Balasaheb Thackeray Sarkarnama
विशेष

Balasaheb Thackeray News : ‘भाजपच्या षडयंत्राला कंटाळून बाळासाहेबांनी तेव्हाच काँग्रेसशी युतीचा निर्णय बोलून दाखवला होता’

Vijaykumar Dudhale

Solapur News : उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार बनविले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून वारंवार होत आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचा हा दावा ठाकरेंचे एकनिष्ठ तथा माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी खोडून काढला आहे. खुद्द बाळासाहेबांनी १९९९ च्या निवडणुकीनंतर भाजपच्या षडयंत्राला, त्रासाला कंटाळून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय सर्व आमदारांसमोर बोलून दाखवला होता, असा गौप्यस्फोट खंदारे यांनी केला. (Shivsena News)

कोल्हापूर येथे शिवसेनेचे (शिंदे गट) महाअधिवेशन झाले. त्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा मुद्दा मांडला. काँग्रेससोबत आघाडी करून, सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी टीका शिंदे यांनी ठाकरेंवर केली. त्याला आता मातोश्रीचे एकनिष्ठ शिवसैनिक आणि १९९५ च्या युती सरकारमधील मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Uttamprakash Khandare)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी मंत्री खंदारे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूरच्या अधिवेशनातील वक्तव्य निखलास खोटे असून, महाराष्ट्राची दिशाभूल करणारे आहे. भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात शिवसेनेचे बोट धरून मोठा झाला. पण, तो मोठा होत असताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. भविष्यात भाजपकडून शिवसेनेला धोका होणार, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी हेरले होते. त्यासाठी 1999 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर त्यांनी पुणे येथे प्रारूप विधानसभा आयोजित केली होती. कारण त्यावेळी शिवसेनेकडून निवडून आलेले बहुतांश आमदार नवाेदित होते.

प्रारूप विधानसभा पार पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे मार्गदर्शनासाठी उभे राहिले. ते म्हणाले, ‘1995 प्रमाणेच अपक्षांच्या पाठिंब्यावर आपले सरकार येणार होते, परंतु केवळ शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही. या भाजपच्या षडयंत्राने शिवसेनेला सत्तेवर येण्यापासून रोखले. आपल्याकडे येण्यासाठी उत्सुक अपक्ष आमदारांना भाजपने ‘आम्ही सरकार बनवणार नाही. तुम्ही तिकडे (काँग्रेस-राष्ट्रवादी) जाऊन तुमचे बर्थ फिक्स करा, असे आमदारांना सांगून कमळाबाईने शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही,’ असेही खंदारे यांनी नमूद केले.

एवढं बोलून बाळासाहेब क्षणभर थांबले. ते म्हणाले, मी काॅंग्रेसबरोबर युती करण्याचा निर्णय घेतोय, तुम्हाला मान्य आहे का? तेव्हा आम्ही एकमुखाने शिवसेनाप्रमुखांच्या निर्णयाला संमती दिली होती, असेही खंदारे यांनी स्पष्ट केले.

खंदारे म्हणाले, बाळासाहेबांनी शिवसेनेच्या आमदारांसमोर काँग्रेसबरोबर युती करण्याचा निर्णय घेतोय, हे जेव्हा सांगितले हाेते, तेव्हा एकनाथ शिंदे हे आमदारही नव्हते. मात्र, याच एकनाथ शिंदेंनी कल्याणच्या शिवसेनेच्या सभेत भाजप काम करू देत नाही. मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो, असे सांगून उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. तीच गत संजय राठोड यांची आहे.

आपण सगळे आमदार, खासदार, नेते, मंत्री म्हणवितो ना स्वतःला. पण ही सगळी पुण्याई मातोश्रीची, ठाकरे कुटुंबाचीच आहे. आपल्याला जन्म आई-बापांनी दिला; पण चेहरा आणि नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तुम्ही उपकार विसरलात? निष्ठा, जाणीव पायदळी तुडवून सत्तेसाठी लाचार झाला आहात? पण, जनतेच्या दरबारात तुमचा न्याय होणार आहे, असा इशाराही खंदारे यांनी दिला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT