Sujay Vikhe News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe News : ...म्हणून खासदार सुजय विखे घेणार थेट अमित शाहांची भेट

Pradeep Pendhare

Ahmednagar : कांदा निर्यात बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे. केंद्र सरकारने घातलेले कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी आता खासदार डाॅ. सुजय विखे पाटील मैदानात उतरले आहेत. कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले असून या अनुषंगाने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्यासमवेत जानेवारी महिन्यात दिल्ली येथे अमित शाह यांना भेटणार आहेत.

या भेटीदरम्यान कांदा (Onion) निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठीची अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार आहे. तसेच कांदा निर्यात बंदी उठवून कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार डाॅ. विखे यांनी सांगितले. उदरमल (ता. नगर) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, राजेंद्र तोरडमल, देविदास आव्हाड उपस्थित होते.

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली जाणार असून निश्चितच शेतकरी (Farmers) हिताचा विचार केला होईल, अशी ग्वाही खासदार सुजय विखेंनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील दीड वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार नव्हते, तेव्हा मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासत होती. परंतु, आता महायुतीचे सरकार आल्यापासून नगर जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडत नाही आणि यापुढेही विविध विकासकामांना प्राधान्य देऊन भरीव निधी हा उपलब्ध करून दिला जाईल, असे खासदार डाॅ. विखे यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकरी संकटात असताना केंद्र सरकारने कांद्यावर घातलेली निर्यात बंदी आगीत तेल ओतणारी आहे. नापिकी, रोगराई, गारपीट, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे शेतीवर पडलेली रोगराई असतानाच केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातली. परिणामी कांद्याचे बाजारभाव दुप्पटीने कोसळले आहेत. शेतीला योग्य धोरण देण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण देखील वाढले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीवरचे कर्ज दुप्पट झाले आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही. सिंचनाची व्यवस्था नाही. लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची बाजू केंद्राकडे कधी लावणार असा प्रश्न केला जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT