Raj-Uddhav Thackeray Alliance News Sarkarnama
विश्लेषण

Thackeray brother message update: सगळं ठरलंय! आता ठाकरेंचा संदेश नव्हे, थेट बातमीच बाहेर येणार...

Maharashtra politics News : गेल्या दोन महिन्यापासून राज व उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

Thackeray latest news : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव व राज ठाकरे या बंधूंच्या दृष्टीने महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत काहीसे यश मिळवलेल्या उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत मोठा फटका सहन करावा लागला तर राज ठाकरेंच्या मनसेला दोन्ही निवडणुकीत फारशी दमदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँडचे अस्तीतत्व टिकवून ठेवण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे.

त्यामुळे ठाकरे बंधूकडून युतीबाबत सावध पावले उचलली जात आहेत. या युतीबाबत संपूर्ण राज्यातील जनतेच्या मतांची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे या युतीच्या घोषणेला उशीर लागत असला तरी दोन्ही बाजूंचा विचार करूनच ठाकरे बंधू युतीबाबत संदेश नाही तर थेट बातमीच देणार का ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून राज व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मराठी माणसाच्या प्रश्नावर सातत्त्याने आवाज उठवत असलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे आगामी काळात एकत्र येत मत विभागणी टाळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोन महिन्यापूर्वी राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्युबला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरून आम्ही एकत्र येऊ शकतो, असे सांगत टाळी दिली होती तर त्यानंतर काही वेळातच त्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील एकत्र येण्यासाठी तयारी असल्याचे सांगत मैत्रीचा हात पुढे केला होता.

मुंबई महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची मुंबईत मोठी ताकद होती. मात्र, आता भाजपची ताकद मुंबईत वाढली आहे. शिवसेनेत दोन वर्षापूर्वी पडलेल्या उभ्या फुटीनंतर ठाकरे गटासाठी पूर्वीप्रमाणे निवडणूक आता सोपी राहिली नाही. त्यामुळे या सगळया परिस्थितीचा विचार केला तर शिवसेना व मनसेला मराठी मतावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळेच आता ठाकरे बंधू एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी साथ दिली होती. तर विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसेला महायुतीत स्पेस नाही. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना व मनसेमध्ये फारसे सख्य नसल्याने महायुतीमध्ये काही तडजोड होऊन राज ठाकरेंना सोबत घेता येईल का? या दृष्टीने चाचपणी करण्यात आली.

त्यानंतर महेश मांजरेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत आली. त्यामध्ये मराठी माणसाच्या मुद्दयावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दाखवली. त्यानंतर अवघ्या तासाभरातच संधी साधत उद्धव ठाकरे यांनी सकरात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे सध्या तरी ठाकरे बंधू एकत्र येतील, असा कयास राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही मराठी अस्मितेचा मुद्दा आपापल्या पद्धतीने मांडत आले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणसाच्या हक्कावर, रोजगारावर आणि अस्मितेवर चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे, आणि अशा वेळी हे दोन बंधू पुन्हा एकत्र येतील का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.

यापूर्वी एकदा 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप व शिवसेना युती तुटल्यानंतर अचानक मनसे व शिवसेना युतीची चर्चा झाली होती. काही जागांचे वाटपही झाले होते. मात्र, ऐनवेळी मनसे व शिवसेना यांच्यातील बोलणी फिस्कटली होती. त्यामुळे या युतीबाबत राजकीय वर्तुळातून शंका उपस्थित केली जात आहे.

त्यानंतर मात्र यावरून उद्धव ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेतच दोन पक्षाच्या युतीयाबाबत मोठे विधान केले आहे. दोघाच्या मनात कोणताच संभ्रम नाही. गेल्या दोन दिवसातील चर्चा पाहता आता पावले पुढचं पडणार आहेत. महाराष्ट्रच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल, असे स्पष्ट करीत लवकरच युतीबाबत संदेश नाही तर थेट बातमीच देणार असल्याचे सांगितल्याने आता सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली असल्याने या दोन पक्षात चर्चा सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या पक्षाकडून याबाबत कोणच थेट प्रतिक्रिया देत नाही. वेळप्रसंगी राज ठाकरे याविषयी थेटच बोलणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याला दुजोरा मिळत आहे.

मनसे व ठाकरे सेनेच्या युतीबाबतच्या चर्चानी जोर धरला असतानाच राज-उद्धव ठाकरे बंधू विदेश दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे चर्चा पुढे सरकली नव्हती. त्यानंतर चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली असावे असे सांगत आणखी एक बॉम्ब फोडला होता. त्यामुळे दोन पक्षाच्या एकत्र येण्याविषयी पुन्हा चर्चाना वेग आला आहे.

दुसरीकडे आतापर्यंत दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर एकही शब्द न बोलणारे मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर संजय राऊत यांचे 'नरकातील स्वर्ग' हे पुस्तक वाचत असल्याचे ट्विट केले. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणातच युतीबाबतचा प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आला तर राज ठाकरे १०० मीटर पुढे सरकतील, असे सूचक संकेत संदीप देशपांडे यांनी दिले होते.

भविष्यात ठाकरे ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी उद्धव व राज ठाकरे हे दोघेही योग्य निर्णय घेतील, असे काही जणांना वाटते. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची किमया व त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी नक्कीच त्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची इगो जरी मोठी असले तरी ते एकत्र आल्यानंतर बरेच प्रश्न सुटणार आहेत.

मुंबईतील मराठी मतांची टक्केवारी ३५ टक्के इतकी आहे. तर मुस्लिम मतदार १९ टक्के इतके आहेत. दोन्ही मिळून जवळपास ५४ टक्के मते आहेत. मात्र, हे दोन्ही समाजाचे एकत्रित मतदान कोणत्याच एका पक्षाला होणार नाही. मात्र, मनसे व शिवसेनेत मराठी मताचे होणारे विभाजन टाळता येणार आहे. राज व उद्धव ठाकरे एकत्रित आल्यानंतर हिंदूंची मते त्यांना पडतील. मात्र, मुस्लिम समाजाचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार याकडेही लक्ष असणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी होता. दुसरीकडे राज व उद्धव यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढली तर त्यांची महायुतीसोबत सरळ लढत होणार का? काँग्रेस आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढणार यावर बरेच काही अवलंबुन असणार आहे. एकंदरीत मुंबईतील नागरिकांची लोकभावना पाहिली तर राज व उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत या दोघांना मोठा फायदा होईल.

येत्या काळात वक्तृत्व शैलीच्या जोरावर राज ठाकरे यांचा असलेला करिश्मा व त्याला उद्धव ठाकरे यांची संघटनात्मक पातळीवरील जोड या दोन्हीची सांगड घालता आली तर निश्चितच आगामी निवडणुकीत त्यांना फायदा होईल. येत्या काळात दोघांनी एकत्र आल्यास मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT