Ajit Pawar- Jayant Patil Sarkarnama
विदर्भ

Assembly Winter Session : जयंतरावांचा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’अन्‌ अजितदादांचे उत्तर; विधानसभेत काय घडलं पहा...

Vijaykumar Dudhale

Nagpur News : कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. जयंतरावांच्या ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दमदार उत्तर दिले. कांदा आणि इथेनॉलच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्ग काढण्याचा शब्द दिला आहे. तसेच, दुधाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या सोमवारी किंवा मंगळवारी बैठक लावण्यात येईल, असे उत्तर देत पाटलांचे आव्हान परतवून लावले. (Jayant Patil's 'Point of Information' and Ajit Pawar's reply)

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी आवाज उठवला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी पीकविम्याच्या मुद्यावरून सरकारची लाज काढली. नाना पटोले यांनी धानाचा मुद्दा लावून धरला. बाळासाहेब थोरात यांनी दुधाचा प्रश्न उपस्थित केला. आमदार जयंत पाटील यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉल निर्मितीस बंदीचा प्रश्न उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे. कांदा निर्यातीवर ता. ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क होतं. पण, सरकारने गुरुवारी निर्यात बंदी जाहीर केली आहे. इथेनॉल प्रॉडक्टमध्ये बदल झाले आहेत. इथेनॉल निर्मितीवर पुन्हा बंदी करण्यात आली आहे, त्यामुळे ऊस उत्पादक निराशेत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती निर्यातबंदीमुळे पूर्णपणे ठप्प होणार आहे. संत्रा निर्यातीवर बांगलादेशने आयातशुल्क लावले आहेत. कापसाला भाव नाही. या राज्यातील सर्व शेतीमालाच्या निर्यातीचे मार्ग केंद्र सरकार बंद करत आहे, त्यामुळे राज्य सरकारने कांदा निर्यात बंदीबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले की, इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रोत्साहन दिलं. अनेक साखर कारखान्यांनी गुंतवणूक केली आहे. देशाला लागणाऱ्या साखरेपेक्षा जास्त साखर असूनही इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडा फार दर मिळण्याची शक्यता होती. तीही आता संपुष्टात आली आहे, त्यामुळे इथेनॉल संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार. कांदा निर्यात पुन्हा चालू करण्यासाठी सरकार काय करणार, याचा खुलासा करावा.

जयंत पाटील यांच्या पॉईंट इन्फॉर्मेशनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कांदा निर्यात बंदीबाबतच्या सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. या सर्व प्रश्नावर सरकारची चर्चेची तयारी आहे. सी हेवी मॉलिसिस आणि बी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी कायम ठेवली आहे. मात्र, सिरफ आणि ज्यूस याबाबतचा निर्णय झाला हेाता. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळायला परवानगी दिली आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मी फोनवरून चर्चा केली आहे.

इथेनॉलच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अनेक कारखान्यांनी कर्ज काढून इथेनॉल प्रकल्प उभारले आहेत. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी नाकारली तर उस गाळप करता येणार नाही. कारण त्यांना साखर उत्पादन करता येणार नाही, तशी व्यवस्थाच या कारखान्यांनी केली नाही, हे मी अमित शहा यांना सांगितले आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, या प्रश्नावर आम्ही दिल्लीला जाणार आहोत. नितीन गडकरी यांनी शनिवार रविवार सोडून इतर दिवशी यायला सांगितले आहे. गडकरी हे शनिवार आणि रविवारी नागपूरला येणार आहेत, त्या वेळी मी त्यांना भेटणार आहे. इथेनॉल, कांदा आणि इतर प्रश्नांवर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. जयंत पाटील आणि त्यांच्या मार्फत राज्यातील जनतेला सांंगू इच्छितो की अमित शहा यांनी या प्रश्नावर मार्ग काढण्याचा शब्द दिला आहे. उद्या आणि परवा त्यावर मार्ग निघतो का हे आम्ही बघतोय. नाही तर सोमवारी आम्ही दिल्लीला जाऊन त्यावर मार्ग काढू.

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरही ऊस आणि इथेनॉलच्या प्रश्नासोबत मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबच बाळासाहेब थोरात यांनी दुधाचा मुद्या उपस्थित केला होता. त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राधाकृष्ण विखे पाटील आणि दोन्ही बाजूच्या आमदारांच्या उपस्थितीत सोमवारी किंवा मंगळवारी लावण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही तर माझ्या आणि विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा प्रयत्न करू, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT