

Nagpur News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून वाद सुरू आहे. सुनील केदार हेच नेते आहे, त्यांचे ऐकले पाहिले, असे मानणारा एक वर्ग आहे. तर केदार यांना पुढे कसे जाऊ देता म्हणणारा दुसरा वर्ग. यातून जिल्हा काँग्रेसमध्ये दुफळी असल्याचे दिसून येते. प्रदेशाध्यक्षांनी कान टोचल्यानंतर त्यांचे ऐकून घेण्यात कोणालाही रस नाही. त्यामुळे पायओढीतून काँग्रेस स्वतःच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भुईसपाट होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी असल्याचे दिसून येते. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या मुलाखती घेण्यावरून, एबी फॉर्म वाटण्यावरून माजी मंत्री सुनील केदार विरुद्ध प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असा संघर्ष उफाळून आला. सपकाळ यांनी अवैध ठरवलेल्या पूर्वीच्या मुलाखती केदार गटाने गुप्तपणे घेतल्या आणि नंतर नव्या मुलाखतींवर बहिष्कार घातला. यातून काँग्रेसमध्ये काहीही आलबेल नसल्याचे दिसून येते.
हा सगळा संघर्ष म्हणजे प्रदेश नेतृत्वाच्या निर्णयक्षमतेला दिलेले उघड आव्हान आहे. काँग्रेसच्या नेतृत्वशक्तीला हळूहळू धक्का देणारा आहे. शिस्तभंगाचे सामान्यीकरण आणि स्थानिक पातळीवरील सत्ता संरचना डळमळीत झाल्याचे यावरून दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची अंतर्गत धुसफूस उघड व्हावी, हे काँग्रेसच्या राजकीय आरोग्याला घातक ठरणार आहे. संघर्षाची आणि आव्हानाचा हा आजार इतर जिल्ह्यात पसरण्यापूर्वीच प्रदेश नेतृ्त्वाला पाऊल उचलणं गरजेचं आहे.
माजी मंत्री सुनील केदार यांच्या प्रभावाखालील जिल्हा काँग्रेस अनेक वर्षांपासून स्थानिक स्तरावर स्वतंत्रपणे निर्णय घेत आली आहे. पण, याच प्रक्रियेवर प्रदेश नेतृत्वाने ‘रेष’ आखताच संघर्षाच्या ठिणगी उठली. केदार आणि त्यांचे समर्थक गैरहजर राहिल्याने ही ठिणगी क्षणात राजकीय ज्वाळेत रूपांतरित झाली. मुलाखतीदरम्यान झालेला वाद आणि हातघाईची शक्यता निर्माण होणे हे केवळ अस्वस्थ करणारे नाही; तर काँग्रेसची अंतर्गत शिस्त किती कमकुवत झाल्याचा पुरावा आहे.
सचिवपदातील बदलावरून आरोप-प्रत्यारोपाचा वाद आधीपासूनच दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण करून होता. मुलाखतींसारख्या शिस्तबद्ध प्रक्रियेतही असे वाद उफाळणे म्हणजे काँग्रेससाठी आत्मघातकी निर्णय ठरू शकतो. काँग्रेस (Congress) जिल्ह्यात निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाण्याच्या स्थितीत नाही. सावनेर, हिंगणा आणि रामटेकसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातील इच्छुक गैरहजर राहिल्याने उमेदवारी प्रक्रियेतील डेटा, प्रत्यक्ष आढावा आणि मैदानातील वास्तव याचा पक्षाला संपूर्ण अंदाजच मिळाला नाही.
अशा अर्धवट माहितीवर आणि गोंधळलेल्या संघटनांवर आधारलेले निवडणूक नियोजन पराभवाचे आमंत्रणच ठरू शकते. विरोधकांनी ही परिस्थिती नक्कीच ओळखली. भाजपसारखा शिस्तीवर चालणारा पक्ष याअंतर्गत कलहाचा फायदा घेण्यास मागे-पुढे पाहणार नाही. नगर पंचायत आणि नगर परिषद स्तरावरील निवडणुका ज्या संघटित आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भरवशावर जिंकल्या जातात. त्या ठिकाणी काँग्रेसची ही अस्थिरता वाढत असल्याचे दिसून येते.
काँग्रेसपुढील खरा प्रश्न आता विरोधकांचा नाही, तर स्वतःच्या घरातील मतभेदांचा आहे. पक्षाला जर नागपूर जिल्ह्यात काहीही साध्य करायचे असेल, तर तातडीने संवाद, समन्वय आणि ठोस निर्णयक्षमतेची पुनर्बांधणी आवश्यक आहे. अन्यथा, हे सर्व वाद फक्त निवडणूक पराभवाचे पूर्वसूचनाच ठरेल. सध्या काँग्रेसमध्ये संवाद नसल्याचे दिसून येते.
वरिष्ठांपासून तर कार्यकर्त्यांमध्ये मर्जीतील पदाधिकाऱ्यांना मोठे करण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होत आहे. मात्र, याकडे काँग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळेच कदाचित काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभवालाही सामोर जाईल, असे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.