Maharahtra Mantralay  sarkarnama
विशेष

Maharashtra Law and Order: अपहरण, खून, खंडणी अन् गोळीबार...; महाराष्ट्रात 'खाकी वर्दी'चा धाक खरंच उरलाय ?

Rising crime in Maharashtra Kidnapping, murder, extortion, and shootouts : राज्यात गेल्या काही दिवसांत खून, खंडणी, गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही, सरकार काय करते आहे, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

अय्यूब कादरी

Mumbai News : राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर गेली आहे. पुण्यात भाजप आमदाराच्या मामांचे अपहरण करून खून, बीड जिल्ह्यात सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आला. निकाल लागून 21 दिवस झाले तरी मंत्र्यांची निवड झालेली नाही. महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाल्यामुळे विरोधकांचा आवाज क्षीण झाला आहे. त्यामुळे जाबा कोणाला विचारणार, कोण विचारणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बहुतांश शहरांमध्ये मुख्य रस्त्याला लागून किंवा मोक्याच्या ठिकाणी पोलिस ठाण्यांच्या इमारती असतात. पोलिस ठाण्यांच्या समोरूनही दुचाकीवर तिघे बसून सुसाट जात असतील, तर लोकांच्या तोंडून बाहेर येणारी सहज प्रतिक्रिया असते, पोलिसांचा धाकच राहिला नाही! याचा दुसरा अर्थ असा की पोलिस असे प्रकार थांबवू शकतात. राज्यात गेल्या काही दिवसांत खून, खंडणी, गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही, सरकार काय करते आहे, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सरकार काय करत आहे? तर सरकार सत्तास्थापनेच्या लगबगीत आहे. कोणाला मंत्री करायचे, कोणाला कोणते खाते द्यायचे, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे द्यायची, या चिंतेने सत्ताधाऱ्यांना ग्रासून टाकले आहे. 288 पैकी 230 जागा जिंकूनही विरोधकांचे काही आमदार आपल्या बाजूला घेण्यासाठीची तयारी सरकार करत आहे. एकूण काय तर, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला (Mahayuti) पाशवी बहुमत दिले आणि महायुतीने मतदारांना गृहित धरल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाले तरी मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही.

भाजपच्या (Bjp) विधानसभा सदस्याच्या मामांचे अपहरण करून खून करण्यात आला. पुण्यातील या प्रकाराने पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे निघाले. यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील एका सरपंचाचे अपहरण करून त्यांचाही निर्घृण खून करण्यात आला. खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका मातब्बर नेत्याचा निकटवर्तीयावर गुन्हा दाखल झाला आहे. बीडमध्येच विरोधी आमदाराच्या एका कार्यकर्त्याने एका घरात घुसून गोळीबार केला. काय सुरू आहे राज्यात? लोक आणि सरकार याचा विचार करत असतील का?

मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि शपथविथी कधी होणार, हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मंत्र्यांची निवड, खातेवाटप रखडले आहे. साहजिकच त्याचा परिणाम राज्याच्या कारभारावर झाला आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यासारख्या शहरातून भाजप आमदारांच्या मामांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. आरोपी पकडले, खुनाचे कारण कळले असले तरी शहरातून एका आमदारांच्या मामाला उचलण्याची गुन्हेरागारांची हिम्मत होते कशी, असा प्रश्न आहे.

पुण्यात काही महिन्यांपूर्वी पोर्शे कारचे हिट अँड रन प्रकरण देशभरात गाजले होते. नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली होती. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांसह सरकारी यंत्रणा कशी कामाला लागली होती, हे सर्वांनी पाहिले आहेत. अशा प्रकारांमुळे गुन्हेगारांवरील धाक कमी होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. पोर्शे कार हिट अँड रननंतर राज्यातील अन्य काही भागांतही असे प्रकार घडले होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या खुनाने राज्याला हादरवून सोडले आहे. केज तालुक्यातील मस्साजोग या गावाच्या तरुण सरपंचाचे भरदिवसा अपहरण करण्यात आले, त्यांचा खून करण्यात आला. त्यांचा मृतदेह पोलिसांना रस्त्याकडेला आढळला. बीडचा बिहार झाला आहे, अशी टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. खासदार सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. सरकारला नागरिकांच्या सुरक्षिततेची चिंता आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला पाहिजे आणि तो सरकारलाही विचारला गेला पाहिजे.

विधानसभा निवडणुकीच्या आधीही राज्यात कायदा सुव्यवस्थेची अशी स्थिती निर्माण झाली होती. पुणे आणि काही शहरांत हिट अँड रनचे प्रकार घडले होते. पुण्यात खुनाचे प्रकारही घडले होते. महायुतीला स्पष्ट नव्हे, पाशवी बहुमत मिळाले. त्याची कारणे काय आहेत, हा भाग वेगळा, मात्र कायदा सुव्यवस्थेची स्थिती वरचेवर चिंताजनक होत आहे, हेही तितकेच खरे आहे. सरकारला ठामपणे जाब विचारू शकतील, इतकेही आमदार लोकांनी विरोधकांचे निवडून दिले नाहीत. त्यामुळे लोकांचा आवाज क्षीण होणार, हे लक्षात घेतले पाहिजे. मोठे बहुमत मिळाल्यामुळे सरकारची जबाबदारी वाढली असून, विरोधकांचा आवाज क्षीण झालेला असला तरी सरकारने लोकांच्या प्रश्नांकडे, वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT