Dhanjay Mahdaik, Devendra Fadnavis, Sanajy Pawar Sarakarnama
विशेष

Rajyasabha Election: फडणवीसांच्या 'मॅजिक' पण तितक्याच 'परफेक्ट स्ट्रॅटेजी'ने महाडिकांना केले खासदार; 2 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Devendra Fadanvis News : 12 जुलै रोजी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यावेळेस भाजपने केलेल्या या प्लॅनींगची आज ही चर्चा होते. भाजपने दोन वर्षांपूर्वी केलेलं हे प्लॅनींग काय होते.

Sachin Waghmare

Mumbai News : महाराष्ट्रात राज्यसभेसाठी सुमारे 24 वर्षांनंतर 10 जून 2022 ला प्रथमच निवडणूक झाली. यामध्ये सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. यात भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार दिला होता. ही निवडणूक अत्यंत अतीतटीची झाली तर दुसरीकडे सत्ताधारी व विरोधकांनी मतपत्रिका दाखवल्याने एकमेकांचे मतदान बाद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मतमोजणीला सुमारे आठ तास उशीर झाला होता.

सत्ताधारी महाविकास आघाडीकडे (MVA) मतदान जास्त असतानाही या निवडणुकीत भाजपने वेगळी रणनिती आखत या निवडणुकीत बाजी मारली होती. कमी मतदान असताना त्यांनी प्लॅनींग करीत त्यांनी विजय मिळवत विरोधकांचे सर्वच प्लॅनींग फेल ठरवत चारी मुंड्या चित केले होते. त्यामुळे 12 जुलै रोजी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यावेळेस भाजपने केलेल्या या प्लॅनींगची आज ही चर्चा होते. भाजपने दोन वर्षांपूर्वी केलेलं हे प्लॅनींग काय होते, ते जाणून घेऊ यात. (Rajyasabha Election News)

जून 2022 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. यात भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार दिला होता. भाजपकडून अनिल बोंडे, पीयूष गोयल, धनंजय महाडिक तर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल, शिवसेनेने संजय राऊत, संजय पवार, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली होती. यावेळी मताचा कोटा पाहता भाजपला तिसरा तर शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागणार होती. त्यामुळे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत होती.

या निवडणुकीत सुरुवातीलाच राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. मात्र, शिवसेनेने आमच्या पक्षाकडून निवडणूक लढा असे शिवसेनेने म्हटले होते. मात्र, त्यांच्यात काही तडजोड झाली नाही. त्यानंतर कोल्हापूरच्या धनंजय उर्फ मुन्ना महाडिकांचं नाव भाजपकडून ऐन शेवटी आले. त्याला कारण ठरलं संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरुन कोल्हापूरात जे राजकीय नाट्य घडलं होते.

संभाजीराजेंनी शिवसेनेत जाण्यासाठी शेवटपर्यंत नकार कायम ठेवल्यानंतर शिवसेनेनं कोल्हापूर आणि मराठा समाजातून प्रतिकूल प्रतिक्रिया येऊ नये म्हणून कोल्हापूरचेच सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तर मराठा समाज आणि कोल्हापूरमध्ये स्थानिक पातळीवर या राजकारणाला उत्तर देण्यासाठी मतांचं गणित खात्रीशीर नसतांनाही तिसरा उमेदवार म्हणून मग भाजपानं महाडिकांना उतरवले. त्यामुळे ही लढत निवडणूक चुरशीची झाली होती.

त्यावेळी सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळ 172 इतके होते. त्यामध्ये शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 53, काँग्रेस 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, प्रहार जनशक्ती पार्टी 2 माकप 1, शेकाप 1, स्वाभिमानी पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पार्टी 1, अपक्ष 9.

दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडील संख्याबळ भाजप 106, जनसुराज्य शक्ती 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, अपक्ष 4 असे विरोधाकडे असलेले एकूण संख्याबळ 112 इतके होते. ही निवडणूक जिंकण्यासाठी एका एका आमदाराचं मत फार महत्वाचं आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून ही मतं मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे एकमेकांवर घोडेबाजाराचा देखील आरोप-प्रत्यारोप झाले.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप (Bjp), शिवसेनेनं खास रणनीती आखली. विशेष म्हणजे त्यावेळी आजारी असलेले चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनी आजारी असतानाही रुग्णावाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजावला होता.

