

Sangali News : राजारामबापू पाटील यांचे निधन झाले त्यावेळी जयंत पाटील यांना वयाची 21 वर्षदेखील पूर्ण झाले नव्हते. ईश्वरपूर भागातील जनतेच्या मागणीनुसार त्यांच्या मोठ्या बंधूऐवजी जयंत पाटील यांना पाठवण्याचे ठरले होते. मुंबईतून निघतानाच जयंत पाटील याठिकाणी चार महिने राहतील, असे ठरले होते. त्यानंतर इथल्या नागरिकांची मागणी कमी झाली की ते अमेरिकेला शिक्षणासाठी निघून जातील, असे ठरले होते. त्यामुळे ते मुंबईतून येताना एकच बॅग घेऊन आले होते. मग इथून पुढे ते राजकारणात कसे सक्रिय झाले? जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास...
राजारामबापू पाटील यांचा जन्म 1ऑगस्ट 1920 रोजी झाला. शालेय जीवनातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला, त्यांचे वडील अनंतदादा व त्यांचे भाऊ ज्ञानू बुवा हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. कोल्हापुरात 'लॉ'चे शिक्षण घेत असताना ते सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. सांगलीच्या वाळवा तालुक्यात शिक्षणाच्या योग्य संधी अभावी त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. पुणे, बड़ोदा, कोल्हापुरात शिक्षण घेत ते कासेगावचे पहिले वकील बनले. 1945 साली त्यांनी 'कासेगाव एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. अत्यंत कमी अवधीत या संस्थेने शिक्षणाचे जाळे संपूर्ण वाळवा तालुक्यात विणले. स्वतः पेशाने शिक्षक असल्याने शिक्षणात आधुनिकता यावी आणि ते तळागाळातील सर्वापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी शेवटपर्यत प्रयत्न केले.
1952 साली सांगली जिल्हा बोर्डचे अध्यक्ष झाल्यानंतर राजारामबापू यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या विकासाच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. राजारामबापू पाटील यांनी 1957 मध्ये काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्हा समितीचे सचिव म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी 1959-60 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आणि 1952 ते 1962 या काळात दक्षिण सातारा जिल्हा स्थानिक मंडळाचे अध्यक्ष होते. यानंतर, त्यांनी 1967 आणि 1972 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर आमदार म्हणून काम केले. पुढील 22 वर्षे त्यांनी निर्विवाद आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अवघ्या 14 महिन्यांत वाळवा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. त्या जोरावर सलग 12 वर्षे मंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली.
राजारामबापू पाटील हे प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष झाले. त्यांनी माणसं जोडण्याची कला त्यांना चांगली अवगत होती. प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण राज्यात कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या संकल्पनेतून राज्यात नवीन उद्योग तयार झाले. अनेक ठिकाणी एमआयडीसीची निर्मिती केली. उद्योग व उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी केलेल्या कामाचा सर्वाना चांगला फायदा झाला.
त्यांनी अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालये स्थापन केली, साखरलेच्या उजाड मळ्यात सहकारी साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे दूध योग्य दरात बाजारात मिळावे यासाठी त्यांनी इस्लामपूर येथे वाळवा डेअरी युनियनची स्थापना केली. शेतकऱ्याला केंद्रस्थानी मानून त्यांनी साखर कारखाने, सहकारी बँका, दूध संघ, ग्राहक भांडार, सूत गिरण्या, पाणीपुरवठा संस्था अशा विविध संस्था स्थापन करून सहकार्याचा आदर्श ठेवला. त्यांचे १७ जानेवारी १९८४ रोजी निधन झाले.
राजारामबापू पाटील यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता पत्नी कुसुमताई पाटील यांच्यापासून त्यांना पाच अपत्ये आहेत, तीन मुली आणि दोन मुले. यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील हे पाचवे अपत्य आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील तनपुरे या राजकीय कुटुंबात जयंत पाटील यांची सर्वात मोठी बहीण उषादेवी यांचं लग्न झाले. उषादेवी प्रसादराव तनपुरे हे त्यांचं नाव. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या त्या मातोश्री होत.
तर भगतसिंह पाटील हे राजाराम बापू यांचे दुसरे अपत्य आहेत. आजवर ते कधाही राजकारणाच्या व्यासपीठावर दिसलेले नाहीत. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचा प्रशासकीय कारभार आणि उद्योग क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. राजारामबापूंचं तिसरं अपत्य विजयाताई यांचा पुण्यातील नामवंत जगताप कुटुंबात विवाह झाला. तर चौथ्या नीलिमाताई घुले पाटील यांचा अहिल्यानगरच्या सहकार क्षेत्रात नाव कमावलेल्या घुले पाटील याच्या कुटुंबात विवाह झाला. त्यानंतर पाचवे अपत्य माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील असून महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जयंत पाटील यांची राजकीय कारकीर्द
जयंत पाटील यांचा जन्म सांगली येथे 16 फेब्रुवारी 1962 रोजी झाला. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. ते सिव्हिल इंजिनीअर आहेत. वडिलांच्या आकस्मित निधनानंतर त्यांना पुढील शिक्षण जे परदेशात घ्यायचे होते ते घ्यायला जाता आले नाही. त्यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री केली. यानंतर त्यांनी 1998 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितींनंतर शरद पवारांसोबत काम केले.
1990 पासून विधानसभेत ते इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. जवळपास सलग आठ वेळा (1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019, 2024) इस्लामपूर मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले आहेत. 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. विशेषतः जयंत पाटील यांनी अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा 9 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. ते महाराष्ट्राचे सर्वात कमी वयाचे अर्थमंत्री बनले होते. त्यांनी गृहमंत्री 2008-2009 काळात त्यांनी काम पहिले.
26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारले आणि राज्याचे पहिले कमांडो फोर्स 'फोर्स वन' ची स्थापना केली. ग्रामविकास मंत्री 2009-2014 त्यांच्या कार्यकाळात 'ई-पंचायत' योजना आणि 'संतुलित आणि समृद्ध ग्राम' (इको व्हिलेज) प्रकल्पांतर्गत 15 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला. जलसंपदा मंत्री 2019-21 महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा विभागाची जबाबदारी सांभाळली. काही काळ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते होते. त्यानंतर त्यांनी 2017 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. जवळपास आठ वर्ष त्यांनी पदभार सांभाळला.
जयंत पाटील यांची ओळख एक सुविद्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू नेते म्हणून आहे, जे राज्याच्या अर्थकारणाचे बारकावे जाणतात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील पक्षाचे गटनेते आहेत. सर्वात तरुण अर्थमंत्री: वयाच्या ३९ व्या वर्षी अर्थमंत्री बनून ते महाराष्ट्राचे सर्वात कमी वयाचे अर्थमंत्री बनले. गृहमंत्री म्हणून २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी राज्याचे पहिले कमांडो फोर्स 'फोर्स वन' ची स्थापना केली. ग्रामविकासच्या माध्यमातून कार्यकाळात 'संतुलित आणि समृद्ध ग्राम' या प्रकल्पांतर्गत 'ई-पंचायत' आणि १५ कोटी झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
त्यांचे वडील राजारामबापू हे घरातील मंडळी व कार्यकर्त्यात अंतर ठेवत होते. त्यानंतर हळूहळू अशा काही घटना घडल्या अन त्यामध्ये जयंत पाटील गुंतत गेले. जयंत पाटील राजकारणात येण्यापूर्वी त्यांच्या वडिलांच्या बाबतीत बऱ्याच घटना घडल्या होत्या. त्यामुळे या भागातील तरुण पिढी कायम जयंत पाटील (Jayant patil) यांच्या पाठीशी होती. काही झाले तरी आपल्याला काम करायचे या त्वेषाने ते काम करीत होते. नवी पिढी त्यांच्यासॊबत होती. त्यापैकी आता बरेचजण नाहीत. त्यापैकी बरेच जण हे त्यांच्या वडिलांचे फॉलोअर्स होते. त्यामुळे त्याचा फायदा जयंतरावांना झाला.
इस्लामपूर परिसरात आल्यानंतर जो साखर कारखाना दिसतोय तो राजारामबापू पाटील यांनी उभारलेला हा त्यांच्या कामाचा फार छोटा भाग आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उभे केले आहेत. यवतमाळ, अकोला, नंदुरबार व शहादा या बऱ्याच भागातील नेते गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वीपर्यंत सांगत होते की, बापू आले की आमच्या घरी येत होते. बापूंचा लोकसंग्रह मोठा होता. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उभारले होते. त्यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर महाराष्ट्राच्या राजकारणतील चित्र बदलले असते. काँग्रेस व जनता पक्षाच्या नेत्याचा मोठा राबता त्यांच्या घरी कायम राहत होता. त्याचा खूप मोठा फायदा झाला. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता, त्याचा फायदा त्यांना त्याकाळी झाला.
राजारामबापू पाटील यांनी मोठ्या प्रमाणात संस्था उभारल्या आहेत. त्यांनी उभारलेल्या संस्था पुढे वाढवण्याचे काम त्यांच्या सहकाऱ्यांनी जबाबदारीने पार पाडले आहे. या संस्था जनतेच्या आहेत, त्या सांभाळल्या पाहिजे, टिकवल्या पाहिजेत व वाढवल्या पाहिजेत हीच त्यांच्या सहकार्यांची भावना होती. त्याशिवाय आज ज्या संस्था आहेत, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच राहिल्या आहेत. राजारामबापू पाटील यांनी उभारलेले हे इंजिनिअरिंग कॉलेज देशातील नावाजलेले कॉलेज आहे. त्याचा नावलौकिक संपूर्ण देशभर पसरला आहे. तर राजारामबापू बँक आहे. ती देशभरात उभारण्यात आलेल्या कोऑपरेटिव्ह बँकामध्ये पहिल्या वीस क्रमांकावर आहे.
राजारामबापू यांचे अनेक सहकारी हेच त्यांच्या संस्था आजही उत्तम काम करत सांभाळतात. मधल्या काळात जयंत पाटील बराच काळ मंत्री होते. त्यावेळी येथे काम करणारे बी. आर. पाटील, शामराव पाटील, दिलीप पाटील यांनी सर्व संस्थांचा कारभार उत्तमरीत्या सांभाळला आहे. त्या संस्थेच्या प्रतिष्ठा व नावलौकिक त्यांनी संभाळला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.