Mumbai News : मराठवाड्याची ओळख काँग्रेसचा बालेकिल्ला अशीच होती. मात्र, कालांतराने या गडाला भाजपने सुरुंग लावला. विशेषतः काँग्रेसने मराठवाड्यातील तीन मुख्यमंत्री राज्याला दिले. त्यासोबतच केंद्रीय मंत्रीपद देखील दिले. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेसला धक्क्यावर धक्के दिले. त्यामुळे काँग्रेसच्या गडावर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. विशेषतः माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर आजही काँग्रेससोबत कायम आहेत.
चार दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकरांनी (Shivraj Patil) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबीयांसह भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असली तरी शिवराज पाटील चाकूरकरांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनंतर आता पीएम नरेंद्र मोदींशी जवळीकता कायम ठेवली आहे. दोघेजणही वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी त्यांच्यातील संबंध पूर्वीही व आजही चांगले असल्याचे दाखवत त्यांनी या भेटीतून जुन्या स्मृतींना उजळा दिला.
काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची ओळख सात वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळणारे नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, गृहमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल अशी राहिली आहे. दरम्यान, त्यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनीच भाजपमध्ये प्रवेश करत 2024 मध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. काँग्रेसच्या अमित देशमुख यांना कडवी झुंज त्यांनी दिली, मात्र त्यांचा पराभव झाला. सूनबाई भाजपमध्ये (Bjp) गेल्या तरी त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही. सध्या चाकूरकर हे काँग्रेससोबत एकनिष्ठ आहेत.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजकारणात स्वतःची वेगळी प्रतिमा नेहमीच जपली आहे. वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांसोबत त्यांनी राजकारणापलीकडील नातं कायम जपले आहे. देशात 1996 नंतर भाजपच्या पुढाकाराने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले. त्या काळापासून चाकूरकर यांनी तात्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत देखील चांगले संबंध जपले होते. या संबंधाचा त्यांना त्याकाळी फायदाच झाला होता.
1999 सालच्या लोकसभा निवडणुकीत लातूर येथे शाहू कॉलेजच्या मैदानावर अटलबिहारी वाजपेयी यांची भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या सभेत वाजपेयी यांनी चाकूरकर यांच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. त्यांचा उल्लेख 'चांगला माणूस' असा वाजपेयी यांनी केला मात्र त्यांचा पक्ष चुकीचा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या निवडणुकीत वाजपेयी यांनी केलेल्या भाषणाचा चाकूरकरांना फायदा झाला व ते पुन्हा लोकसभेवर निवडून आले.
त्यानंतरच्या काळात केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना 2010 ते 2015 दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते. विशेष बाब म्हणजे 2014 साली केंद्रातील काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्यावेळी लगेचच भाजप सरकारने काँग्रेसच्या काळात नेमलेल्या राज्यपालांकडील पदभार काढून घेतला होता. मात्र, पंजाबचे राज्यपाल असलेलया चाकूरकर यांच्याकडील पदभार पीएम नरेंद्र मोदी यांनी काढून घेतला नव्हता. चाकूरकर यांनीच कारकीर्द पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.
आठ दिवसापूर्वी दिल्लीत एक साहित्य संमेलन पार पडले. या कार्यक्रमास चाकूरकर हे रसिकांमध्ये बसले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपिठावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी चाकूरकर यांच्याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या सुनबाई अर्चना पाटील यांच्याकडेही चौकशी केली. या संमेलनात गर्दी असल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर चाकूरकर यांनी त्यांची वेळ घेऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बराच वेळ दिला. यावेळी त्यांनी विविध विकास कामांवर चर्चा केली.
पंतप्रधान मोदी यांची शिवराज पाटील-चाकूरकर यांनी सहकुटुंब भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या असल्या तरी या भेटीवेळी शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसभेचे सभापती असताना केलेल्या नव्या संसद भवनाच्या निर्मितीच्या प्रस्तावाचा पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे या दोघांमध्ये विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. त्याचवेळी चाकूरकर कुटुंबियांच्या वतीने पीएम मोदी यांना यावेळी लातूरमधील निवासस्थानी भेटीचे निमंत्रण देण्यात आले.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.