Ashok Pawar-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Shirur Sabha : ‘घोडगंगा’वरून अजितदादांचा अशोक पवारांवर हल्लाबोल; ‘तुझ्या अंगात नाही दम, तू काय माझं नाव घेतो...’

Vijaykumar Dudhale

Pune, 09 May : आमच्या भावकीला आमदार अशोक पवार यांना घोडगंगा सहकारी साखर कारखाना नीट चालवता आला नाही. मी कमी पडलो, हे त्यांनी आता कसं सांगायचं. त्यामुळे ते आता माझ्यावर ढकलताहेत. अजित पवारांमुळे कारखाना बंद पडला. तुझ्या अंगात नाही दम, तू काय माझं नाव घेतो, मी कारखाना बंद पडला. तुम्ही माझी नावं घेताय, ‘घोडगंगा कारखाना बंद पडला; मग व्यंकटेश कृपा कसा चालला?’ असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना विचारला.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची शिरूर तालुक्यातील केंदूर येथे जाहीर सभा झाली. त्या सभेत पवारांनी आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आमदार पवार यांच्याकडून अजित पवार यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडल्याचा आरोप होत आहे. त्याला अजितदादांनी जाहीर सभेतून उत्तर दिले.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा भीमाशंकर कारखाना कसा जोरात चालला आहे. पराग कारखानाही चांगला चालला आहे की नाही. तुम्ही माझी नावं घेताय शहाण्यांनो, घोडगंगा कारखाना बंद पडला; मग व्यंकटेश कृपा कसा चालला, याचा जरा विचार करा. मी कायम खरं बोलतो. एकवेळ तुम्हाला राग येईल, पण मला कोणी खोट्यात पाडलं तर मी सोडणार नाही. मी कुणाच्या पाच पैशाचा अथवा चहाचासुद्धा मिंधा नाही. मग, तुमचा स्वतःचा खासगी कारखाना चांगला चालू आहे आणि तो कसा काय बंद पडला नाही. अजित पवारांनी घोडगंगा कारखाना बंद पाडला म्हणता, मग तुमचा कारखाना कसा काय बंद पाडला नाही. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळे ते थातूरमातूर आणि खोटेनाटे आरोप माझ्यावर करत आहेत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला वावर यावर अजित पवार यांनी भाष्य केले. बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे वाढवण्यात आले आहेत. तसेच, बिबट्याची नसबंदी करण्याचे नियोजन आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा मागील पाच वर्षांची बॅकलॉग भरून काढायाचा आहे, त्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

अजित पवार म्हणाले, कांदा निर्यातबंदीचा प्रश्न आम्ही पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर घातला. त्यांनी लगेच निर्यातबंदी उठवली. उसाची एफआरपी वाढवली आहे. साखर कारखान्यावरील इनकम टॅक्सचा प्रश्न नरेंद्र मोदी सरकारने तातडीने निकाला काढला. थेऊरचा कारखाना चालू करण्यासाठी तेथे निवडून आलेल्या संचालक मंडळांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यांना कारखाना चालू करण्यासाठी मदत करणार आहे.

संविधान बदलणार, असं काहीही विरोधक सांगत आहेत. हे साफ खोटं आहे, कोण संविधान बोलणार आहे. मुस्लीम लोकांना पाकिस्तानमध्ये पाठवणार असल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. कोण पाठवणार आहे, काहीही बडबड करतात. दहा वर्षांत सर्वांना बरोबरीने वागवले ना. सर्वांना मोफत धान्य दिले की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT