Raj Thackeray sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ धडाडली, पण लक्ष्य भेदलेच नाही ! सेफ गेम खेळत, महापालिकेसाठी पर्याय ठेवला खुला ?

Raj Thackeray political strategy News : राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार का? याची उत्सुकता लागली होती. मात्र, त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत चकार शब्दही न काढता मेळाव्याला उपस्थित असलेल्या मनसे कार्यकर्त्यांची मोठी निराशा केली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मनसे नेते राज ठाकरे यांचा गुढी पाडवा मेळावा रविवारी शिवाजी पार्कवर उत्साहात पार पडला. या मेळाव्यातून विविध विषयांना हात घालत राज ठाकरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत जोरदार टीका केली. यावेळी औरंगजेबाची कबर, ईव्हीएमपासून ते मराठी भाषेपर्यंतच्या सर्वच विषयवर चौफेर फटकेबाजी केली. दुसरीकडे मात्र, त्याचवेळी कार्यकर्त्यांना थेट आदेश देत राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार का? याची उत्सुकता लागली होती. मात्र, त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत चकार शब्दही न काढता मेळाव्याला उपस्थित असलेल्या मनसे कार्यकर्त्यांची मोठी निराशा केली.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होतील, असे गृहीत धरून सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. सर्वच पक्ष महापालिका निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पार पडला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने जमलेल्या जनसमुदयाच्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधारी व विरोधकावर जोरदार टीका केली.

यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात गाजत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर भाष्य करताना कबर खोदून काढण्याची भाषा करणाऱ्याना त्यांच्या भाषेत उत्तर दिले. औरंगजेबच्या कबरीबाबत काय करावे? याची रोखठोक सूचना मांडली. औरंगजेबची कबर उखडून टाकण्यापेक्षा त्या ठिकाणी मोठा बोर्ड लावा. ज्यामुळे इतिहास आम्हाला आणि येणाऱ्या नवीन पिढीला समजेल, या बाबतचा सल्ला त्यांनी दिला.

गंगेचे पाणी प्रदुषण असलेल्या म्हणत राज ठाकरेंनी गंगेची सद्यस्थिती काय आहे? हे दाखवणारा व्हिडिओ लावला. गंगेत येणारे मृतदेह, प्रदुषित पाणी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दाखवले. कुंभमेळ्यातून आणलेल्या पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरें यांच्या टीका केली जात होती. त्या टीकेला राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच उत्तर दिले. 'काही हिंदुत्ववाद्यांना वाटले की मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहेत का ते', असे म्हणत पुन्हा 'लाव तो व्हिडिओ'; म्हणत त्यांनी गंगेत येणारे मृतदेह, प्रदुषित पाणी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत, पोलखोल करीत नागरिकांचे डोळे उघडले.

मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांना हात घातला. मात्र, हे करीत असताना त्यांनी महायुतीमधील भाजप (Bjp), एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसवर टीका करणे टाळले तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसवर टीका केली नाही. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे यामधून दिसते.

त्यातच राज ठाकरे यांनी एकीकडे भाजपवर टीका करीत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांच्याशी जुळवून घेण्याची भूमिका कायम ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुका संपल्या. शिमगा झाला. होळी संपली. तुमच्या साक्षीने सांगतो. फडणवीस तुमच्या हातात एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातात आलं आहे. त्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहत असाल तर आमचा तुम्हाला निश्चित पाठिंबा राहील. पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा, असे राज ठाकरे यांनी म्हणत येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पत्ते ओपन केले आहेत.

एकीकडे या मेळाव्याप्रसंगी सतत टीका करणाऱ्या भाजपचे मंत्री आशिष शेलार यांच्यावर कविता करीत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मेळाव्याप्रसंगी चिमटे काढले होते. त्यामुळे राज ठाकरे या आरोप करणाऱ्या भाजप नेत्यावर काही तरी बोलतील असे वाटत होते, मात्र त्यांनी टीका करणे टाळले. तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा वापर करणाऱ्यांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर देखील बोलणे त्यांनी टाळले. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांच्या पराभवावरून केलेल्या टीकेला ते उत्तर देतील असे वाटत होते. मात्र, त्यांनी परखड भाषेत टीका न करता राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून कोणालाच अंगावर न घेता सौम्य भाषेत टीका केली.

आगामी काळात होत असेलल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेची भूमिका काय असणार? याची उत्सुकता मनसेच्या कार्यकर्त्यांना लागली होती. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर ठिकाणी होत असलेल्या निवडणुकीत मनसेचा निर्णय काय असणार ? याकडे सर्वांचे लक्ष असताना, त्याबाबत राज ठाकरे यांनी चकार शब्दही काढला नसल्याने मेळाव्याला उपस्थित असलेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या पदरी मोठी निराशा पडली.

वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. तर राज ठाकरे यांनी काही ठिकाणी महायुतीच्या प्रचारार्थ सभा घेतल्या होत्या. त्यावेळी राज्यात महायुतीचा पराभव झाला. तर मनसेच्या हाती काहीच आले नाही. त्यांनतर सहा महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनी स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र, त्या निवडणुकीत मनसेच्या पदरी मोठे अपयश आले.

या निवडणुकीत एकही आमदार निवडून आला नाही. या दारुण पराभवाने खचलेल्या नेत्याला उभारी देणारे वक्तव्य ते करतील, असे वाटत होते. मात्र, आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत राज ठाकरे या गुढीपाडवा मेळाव्यात सैनिकांना काही सूचना करतील अथवा कामाला लागण्याचे आदेश देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याबद्दल ते काहीच बोलले नसल्याने उपस्थित सैनिकांचा भ्रमनिरास झाला आहे.

येत्या काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीवेळी अचानक पक्षाची भूमिका जाहीर केली तर उर्वरित काळात निवडणुकीची तयारी कशी करणार ? हा प्रश्न मनसेच्या नेत्यासह कार्यकर्त्यांनाही सतावत आहे. दुसरीकडे मात्र, पक्षाची भूमिका जाहीर न करता त्यांनी सस्पेन्स कायम ठेवत कार्यकर्त्यासह महायुती व महाविकास आघाडीची धाकधूक मात्र त्यांनी वाढवली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT