Raosaheb Danve, Lal Krishna Advani Sarkarnama
विशेष

Raosaheb Danve : राम मंदिर आंदोलन अन् संसदेवरील हल्ल्याचा प्रसंग अडवाणींनी कसा हाताळला; रावसाहेब दानवे आठवणीत रमले

Tushar Patil

Jalna Political News : नव्वदीच्या काळात भाजपने राम मंदिर आंदोलन व रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हिंदुत्वाची लाट निर्माण करणारे लालकृष्ण अडवाणी हे एकमेव नेते होत. जनसंघ ते भाजप अशा राजकीय प्रवासात अडवाणी यांचा सहवास, मार्गदर्शन लाभलेले आणि त्यांच्यासोबत काम केलेले देशातील मोजक्या नेत्यांमध्ये सध्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचाही समावेश होतो. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात देशभरात काढलेल्या जनचेतना यात्रेचे मराठवाड्यातील नेतृत्व केल्याचे सांगून दानवेंनी लालकृष्ण अडवाणींच्या आठवणीत रमले.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात काम करण्याची संधी मिळालेले दानवे हे महाराष्ट्रातील एकमेव भाजपचे नेते आहेत. आता अडवाणींना भारतरत्न मिळाल्यानंतर दानवेंनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत अडवाणींच्या कामाच्या पद्धतीचा 'सरकारनामा'शी बोलताना उलगडा केला.

ते म्हणाले, आज अयोध्येत जे राम मंदिर साकारले आहे, त्यासाठी तत्कालीन भाजपचे जेष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनी मोठ्या प्रमाणावर त्याग, समर्पण व देशभर जनजागृती केली.

लालकृष्ण अडवाणी हे 90 च्या दशकात रथयात्रेदरम्यान भोकरदन येथे आले होते. तो माझा भाजपमधील उमेदीचा काळ होता. शहरातील पोलिस स्टेशनसमोर अडवाणी यांची सभा झाली होती. त्यानंतर 1999 च्या लोकसभा निवडणुकीत मी खासदार झाल्यानंतर अडवाणी देशाचे गृहमंत्री होते. त्यावेळेस संसदेत त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला. अत्यंत प्रतिभावंत व राजकीय उंची असणारे नेते, तळागाळातील कार्यकर्त्यांची कशी काळजी घेतात हे अनुभवले, असेही दानवेंनी (Raosaheb Danve) सांगितले.

संसद हल्ल्यावेळी खासदारांना दिला धीर

संसद हल्ल्याच्या वेळी आम्हा सर्व खासदारांना लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांनी धीर दिल्याची आठवण दानवेंनी आवर्जून सांगितली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भोकरदन येथील निवासस्थानी लालकृष्ण आडवाणींनी भेट दिल्याची आठवणही त्यांनी सांगितली. 2003 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात भाजपची भव्य सभा झाली होती. तेव्हा लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी शहरातून रॅली काढली होती, त्यात सहभागी होतो, असेही दानवे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्षाकडून लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात 2011 मध्ये काँग्रसच्या भ्रष्टाचाराविरोधात देशाच्या विविध भागात 'जनचेतना यात्र' काढण्यात आली होती. ती यात्रा 38 दिवस अन् तब्बल साडेसात हजार किलोमीटरची होती. त्या यात्रेचे मराठवाड्याचे नेतृत्व माझ्यावर सोपवण्यात आले होते. भाजप आज जगामध्ये क्रमांक एकचा पक्ष झाला असून याची मुहूर्तमेढ लालकृष्ण अडवाणी यांनी रोवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या पक्षाला व्यापक स्वरूप मिळाले, याकडेही दानवेंनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT