Ranjit Patil & Sanjay Dhotre. Sarkarnama
विदर्भ

Akola BJP : धोत्रेंच्या वाढदिवशी रणजित पाटलांचे ट्विट गटबाजीच्या चिखलात कमळ फुलविणार?

जयेश विनायकराव गावंडे

Akola BJP : अकोला जिल्ह्यात विद्यमान खासदार संजय धोत्रे आणि माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यातील राजकीय गटबाजी सर्वश्रूत आहे. या दोघांमधील वादाची धुसफूस अनेकवेळा जाहीरपणे चव्हाट्यावर आली आहे. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा सोमवारी (ता.25) रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. अशात सर्व मतभेद विसरत डॉ. रणजित पाटील यांनी धोत्रेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. पाटील यांनी ट्विट करीत खासदार धोत्रेंना दीर्घायुष्याचा शुभेच्छा दिल्यात. रणजित पाटील यांची ही पोस्ट सध्या अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

राजकीय वर्चस्वातून राजकीय नेत्यांमध्ये वैर वाढत असते. सध्या दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर हा खालावत चालला आहे. अशात अनेकदा नेत्यांनी पुढाकार घेतल्यामुळे हे राजकीय वैर संपुष्टात आल्याचेही बघायला मिळते. राजकारणात सर्वकाळ कोणीच कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, अशी म्हण आहे. अकोला भाजपात पाटील यांच्या घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्ह्यात पडलेले दोन गट एकत्र येणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अकोला भाजपात विद्यमान खासदार संजय धोत्रे आणि माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे दोन गट कार्यरत आहेत. खासदार धोत्रे व डॉ. पाटील यांच्यातील बेबनाव अकोलेकरांसाठी नवीन नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपमधील हे दोन्ही गट सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. धोत्रे-पाटील वादाच्या आगीवर अनेकांनी आतापर्यंत आपल्या पोळ्याही शेकून घेतल्या. अशात खासदार धोत्रे हे गेल्या दोन वर्षांपासून दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळून आहेत. ते राजकारणात सध्या सक्रिय नाहीत. धोत्रेंचा गट मात्र सध्या अकोल्यात वरचढ आहे. धोत्रे गटामार्फत कायम डॉ. पाटील यांना विरोध करण्यात येतो. त्यांना व त्यांच्या गटातील अनेकांना जिल्ह्यातील भाजपच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवण्यात येत असल्याची बोलले जाते. खासदार धोत्रें आणि डॉ. पाटील यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचे काम डॉ. पाटील यांच्या एका पोस्टमुळे सुरू झाले आहे.

खासदार संजय धोत्रे यांचा वाढदिवस साजरा होत असताना डॉ. पाटील यांनी सर्व मतभेद विसरत सोशल माध्यमांवर त्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या. डॉ. पाटील यांनी पुढे केलेला मित्रत्वाचा हात हातात घेण्यासाठी सध्या संजय धोत्रे सक्रिय नसले तरी त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे हे मात्र कार्यरत आहेत. त्यामुळे डॉ. पाटील यांच्या सादाला कसा प्रतिसाद द्यायचा हे आता त्यांनाच ठरवावे लागणार आहे. अनेकांनी एक गोष्ट बालपणी ऐकली असेल लोण्याच्या गोळ्यासाठी दोन मांजरी भांडण असतात आणि त्याची समतोल हिस्सेवाटणी करण्यासाठी एक माकड येतो. हा माकड तराजूवरील लोणी पूर्णपणे लंपास करतो. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ अशी शिकवण या कथेतून सर्वांना मिळते.

खासदार संजय धोत्रे आणि माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यात सुरू झालेले मतभेद खरोखर या दोन नेत्यांनी स्वत:हून सुरू केलेले आहेत की, असाच कुणी ‘माकड’ झाडावरून टपकला आणि त्याने लोण्यावर डल्ला मारण्यासाठी हा वाद निर्माण केला, याचा विचार आता रणजित पाटील आणि अनुप धोत्रे यांचा थंड डोक्याने करावा लागला आहे. इतिहास साक्षीदार आहे, अहंकार, मुजोरी, हेकेखोरी आणि गटबाजी यामुळे अनेकांची ‘सल्तनत’ जमिनदोस्त झाली. अकोला जिल्हा हा सुरुवातीपासून भाजपचा गड राहिला आहे.

पूर्वी भाजप असा नव्हताच

संजय धोत्रे, नारायणराव गव्हाणकर, गोवर्धन शर्मा, किशोर मांगटे पाटील, डॉ. अशोक ओळंबे, गिरीश जोशी, वसंत खंडेलवाल, डॉ. रणजित पाटील, हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, पवन पाडीया, सिद्धार्थ शर्मा यांनी अकोल्यात भाजपचे बीज खोलवरपर्यंत रूजविले. भाजपला वाढविले. या मंडळींनी कधीही जातीवाद केला नाही. मुजोरी केली नाही. गटबाजी होऊ दिली नाही. तू अमूक जातीचा म्हणून एखाद्याला पक्षाच्या बैठकीतून तुम्ही येथे अपेक्षित नाही असे सांगून बाहेर काढून दिलेले नाही. परंतु अचानक अकोला भाजपात धोत्रे-पाटील हे गट तयार झालेत. अशा गटबाजीचा फटका जिल्ह्याच्या विकासाला बसतो हे नाक गळणारा शेंबडा पोरगाही सांगू शकतो.

अनुपराव पुढाकार घ्याच!

संजय धोत्रे हे जरी निवडणूक लढणार नसले तरी त्यांचे सुपुत्र आता मैदानात आहेत. अनुप हे उच्चशिक्षित आहेत. समजदार आहे. त्यामुळे अशी गटबाजी तयार करणारी ‘माकडं’ त्यांनी शोधावी जी भाजपचे अकोल्यात बहरलेले, फुललेले, स्वादिष्ट फळं आलेले झाड तोडू पाहाता आहेत. आपली मुजोरी व हुकुमशाही सिद्ध करण्यासाठी पक्षात जातीयवादाला थारा देत आहे. अशी अशा ‘माकडांचा’ आता अनुप धोत्रे, रणजित पाटील यांनी एकत्र येत बंदोबस्त करावा. ‘प्रदेश’ पातळीवरूनही अशा माकडांना वेळीच पिंजऱ्यात टाकले जावे अन्यथा हे भाजपची फुललेली बाग उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष द्यावे व एकेकाळी अकोल्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही त्यासाठी पुढाकार घ्यावा. बावनकुळे आणि फडणवीस यांनीही ठरवावे की, अकोल्यात भापला अधिक मजबूत करण्यासाठी काहींच्या मुसक्या आवळायच्या की ‘कमळ’ गटबाजी व जातीवादाच्या चिखलात पडून राहू द्यायचे?

अकोला भाजपमध्ये पडलेल्या वादाच्या ठिगणीचा काही जण वणवा करू पाहात आहेत. ही गटबाजी, जातीवाद करणारे कोण हे नाव घेऊन सांगण्याची गरज नाही. त्यामुळे रणजित पाटील यांनी आता एक पाऊल पुढे टाकल्यानंतर अनुप धोत्रे यांनीही दोन पावले पुढे यावे असेच भाजपच्या सच्चा आणि कट्टर प्रेमिंना वाटत आहे. असे झाले तर इतिहास साक्षीदार असेल की गटबाजीवर मात करून भाजपने अकोल्याचा परिपूर्ण विकास करून दाखविला आणि त्याचे श्रेय रणजित पाटील व अनुप धोत्रे यांनाच युगायुगापर्यंत दिले जाईल. आता विचार या दोघांनाच करायचा आहे, की गटबाजीच्या चिखलात ‘कमळ’ कसे फुलवायचे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT