Supriya Sule - Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Ajit Pawar Vs Supriya Sule : अजितदादांची 2019 च्या निवडणुकीपूर्वीच 'तयारी', त्यावेळी सुप्रियाताईंचा विषयच नव्हता !

अय्यूब कादरी

Political news : राज्यात 2019 ते 2024 दरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींची इतिहासात वेगळी आणि ठळक नोंद होणार आहे. थक्क करून टाकणाऱ्या घडामोडींनंतर आता लोकसभा निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा नागरिकांना लागलेली आहे. आपण केले ते कसे योग्य होते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न पक्षातून फुटलेल्या गटांकडून लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरूच राहिला.

शिवसेना - भाजपची अभेद्य वाटणारी 25 वर्षांपासूनची युती 2019 मध्ये संपुष्टात आली. असे होईल हे कोणालाही वाटले नव्हते. प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद विभागून घेणे आणि निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी केलेला कथित प्रयत्न, यामुळे युती तुटली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपदी राहिलेल्या एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षांनंतर ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार बाजूला सारल्याची प्रचीती आली. त्यामुळे ते शिवसेनेतून 40 आमदारासंह बाहेर पडले आणि भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे मतदार आणि कार्यकर्ते फुटीला फार गांभीर्याने घेतात, याची जाणीव शिंदे आणि त्यांच्या आमदारांना होतीच.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या फुटीचीही वेगवेगळी कारणे देण्यात आली. तो सिलसिला अजूनही सुरूच आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले, विचारधारेशी तडजोड केली, उद्धव ठाकरे भेटत नव्हते, अर्थमंत्री अजितदादा पवारांकडून निधी मिळत नव्हता ही आणि अशी अनेक कारणे बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी दिली. विशेष म्हणजे, अजितदादा पवारही त्यांच्या पक्षातून फुटून या सरकारमध्ये सहभागी झाले आणि पुन्हा अर्थमंत्री झाले. त्यामुळे शिवसेनेच्या या आमदारांची कोंडी झाली, मात्र त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता. परिणामी, त्यांना परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागले. ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांवर केलेले हल्लेही महाराष्ट्राने पाहिले आहेत. तेही अजून सुरूच आहेत.

शिवसेनेनंतर फुटीची लागण राष्ट्रवादी काँग्रेसला लागली. अजितदादा पवार यांच्यासह 40 आमदार बाहेर पडले. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पक्ष, चिन्ह मिळाले. तसेच अजितदादांनाही मिळाले. पक्ष सोडताना ठोस कारण द्यावे लागते, अन्यथा लोकांच्या नाराजीची फटका बसू शकतो. त्यामुळे अजितदादांकडूनही कारणे देण्यात आली. किती दिवस वाट पाहायची, असे एक कारण होते. वय झाल्यामुळे शरद पवार यांनी बाजूला व्हावे आणि पक्षाची कमान आपल्या हातात द्यावी, अशी अजितदादांची इच्छा होती. त्यानंतरही विविध नेत्यांकडून वेगवेगळी कारणे देण्यात आली. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. फुटीच्या कारणांची मालिका लांबतच गेली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (अजितदादा पवार गट) उमेश पाटील यांनी राज्यातील शेवटच्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशी वेगळेच कारण दिले. महाविकास आघाडीचे सरकार असताना अडीच वर्षांनंतर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याची योजना होती. यासाठी ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात येणार होते. ते नाराज होतील म्हणून ही योजना उघड करण्यात आली नव्हती, असे पाटील यांनी म्हटले आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात याबाबत डील झाली होती. सुप्रिया सुळे यांचे नाव उघड केले असते तर पक्ष त्याचवेळी फुटला असता, म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही डील गुप्त ठेवली होती, असाही दावा उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेस फुटून एक वर्ष होत आल्यानंतर पाटील यांना हा दावा केला आहे. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजितदादा पवार यांचा विरोध होता, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे.

आता एक महिना मागे जाऊयात. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली. प्रचारात त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनीही पुढाकार घेतला होता. राणजगजितसिंह पाटील हे दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत.

डॉ. पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी. राणजगजितसिंह पाटील यांनी विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तो संदर्भ देत त्यांचे पुत्र मल्हार पाटील हे अर्चनाताई यांच्या प्रचारसभेत म्हणाले होते, की अजितदादा पवार यांनीच आम्हाला 2019 मध्ये भाजपमध्ये पाठवले आणि नंतर ते भाजपसोबत आले. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे, अशी पुष्टीही मल्हार पाटील यांनी जोडली होती.

आता खरे कोण? प्रवक्ते उमेश पाटील की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील? मल्हार पाटील म्हणतात त्यानुसार 2019 च्या निवडणुकीच्या आधीपासूनच राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची अजितदादांची योजना होती. त्यावेळी तर महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांच्यानंतर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री... असे विषय नव्हतेच. त्यामुळे पाटील यांचा दावा आश्चर्यकारक म्हणावा लागेल.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीला आम्ही (भाजप) जबाबदार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राज्यातील प्रचारसभेत स्पष्ट केले होते. शरद पवार यांचे पुत्रीप्रेम आणि उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे ते पक्ष फुटले असेही ते म्हणाले होते. आता उमेश पाटील हे एक वर्षानंतर अमित शाह यांच्यासारखेच कारण देत आहेत. पक्ष फुटले हे लोकांना आवडले होते की नाही, याचा निकाल चार जून रोजी लागणार आहे. त्यामुळे नेत्यांनी आता कारणे देणे थांबवलेलेच योग्य राहील.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT