स्थळ : बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना मंत्री छगन भुजबळ प्रचंड आक्रमक बोलत होते. त्यांच्या आक्रमकपणाचा निशाणा होता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर. तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरं गेला तर गेला पण जीआर काढून गेला.
विखेंनी जीआर काढून जरांगेंच्या हातात दिला, त्यात पात्र मराठा व्यक्तींना कुणबी म्हणून दाखला देण्यात यावा असं म्हटलं होतं. पण एकातासात पात्र हा शब्द काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूरमध्ये असताना विखेंनी परस्पर जीआरमधून हा शब्द कसा काय काढला? मला मुख्यंमत्र्यांना सांगायचं आहे की ही मंडळी तुमच्या वाईटावर आलेली आहेत. तुम्हाला अडचणी निर्माण करणारे आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाही देवेंद्र फडणवीस आहेत.
या मेळाव्यात फक्त भुजबळच नाही तर, लक्ष्मण हाके, धनंजय मुंडे या नेत्यांचाही टीकेचा रोख प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे विखे पाटील यांच्याकडेच होता. यापूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही विखे पाटील यांच्यावर अनेकदा निशाणा साधला आहे. एकूणच काय तर विखे पाटील मागील काही दिवसांपासून ओबीसी नेत्यांच्या रडारवर आले आहेत.
विखे पाटील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांच्यावर टीका होणे स्वाभाविक आहे. पण त्यांच्या समितीने काढलेल्या जीआरचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सर्व भाजप नेत्यांनी घेतले. भाजपने (BJP) तर फडणवीस यांची पानभर जाहिरात सगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिली होती. पण आता ओबीसी समाज जेव्हा टीका करत आहे ती मात्र केवळ विखे पाटील यांच्यावरच असं का? याच उत्तर शोधण्याचा आणि यामागील राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न 'सरकारनामा'ने केला आहे. यासाठी राजकीय विश्लेषकांची मते जाणून घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 सप्टेंबरच्या जीआर संदर्भात जी भूमिका मांडतात, तीच तंतोतंत भूमिका राधाकृष्ण विखे-पाटील यांचीही असते. एका शब्दानेही हेराफेरी करत नाहीत. तरीसुद्धा कथित ओबीसी नेते केवळ विखेंना टार्गेट करत आहेत, यातून नक्कीच काहीतरी राजकीय वास येत आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक अॅड. योगेश केदार यांनी दिली.
या जीआरमुळे ना नोंदी नसलेल्या मराठा समाजाला फायदा झाला, ना ओबीसीचे नुकसान झाले. तरीसुद्धा भुजबळ आणि त्यांचे सहकारी आरक्षण संपले असे बोलत आहेत. त्यांनी एकतरी पुरावा दाखवला का? ज्यामुळे हैदराबाद गॅजेट जीआरमुळे चुकीच्या पद्धतीने मराठ्यांनी प्रमाणपत्र मिळवले? त्या जीआरमध्ये कुणबी नोंदी संदर्भात केवळ प्रक्रिया विशद केली आहे. 2001च्या कायद्याच्या अनुषंगानीच तो जीआर असल्याचेही योगेश केदार यांनी सांगितले.
मग तरीही विखे पाटील का टार्गेट? याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले, 'राधाकृष्ण विखे पाटील यांचे वय 78 वर्ष इतके आहे. त्यामुळे ते पुढची निवडणूक लढण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे त्यांना मराठा नेता म्हणून मुख्यमंत्रीपदाची आस असणे स्वाभाविकच आहे. येत्या काळात जर राज्यात मराठा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी आणायचा ठरला तर विखे पाटील यांचा दावा मोठा असणार आहे. विशेषता गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या जवळचे नेते म्हणून वर्चस्व राखून होते. मात्र, फडणवीस यांनी या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांसाठी वाटाघाटीची संधी विखे-पाटील यांना दिली होती.
विखे पाटील यांनी त्यांना मिळलेल्या संधीचे सोने करीत आता जरांगे-पाटील यांच्याशी जवळीक वाढवत एक दोन वेळा भेटही घेतली आहे. विखेंना मराठी नेते म्हणून प्रोजेक्ट करताना फडणवीस यांनी एकीकडे एकनाथ शिंदे यांचे वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. त्यासोबतच शिवसेनाऐवजी भाजपमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाला असल्याचा प्रयत्न होत आहे तर दुसरीकडे भाजपमधून मुख्यमंत्री पदासाठी मराठा कार्ड म्हणून विखे पाटील यांचे नाव आघाडीवर राहू नये याच्यासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरून आता ओबीसी नेते विखे पाटील यांना टार्गेट करीत असल्याचे मतही देसाई यांनी व्यक्त केले.
विशेषतः गेल्या काही दिवसापासून सातत्याने ओबीसी नेत्याकडून विखे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केला जात असला तरी त्यांच्याकडून या नेत्यांवर काउंटर अटॅक केला जात नाही. त्यांना प्रत्युत्तर दिले जात नसल्याने आणखीनच टार्गेट केले जात आहे. भुजबळ एकेरी भाषेत हल्ला चढवत असताना विखे पाटील मात्र भेटून त्यांना मराठा आरक्षणाबाबत बोलतो, अशी मवाळ भूमिका विखे पाटील का घेत आहेत? याचे कोडे उलघडत नाही. ओबीसी नेत्यांनी मात्र विखेंच्या अडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले असले तरी त्यांचा रोष मात्र विखे पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात असल्याचे देसाई म्हणाले.
त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यापूर्वी कॅबिनेटमध्ये या जीआरवर चर्चा झाली होती. त्यावेळी झालेल्या या बैठकीस आक्रमक झालेले मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. मात्र, बैठकीत या जीआरला भुजबळ यांनी विरोध केला नाही अथवा त्याविषयी विरोध दर्शवणारा चकार शब्दही या बैठकीत काढला नसल्याची माहिती एका उच्चपदस्थ नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. म्हणजेच जिथे बोलायचे तिथे भुजबळ शांत असतात आणि जाहीरपणे विखे पाटील यांचे वाभाडे काढत आहेत, याचा अर्थ भुजबळ यांच्याही डोक्यात काही तरी वेगळंच आहे, असा घेतला तर वागवं ठरणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.