेमंडळात असतील, तर त्या आंदोलनाला अधिक धार येते. कमी संघर्षामध्ये, रक्त न सांडता जनतेचे म्हणणे सरकारकडून मान्य करून घेता येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कायदेमंडळात जाऊन उसाच्या एफआरपीचा विषय सरकारकडून मान्य करून घेतला. चुकीचे भूमी अधिग्रहण बिल संसदेतून उधळून लावले, हे केवळ राजू शेट्टी लोकसभेत (Loksabha) होते म्हणून शक्य झाले. म्हणूनच रस्त्यावरच्या संघर्षाबरोबरच कायदेमंडळातील लढाईही खूप महत्त्वाची आहे.

मनोज जरांगे पाटील हे मराठा बहुजनांचे नेते म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. रस्त्यावर त्यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा हा अलौकिक आहे. परंतु या लढ्याला आजही पूर्ण यश मिळाले नाही. कायदेमंडळात नवीन कायदा झाल्याशिवाय मराठा समाजाला कायमचे टिकणारे आणि योग्य आरक्षण मिळणे अशक्य आहे.

यासाठी कायदे मंडळामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा प्रतिनिधी असायला हवा. असे आमचे प्रामाणिक मत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कुठल्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे समाजाच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक लढवावी, असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हवे असल्यास 52 टक्के आरक्षणाची अट दुरुस्त करून त्यात वाढ करणे आवश्यक आहे. हा अधिकार या देशाच्या संसदेला आहे. हा कायदा संसदेत आणण्यासाठी आणि तो मंजूर करण्यासाठी सरकारवर सतत दबाव ठेवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा लढाऊ माणूस संसदेत असायला हवा, अशी आमची प्रामाणिक भावना आहे.

फक्त लोकसभेची निवडणूक मनोज जरांगे पाटील यांनी स्वतंत्रपणे लढवावी. कुठल्याही आघाडीत जाऊ नये. म्हणजे सरकार कोणाचेही असो. त्याच्याशी त्यांना खुलेपणाने दोन हात करता येतील. मनोज जरांगे पाटील यांनी जालना मतदारसंघातून उभे राहण्याची भूमिका घेतली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT