Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप होऊन महिना उलटून गेल्यानंतरही महायुती सरकारकडून पालकमंत्रिपदाचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षाकडून या दिरंगाईबद्दल सरकारला धारेवर धरले जात आहे. महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच असल्याने हे वाटप रखडल्याचे समजते. विशेषतः राज्यातील रायगड, बीड, सातारा,जळगाव यासारख्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुती सरकारमधील तीन घटक पक्षामध्ये वाद आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले. त्यानंतर घवघवीत बहुमत मिळालेल्या महायुतीने सत्तास्थापन केली. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार दहा ते 12 दिवस रखडला होता. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 मंत्र्यांनी शपथ घेतली.त्यानंतर खातेवाटपावरून महायुतीमधील घटक पक्षात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली.
महायुती सरकारमधील तीन घटक पक्षामुळे आठ दिवस खातेवाटप रखडले होते. त्यानंतर गेल्या सरकारमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली बहुतांश खाती तशीच राहिली. महायुती सत्तेवर येऊन जवळपास 30 दिवस उलटल्यानंर खातेवाटप झाले. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मंत्रिमंडळ लवकर स्थापन होईल, खातेवाटप मार्गी लावून सरकार कामाला लागेल, असे वाटत होते पण प्रत्यक्षात मात्र उशीर झाला मुख्यमंत्री वगळता बाकी सगळेच बिनखात्याचे मंत्री होते. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर 21 डिसेंबरला खातेवाटप जाहीर करण्यात आले.
राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला आहे. दुसरीकडे आठ दिवसावर प्रजासत्ताकदिन आला असला तरी जिल्हा मुख्यालयात आता कोणाच्या हस्ते ध्वजवंदन होणार हा प्रश्न सतावत आहे. काही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून वाटपावरून महायुतीच्या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाबाबत वाद आहेत, त्यावर या बैठकीत तोडगा काढत पालकमंत्रिपदे जाहीर केली जाणार असल्याचे पुढे येत आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर यासंदर्भात येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन पालकमंत्रिपदाबाबत अंतिम चर्चा करून नावे निश्चित करण्याचे महायुतीच्या नेत्यांनी ठरवल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वत: ही नावे जाहीर करणार आहेत. रायगड, बीड, सातारा,जळगाव यासारख्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून वाद असल्याचे समजते.
सातारा जिल्ह्यात तब्बल चार मंत्री असून यात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे या चारही मंत्र्यांपैकी कोणाला पालकमंत्रिपद द्यायचे, यावरून रस्सीखेच सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय सावकारे असे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. या तिघांमध्ये जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही.
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन मंत्री पालकमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. मात्र संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. बीडमधील हत्याप्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनीच पालकमंत्रिपद स्वीकारावे, अशी मागणीही केली जात आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबत सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
रायगड जिल्ह्याच्या पाल्कमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी पालकमंत्रिपद कायम ठेवणार की शिंदे गटाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
प्रजासत्ताकदिन जवळ आला आहे. या दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येते. त्यामुळे सरकारकडून पालकमंत्रिपदाची नावे येत्या काही दिवसांत जाहीर होणे आवश्यक आहे. पालकमंत्री ठरवण्यासाठी महायुतीमधील तीन घटक पक्षांची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत यावर तोडगा काढण्यात येणार आहे.
या बैठकीत यामधून मार्ग निघाला नाही तर ध्वजवंदनासाठी तात्पुरत्या स्वरूपात मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत, असेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या महायुती सरकारच्या काळात पालकमंत्रिपदावरून घोळ सुरू होता. त्यावेळी जिल्ह्यातील काही वरिष्ठ मंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी काय केले जाणार याची उत्सुकता लागली असतानाच आठ दिवसावर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताकदिनी कोणाच्या हस्ते ध्वजवंदन होणार हा प्रश्न सतावत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.