Narayan Rane-Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Rane On Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना अटक करा; असं नारायण राणे का म्हणाले?

Vijaykumar Dudhale

Pune News : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सहा डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते. दंगली घडवल्या जाऊ शकतात, असे विधान केले होते. त्याचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक करायला पाहिजे. दंगलीचा आधार त्यांच्याकडून जाणून घेतला पाहिजे, असेही राणेंनी म्हटले आहे. (Arrest to Prakash Ambedkar; Why did Narayan Rane say that?)

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज विकसित भारत यात्रेच्या निमित्ताने पुण्यात आले होते. त्यावेळी मराठा आरक्षण, आंबेडकरांचे दंगलीचे विधान याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक करायला पाहिजे. माहिती जर कोण लपवत असेल तर तो गुन्हा होतो. इथे दंगल होणार, त्याचा प्रूफ द्यावा लागतो. कशी आणि कोण दंगल करणार?, हेही सांगावं लागतं, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकीयदृष्ट्या संपलेले लोक असं का बोलत आहेत, हे कळत नाही. त्यांनी घरात बसायला पाहिजे, असा टोलाही राणेंनी आंबेडकरांना लगावला. प्रकाश आंबेडकरच नाही तर कोणीही दंगली होणार आहेत, असं विधान केल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घ्यायची असते. कुठे दंगल होणार आहे, त्याची तुमच्याकडे काय माहिती, भविष्यात दंगल घडू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षता घेणे, पोलिसांचं काम आहे.

टिपू सुलतानबाबत विचारलेल्या प्रश्नाला मात्र नारायण राणे यांनी बगल दिली. केंद्रीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत ही यात्रा होती. ती टिपू सुलतानबाबत नव्हती. त्यामुळे मी असे विषय काढू इच्छित नाही. काही लोकं बोलतात की दंगली होणार; पण दंगली होतील, अशा वातावरण निर्मितीला आपण प्रोत्सहन देणार नाही. आम्ही आज चांगल्या गोष्टींसाठी आलो आहोत, असेही राणेंनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे अजून लहान

मनोज जरांगे अजून लहान आहेत. आरक्षणासंदर्भात त्यांनी अजून अभ्यास करणं, आवश्यक आहे. वेगवेगळ्या जाती आरक्षण कसं मिळतं, त्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काय तरतुदी आहेत, याचा जरांगेंनी अभ्यास करावा. मराठ्यांना विचारावं की ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का? मराठा समाज कधीही ओबीसी आरक्षण घेणार नाही, असा दावाही राणे यांनी केला.

घटनेच्या 15/4 प्रमाणे मराठ्यांना आरक्षण द्यावं

राणे म्हणाले की, कुणाचंही काढून मराठ्यांना आरक्षण द्यावं, असं माझं म्हणणं नाही. प्रत्येक मराठा नेत्याची मागणी वेगवेगळी आहे. 52 टक्क्यांच्या वर, भारतीय घटनेच्या 15/4 प्रमाणे मराठ्यांना आरक्षण द्यावं. मागास आयोगाकडे पाठवावं. त्याचा सर्व्हेही व्हावा. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागास मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT