Harshvardhan sapkal, ekanth shinde, devendra fadnavis  Sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde : नाराजी, शीतयुद्ध अन् आता शिंदेंचे 'पॅचअप'? सीएम फडणवीसांच्या बचावासाठी रुद्रावतार !

eknath Shinde Patchup News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केली आणि शिंदे यांनी ही संधी साधली. सपकाळ यांच्यावर आक्रमक टीका करत शिंदे यांनी फडणवीस यांच्याशी शीतयुद्ध संपल्याचे संकेत दिले आहेत.

अय्यूब कादरी

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतुयद्ध सुरू होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केली आणि शिंदे यांनी ही संधी साधली. सपकाळ यांच्यावर आक्रमक टीका करत शिंदे यांनी फडणवीस यांच्याशी शीतयुद्ध संपल्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवरायांबाबत अवमानकारक भाषा वापरण्यात आली होती, त्यावेळेस मात्र शिंदे आजच्याइतके आक्रमक झाल्याचे दिसले नव्हते.

काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली. प्रस्थापित नेत्यांना डावलून सपकाळ यांना ही संधी देण्यात आली, त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या निवडीचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. सपकाळ हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत. त्यांची वक्तृत्वशैली आक्रमक नसेलही, मात्र ते मुद्द्यांना व्यवस्थित हात घालतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी केली होती.

सपकाळ यांनी केलेली ही तुलना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागण्यासारखीच होती. विरोधकांचा आवाज क्षीण झालेला असताना मुख्यमंत्र्यांवर असा थेट हल्ला करून सपकाळ यांनी लक्ष वेधून घेतले होते. फडणवीस यांचा बचाव करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभागृहात मैदानात उतरले, त्यांनी आक्रमकपणे सपकाळ यांना प्रत्युत्तर दिले आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी सपकाळ यांची निवड करण्याचा निर्णय घेणाऱ्या पक्षश्रेष्ठींनी सुटकेचा श्वास सोडला असणार. आपण केलेली निवड सार्थ आहे, याची प्रचीती त्यांना आली असणार.

प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे कामाला लागले आहेत. बीड जिल्ह्यात त्यांनी सद्भावना यात्रा काढली. कादी दिवसांपूर्वीच त्यांनी फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभारासोबत केली होती. ते म्हणाले होते, 'औरंगजेब क्रूर शासक होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही तेवढेच क्रूर आहेत. औरंगजेब नेहमी धर्माचा आधार घेत होता, मात्र तो कधीही हजला गेला नव्हता. देवेंद्र फडणवीस हेही औरंगाजेबाइतकेच क्रूर आहेत. फडणवीस नेहमीच धर्माचा आधार घेतात.' सपकाळ यांच्या या टीकेला भाजपकडून उत्तर देण्यात आले होते.

सपकाळ यांच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड भडकले. 'औरंग्याची तुलना फडणवीसांशी कशी करता, त्यांनी तुमचे डोळे काढले का?' असा प्रश्न त्यांनी सभागृहात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला. सपकाळ यांना सोडणार नाही, असेही शिंदे म्हणाले. अमुक याला सोडणार नाही, असे बोलण्याचा हल्ली प्रघात पडला आहे. एखाद्याची चूक असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. मी त्याला सोडणार नाही, अशी गल्लीत वापरली जाणारी भाषा आपल्या राज्याचे मोठे नेते आता वापरायला लागले आहेत.

महायुतीच्या (Mahayuti) अंतर्गत कुरघोड्यांमध्ये एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून दुरावल्याचे चित्र दिसत होते. तुलनेने अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची चांगली गट्टी जमल्याचे चित्र आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक बाबी शिंदे यांच्या मनाविरुद्ध घडल्या होत्या. त्यामुळे शिंदे नाराज झाले होते. शिंदे किंवा अजितदादाही नाराज झाले तरी भाजपला कोणताही फरक पडणार नव्हता, कारण भाजपचे संख्याबळच तसे आहे, ही वस्तुस्थिती ओळखून अजितदादांनी अगदी पहिल्या दिवसापासून फडणवीस यांच्यासोबत जुळवून घेतले होते.

उशीरा का होईना शिंदे यांनीही वस्तुस्थितीचा स्वीकार केल्याचे दिसत आहे. सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर केलेला हल्ला त्यामुळेच शिंदे यांनी आज परतवून लावण्याचा प्रयत्न केला. भाजप आणि फडणवीस राजकारणासाठी धर्माचा आधार घेतात, हे कुणीही नाकारू शकत नाही. फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना यावर वादविवाद होऊ शकतो. सपकाळ यांनी हे हेरून अतिशय शांतपणे हल्ला केला होता. तो समस्त महायुतीच्या जिव्हारी लागला आहे, हे शिंदे यांच्या आक्रमक बाण्याने दाखवून दिले आहे.

किती ती काँग्रेसची विधानसभेतील ताकद? जेमतेम 16 आमदार! अशा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची किती ती दखल घ्यायची? पण मुद्दाच असा होता की प्रदेशाध्यक्षांची दखल घ्यावी लागली. महाविकास आघाडीली जे जमले नाही ते सपकाळ यांच्या एका वाक्याने करून दाखवले. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षाचे एक मंत्री, एक आमदार सामाजिक सौहार्दाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री या नात्याने अजितदादांनी या मंत्र्यांना खडसावले, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र ब्र ही काढला नव्हता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात काहीजणांनी वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्या प्रसंगातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच्याइतके आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते. फडणवीस यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना करणाऱ्या सपकाळ यांच्याविरोधात मात्र शिंदे प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. फडणवीस यांच्याबाबतचा रूसवा दूर झाला आहे, हे दाखवून देण्यासाठीच शिंदे यांनी सपकाळ यांच्याविरोधात आक्रमक बाणा धारण केला असेल का, असा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT