Nana Patole, balasaheb thorat, vijay vaddetivar, ramesh chennithla, Pruthvairaj chavan  Sarkarnama
विशेष

Congress News : काँग्रेसला उशिराने सुचलेले शहाणपण !

Sachin Waghmare

Political News : लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर जर टिकाव धरायचा असेल तर महाविकास आघाडीला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचे काँग्रेससमोर मोठे आव्हान होते. मात्र हे आव्हान काँग्रेस नेत्याने लीलया पेलले. सर्वांनी एकत्र यायला हवे, हे शहाणपण या निमित्ताने काँग्रेसला सुचले. त्यामुळे काँग्रेसने राज्यातील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याशी जुळवून घेतले.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर फारसे आढेवेढे न घेता जागावाटप केले. जागावाटपात प्रसंगी पडती भूमिका घेत शिवसेनेच्या (Shivsena) तुलनेत कमी जागा आल्या व छोट्या भावाची भूमिका स्वीकारण्याची वेळ आली, तरी तडजोड करीत भाजपच्या (Bjp) विरोधात या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसमधील (Congress) सर्व गट एकत्र येऊन लढत आहेत, हे चित्र वरवरचे दिसत असले तरी या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काँग्रेसला उशिराने सुचलेले शहाणपणच, असेच म्हणावे लागेल. (Congress News)

निवडणूक जाहीर होईपर्यंत देशभरात भाजपच्या बाजूने वातावरण असल्याचे सर्वत्र जाणवत होते. त्यामुळेच काँग्रेसने प्रत्येक निवडणुकी दरम्यान घेत असलेल्या त्यांच्या भूमिकेत बदल केला. त्यामुळेच त्यांनी भाजप विरोधक असलेल्या पक्षांची एकत्रित मोट बांधली आहे. गेल्या काही दिवसापासून काँग्रेसने रणनीती बदलली आहे. आतापर्यंत जागावाटपात मित्रपक्षासोबत घेतलेली ताठर भूमिका यावेळेस मवाळ केली. विशेषता जर वेळेस जागावाटप करताना शेवटपर्यंत मित्रपक्षासोबत ताणून धरण्याची भूमिका काँग्रेसने बदलली आहे.

भाजपच्या अक्राळविक्राळ आव्हानासमोर आता एकत्र आलो नाही तर या निवडणुकीत पराभव तर होईलच पण विरोधकांच्या भविष्यातील राजकारणावरही त्याचा गंभीर परिणाम होईल. या दबावाखाली काँग्रेस एका मर्यादेपलीकडे जाणार नाही, हा संदेश देताना आत्ताच एकत्र येण्यावाचून पर्याय नाही, हा संदेश वरिष्ठ नेत्यांनी पोहोचविला व त्याचा अपेक्षित परिणाम झाला. शिवसेना ठाकरे गट ज्या प्रकारे जागा मागत होता. त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळत नव्हत्या. मात्र, राज्यातील जनाधार जोडून ठेवण्यासाठी काँग्रेसने दोन पावले मागे येण्याची भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्रात आधी २० पेक्षा अधिक जागांवर अडून बसलेला काँग्रेस आता १७ जागा मिळाल्यानंतरही आनंदात आहे. त्यामागे मुंबईतील महत्वाच्या दोन जागा कारणीभूत आहेत. राज्यातील महायुतीच्या सरकारने विविध योजना थेट लाभार्थींपर्यंत नेण्याचा धडाका लावला, ते पहाता काँग्रेस नेत्यांना स्वबळावर निवडून येणे अशक्य असल्याची जाणीव झाल्याने त्यांचा सूरही बदलला. त्यासोबतच राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत पार पडला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यासोबत शिवसेना नेते उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार हे हिरारीने सहभागी झाल्याने राज्यातील चित्र काहीसे पलटले असल्याची जाणीव काँग्रेस नेत्यांना यात्रेत सहभागी झालेल्या नेतेमंडळींमुळे झाली.

महाविकास आघाडीतील पक्षाने एकमेकांना दिलेले इशारे, टीकाटिप्पणी आणि अनेक धक्क्यांनंतर अखेर आगामी लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची आघाडी निश्चित झाली आहे. समोर विरोधक नकोत, प्रश्न विचारणारी माध्यमे तर अजिबात नकोत. जनतेचे आशीर्वाद मला थेट मिळत असताना यांची गरजच काय, अशा मनस्थितीत भाजप नेते असतात. मात्र, विरोधी पक्ष नकोतच हे सशक्त लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. ‘इंडिया’नामक विरोधकांच्या खटाटोपाला घरघर लागत असताना या घडामोडींमुळे काँग्रेस नेत्याचा जीव भांड्यात पडला असेल. येणाऱ्या काळात राज्यातील महाविकास आघाडीचा काहीसा फायदा होईल, असे चित्र आहे.

राज्यातील जागावाटप करताना त्यांनी दरवेळेस प्रमाणे आढेवेढे न घेता लवकर जागावाटपाचा तिढा सोडवत उमेदवार जाहीर केले. त्यामुळे महायुतीच्या तुलनेत महविकास आघाडीच्या उमेदवारांना १५ दिवस ते महिनाभरचा अधिकचा वेळ मिळाला. त्या उलट यावेळेसच्या निवडणुकीत भाजपला व महायुतीला पाचव्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करण्याच्या शेवटचा दिवस उजडला. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला प्रचारासाठी फक्त १५ दिवसाचा कालावधी मिळणार आहे.

रमेश चेन्निथला यांनी राज्यात घातले लक्ष

काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी राज्याच्या राजकारणात पूर्णपणे लक्ष घातले आहे. त्यांनी वेळोवेळी काँग्रेस नेत्यांना योग्य पद्धतीने जबाबदारीचे वाटप करीत समन्वयाची भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेसला सांगलीची जागा सोडली नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. मात्र, हा तिढा त्यांनी सामोपचारने सोडवत सर्व नेतेमंडळीला प्रचारात उतरवले आहे.

त्यांनी काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण मोडीत काढत प्रत्येकाला लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देत पूर्णपणे सक्रिय केले आहे. त्याचा फायदा ग्राउंड लेव्हलवर दिसत आहे. प्रचार यंत्रणेपासून आतापर्यंत दूर राहत असलेले स्थानिक कार्यकर्ते मरगळ झटकून कामाला लागले असल्याने यावेळेस चित्र वेगळे दिसत आहे.

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्यानंतर भाजपच्या विरोधात या निवडणुकीत पहिल्यांदाच विदर्भात काँग्रेसचे सर्व गट एकत्र येऊन लढत आहेत. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर व सुनील केदार हे नेतेमंडळी एकवटले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. हे काँग्रेसमधील एकत्र दिसणारे चित्र कितपत मतदानात परिवर्तित होणार याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर तरी या लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण होईल का ? याची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे.

या निवडणुकीतीत महत्वाचे दोन टप्पे पार पडले असले तरी महत्वाची मुद्दे निवडणुकीत चर्चेत न आल्याने ही निवडणूक मुद्द्यावरून भरकटली तर जात नाही ना ? असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत तर विरोधक या प्रश्नावरून सरकारला घेरण्याची संधी असताना हे मुद्दे मांडत नसल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

शिवसेना व राष्ट्रवादी काँगेस पक्षात गेल्या काही दिवसात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांवर मर्यादा आल्या आहेत. दुसरीकडे तीन चार आमदार वगळता फारसे आमदार काँग्रेस सोडून बाहेर पडले नाहीत. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांची मोठी मदत होणार आहे.

सत्ताधाऱ्यांना घेरण्याची काँग्रेसकडे संधी

त्यामुळे येत्या काळात विविध मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी काँग्रेसकडे चालून आली आहे. या संधीचा लाभ घेत उर्वरित येत्या तीन टप्प्यात जर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत जर प्रचार केला तर त्याचा फायदा येत्या काळात काँग्रेस व पर्यायाने महाविकास आघाडीला होणार आहे. त्यामुळे राज्यात जर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून चांगले यश मिळवले तर काँग्रेससाठी उशीराने सुचलेले शहाणपण ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT