Dr. Bhagwat Karad Sarkarnama
विदर्भ

Buldhana Political : 'आले कराड, चला उचला बिऱ्हाड' ; विकसित भारत संकल्प यात्रेत गोंधळ...

जयेश विनायकराव गावंडे

- जयेश विनायकराव गावंडे

Buldhana Political : केंद्र सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प अभियान रथयात्रेच्या बुलढाणा येथील कार्यक्रमात चांगलाच गोंधळ उडाला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे अभियान रथाची माहिती देण्यासाठी आले होते. मात्र भाषण सुरू असतानाच उपस्थितांनी एकच गोंधळ करत भर कार्यक्रमातून लोक जायला लागले. त्यामुळे आयोजकांनाही कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. तर स्टॉलच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यासाठी अधिकारी होते.

मात्र माहिती घेण्यासाठी लोकच नसल्याने कार्यक्रम लवकरच उरकण्यात आला. त्यामुळे 'आले कराड, अन् उचला बिऱ्हाड' अशीच काहीशी चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यात रंगली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्यावतीने शहरी आणि ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या सुमारे 35 योजनांची माहिती आणि योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प अभियान रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) हे या अभियान रथाची माहिती देण्यासाठी राज्यभर फिरत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही ही यात्रा 8 जानेवारी रोजी आली होती. बुलढाणा येथील महात्मा गांधी भवनात विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी या कार्यक्रमात माहिती देणारे स्टॉल ही लावण्यात आले होते. कार्यक्रमासाठी गर्दीही करण्यात आली.

डॉ. भागवत कराड हे कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते. मात्र त्यांचे भाषणापूर्वीच महिला उठून जायला लागल्या होत्या. अनेक जण भर कार्यक्रमातून उठून निघायला लागले. कराड हे योजनांची माहिती लोकांना देत होते अन लोक उठून जात होते. या कार्यक्रमात उपस्थिती असलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्याची खंत अनेकांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्टॉलच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी शासकीय कर्मचारी, बचत गट महिला, लाभार्थीचा समावेश अधिक होता. कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर आमदार श्वेता महाले यांचे भाषण झाले. आमदार संजय गायकवाड यांचे भाषण सुरु असतानाच पंतप्रधान मोदी यांचा लाइव्ह कार्यक्रम बघण्यासाठी सर्वच मान्यवर व्यासपीठावरून खाली उतरले. मात्र या मान्यवरांमुळे एलईडीच्या स्क्रीनवर नेमके काय सुरु आहे.

हे कळत नसल्याने व आवाजही बरोबर येत नसल्याने आलेल्या बहुतांश महिलांनी घरचा रस्ता धरला होता. तर स्टॉल ची माहिती जाणून घेण्यासाठी कुणीच न उरल्याने स्टॉल वाल्यानीही लवकरच आपला गाशा गुंडाळला. म्हणजेच 'आले कराड चला उचला बिऱ्हाड' असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात ही रथयात्रा आली होती.

विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये रथावर ‘भारत’ ऐवजी मोदी सरकार लिहिल्याचे पाहून जिल्ह्यातील रिधोरा येथील ग्रामस्थ चांगले संतापले होते. ग्रामस्थांनी रथ अडवून अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. ग्रामपंचायत परिसरात कार्यक्रम घेण्यावरही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे काढता पाय अधिकाऱ्यांनी घेतला. आता पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातही या रथयात्रेला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने यात्रा उरकती घ्यावी लागली आहे. ढिसाळ नियोजनाचा फटका या यात्रेला बसल्याची चर्चा होती.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT