Ajit Pawar & Devendra Fadanvis Sarkarnama
विशेष

Devendra Fadnavis : राज्यात उपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री होत नाही 'हे' मिथक फडणवीसांनी काढले मोडीत

Political News : गेल्या 46 वर्षांत महाराष्ट्रात 9 उपमुख्यमंत्र्यांना संधी मिळाली, पण एकालाही मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचता आले नाही. मात्र, हे मिथक आता देवेंद्र फडणवीस यांनी मोडले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजपर्यंतचा इतिहास पहिला तर उपमुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या नेत्याला कधीही मुख्यमंत्री होता आले नाही. महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस गेली अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होते. गुरुवारी ते महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात एक मिथक आहे, ते म्हणजे उपमुख्यमंत्री कधीही मुख्यमंत्री झाले नाहीत.

गेल्या 46 वर्षांत महाराष्ट्रात 9 उपमुख्यमंत्र्यांना संधी मिळाली, पण एकालाही मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचता आले नाही. मात्र, हे मिथक आता देवेंद्र फडणवीस यांनी मोडले आहे. गेल्या टर्ममध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. विशेष म्हणजे या पूर्वी २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस हे राज्याचे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष या पदावर राहणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. 23 नोव्हेंबरला लागलेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक असाच आहे. या निवडणुकीत महायुतीने 234 जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले. तर महाविकास आघाडीने 46 जागांवर विजय मिळवला. अपक्ष आणि इतर पक्षांसह इतर उमेदवार 8 जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे 15 व्या विधानसभेमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे. राज्यातील भाजपच्या (BJp) नवनिर्वाचित आमदाराची बैठक बुधवारी सकाळी पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची गटनेता म्हणून एकमताने निवड झाली.त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे शपथ घेणार आहेत.

सर्वाधिक पाचवेळा अजित पवार उपमुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर २३ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणीस यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री हा मुख्यमंत्री बनू शकत नाही हे मिथक देवेंद्र फडणवीस यांनी मोडले आहे.

राज्याचा इतिहास पहिला तर गेल्या 46 वर्षांत महाराष्ट्रात 9 उपमुख्यमंत्र्यांना संधी मिळाली, पण एकालाही मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचता आले नाही. यामध्ये नासिकराव त्रिपुडे, सुंदरराव सोळंखे, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अजित पवार, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, देवेंद्र फडणवीस या नऊ जण उपमुख्यमंत्री झाले आहेत.

1960 ते 1995 या 35 वर्षाच्या काळात केवळ तीन उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर मात्र, 1995ते आजतागायत सहा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक पाचवेळा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. विशेषतः गेल्या पाच वर्षात अजित पवार यांनी तीन वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

नासिकराव त्रिपुडे

1978 मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात नासिकराव त्रिपुडे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्रिपुडे भंडारा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते, पण केवळ 5 मार्च 1978 ते18 जुलै 1978 या पदावर राहू शकले. शरद पवार यांच्या सरकारनंतर त्रिपुडे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ते काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही.

सुंदरराव सोळंखे

शरद पवार यांच्या सरकारमध्ये सुंदरराव सोळंखे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होतं. ते 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 या काळात पदावर होते, पण पवार यांच्या सरकार पडलं आणि सोळंखे यांना पद सोडावं लागलं. बीड जिल्हयातील ते मोठे नेते होते, पण पवार यांच्या सरकारनंतर ते राजकारणात पुन्हा स्थान मिळवू शकले नाहीत.

रामराव आदिक

1983 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात रामराव आदिक उपमुख्यमंत्री होते. आदिक 2 फेब्रुवारी 19835 मार्च 1985 या काळात उपमुख्यमंत्री होते, मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते होते. 1985 मध्येही ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. पण तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचता आले नाही.

गोपीनाथ मुंडे

राज्यात 1995 मध्ये पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आले. त्यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले होते. 14 मार्च 1995 ते 11 ऑक्टोबर 1999 असे 5 वर्षे त्यांनी हे पद भूषवले, पण त्यानंतर ते केंद्रातील राजकारणात सक्रिय झाले. त्यांनाही मुख्यमंत्री होता आले नाही.

छगन भुजबळ

1999 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांची वर्णी लागली. 18 ऑक्टोबर 1999 ते 23 डिसेंबर 2003 या काळात त्यांच्याकडे पदभार होता. त्यानंतर 8 डिसेंबर 2008 ते10 नोव्हेंबर 2010 या काळात ही उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर आतापर्यंत राज्य मंत्रीमंडळात सातत्याने मंत्री असलेल्या भुजबळ यांना देखील मुख्यमंत्रिपदार्यंत पोहोचता आले नाही.

विजयसिंह मोहिते पाटील

2003 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचा कालवधी संपण्यास दीड वर्ष शिल्लक असताना विलासराव देशमुख व छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला. यावेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची वर्णी लागली. विजयसिंह मोहिते पाटील 27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004 या काळात ते उपमुख्यमंत्री होते. त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही.

आर. आर. पाटील

2004 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा सरकार आले. त्यावेळी यावेळी विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांची वर्णी लागली. 1 नोव्हेंबर 2004 ते 1 डिसेंबर 2008 या काळात पदावर होते. त्यानंतर आर. आर. पाटील यांना मुख्यमंत्रिपदार्यंत पोहोचता आले नाही.

अजित पवार

2010 मध्ये पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदा 10 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता पर्यंत पाच वेळा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले पण त्यांना मुख्यमंत्रिपदार्यंत पोहोचता आले नाही.

त्यानंतर 2014 ते 2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस सलग पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी या काळात कोणालाच उपमुख्यमंत्री केले नव्हते. सलग पाच वर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री होते.

त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तर त्यावेळी अजित पवार हे अडीच वर्ष उपमुख्यमंत्री राहिले तर त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर जून 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पुन्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले.

आता आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी वेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ पुन्हा एकदा अजित पवार घेणार आहेत. 2010 पासून वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, पण बदलती राजकीय समीकरणं आणि जनाधारामुळे ते आजतागायत मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT