
New Delhi News: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर तापलेलं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. पण याचवेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत काही गंभीर आरोप केले होते. आता याच आरोपानंतर संसदीय समितीसमोर देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी मोठा खुलासा केला आहे.
भारत-पाकिस्तान संघर्षावरुन विरोधकांनी काही मुद्दे उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर (S.Jaishankar) यांच्यासंदर्भात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओतील विधानामुळेही मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्याचदरम्यान, विरोधकांच्या मनातील हा गोंधळ थांबवण्याच्या उद्देशानं काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या परराष्ट्र व्यवहारांवरील समितीची बैठक बोलावण्यात आली होती.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.त्याद्वारे विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. या बैठकीत मिस्त्री यांनी भारत- पाकिस्तान संघर्षादरम्यान पाककडून अणुयुद्धाचे संकेत मिळाले होते का या प्रश्नावर हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
विक्रम मिस्त्री यांनी भारत-पाकिस्तान सैन्यदलाच्या कारवाईविषयीची माहिती विरोधकांना दिली. तसेच ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हे स्थगित करण्यात आलं असून दहशतवादाविरुद्ध भारताची लढाई सुरूच राहणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.
एकीकडे भारतीय सैन्यावर ऑपरेशन सिंदूरवरुन देशभरात कौतुकाचा वर्षाव केला जात असतानाच दुसरीकडे नवा वाद पेटला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑपरेशनच्या सुरुवातीला पाकिस्तानला संदेश पाठवला असल्याचं विधान एका व्हिडिओत केल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जयशंकर यांच्या याच विधानावरून शंका उपस्थित केले आहे. तसेच ही चूक नसून गुन्हा आहे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.
संसदीय समितीच्या बैठकीत राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावरही चर्चा पार पडली. यावेळी यात परराष्ट्र मंत्र्यांचं विधान हे मोडतोड करून दाखवण्यात आल्याचं सांगत राहुल गांधींच्या आरोपातील हवाच काढून टाकली. तसेच भारताने अचूक हल्ल्याच्या सुरुवातीच्या टप्प्यानंतर पाकिस्तानला याबाबत सूचित केल्याचा खुलासाही परराष्ट्र सचिवांनी केला. याचदरम्यान, त्यांनी सीजफायरमध्ये अमेरिकेची काहीही भूमिका नसल्याचेही स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपनं देशभरात वेगवेगळ्या माध्यमातून या पाकिस्तानवरील कारवाईचं श्रेय घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तसेच भाजप नेत्यांची गेल्या काही दिवसांतील एकापाठोपाठच्या ऑपरेशन सिंदूरवरील विधानांनी विरोधकांच्या आरोपांना आणखीच हवा मिळाली होती. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधीही मैदानात उतरल्याचं दिसून आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.