या राज्यसभा निवडणुकीसाठी 287आमदार मतदान करणार असल्याने उमेदवारांच्या विजयासाठी 42 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. भाजपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 15 मताची तर शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 10 मताची आवशकता होती. त्यामुळे 10 जूनला हॊत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 10 जूनला मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यसभेच्या निवडणुकीत 287 पैकी 285 आमदारांनी मतदान केले होते. महाविकास आघाडीचे अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने परवानगी नाकारल्यानं मतदान करता आले नाही.

यावेळी मतदान करताना भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्या मतावर आक्षेप घेताना जयंत पाटील यांना मतपत्रिका दाखवल्याचा आरोप केला होता. तर यशोमती ठाकूर यांनी नाना पटोलेंना मतपत्रिका दाखवली असे भाजपने म्हटलं होतं. आमदार सुहास कांदे यांनीही मतपत्रिका दाखवल्याचं म्हणत त्यांचे मत बाद करण्याची मागणी भाजपने केली होती.

त्यानंतर महाविकास आघाडीकडून सुधीर मुनगंटीवार यांनी इतर नेत्यांना मतपत्रिका दाखवल्याचं म्हणत आक्षेप घेतला होता. याशिवाय अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा पुस्तिका दाखवून मतदारांना प्रभावित केल्याचा आक्षेप घेतला होता. यामुळे मतमोजणी थांबली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोपांची शहानिशा करण्यासाठी मतमोजणी थांबवली, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू असतानाचे रेकॉर्डिंग मागवले होते.

भाजप आणि महाविकास आघाडीने आक्षेप घेतल्यानंतर या प्रकरणाची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. भाजपने तक्रार दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणी थांबवण्याचे आदेश दिले. यावेळी निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्यानं शिवसेनेला (Shivsena) धक्का बसला. तर यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांच्या मतांवरील आक्षेप फेटाळून लावले गेले. त्यांची मते वैध असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलं. सुहास कांदे यांचं मत बाद ठरल्यानंतर 284 मतं वैध ठरली होती.

त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली त्यामध्ये भाजपचे पीयुष गोयल आणि अनिल बोंडे यांना सर्वाधिक प्रत्येकी 48 मते मिळाली. त्यानंतर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44 मते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना 43, शिवसेनेच्या संजय राऊत यांना 42 तर पहिल्या फेरीत धनंजय महाडिक यांना 27 तर संजय पवार यांना 32 मते मिळाली. त्यानंतर दुसऱ्या पसंतीचे मतमोजणीनंतर महाडिक यांनी बाजी मारली. महाडिक यांनी 42 मतांचा कोटा पूर्ण केला. त्यामुळे ते विजयी झाले.

या निवडणुकीची सर्व सूत्रे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली होती. त्यानुसार त्यांनी विजयाची रणनीती आखली. विजयासाठी 42 मतांचा कोटा ठरलेला असताना फडणवीस यांनी पीयुष गोयल आणि अनिल बोंडे यांना प्रत्येकी 48 मते दिली. तर महाडिक यांच्या पारड्यात केवळ पहिल्या पसंतीची 25 मते दिली होती. खरी खेळी त्यांनी त्याठिकाणी खेळली होती.

गोयल व बोंडेंना दिलेली पहिल्या पसंतीची सर्व 96 मते दुसऱ्या पसंतीसाठी महाडिक यांना दिली. या दुसऱ्या पसंतीच्या मताच्या जोरावर महाडिक या निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे भाजप नेत्यांनी आखलेली ही गणिती आकडेमोड या ठिकाणी सरस ठरली होती. त्यामुळे आज ही निवडणूक लक्षात राहते. यावेळी भाजपने सत्ताधारी पक्ष व काही अपक्षांची मते फोडत विजय मिळवला होता. विशेष म्हणजे विरोधी पक्षाकडे 112 मते असताना त्यांनी 11 अधिकची मते सत्ताधारी पक्षाची फोडताना 123 मते घेतली. त्यामुळे आजही ही निवडणूक या आकडेमोडीच्या कारणाने सर्वांच्या लक्षात राहते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT