

Stock Market Latest News India : भारतीय भांडवली बाजारासाठी चिंतेची घंटा वाजवणारी मोठी आर्थिक घडामोड समोर आली आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) 2025 या संपूर्ण वर्षात भारतीय बाजारातून तब्बल 1.66 लाख कोटी रुपये काढून घेतले होते.
मात्र परिस्थिती 2026 मध्ये आणखी गंभीर बनली आहे. अवघ्या पहिल्या सहा महिन्यांतच विदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 2.7 लाख कोटी रुपयांचे समभाग विकून बाजारातून माघार घेतली आहे.
विशेष म्हणजे जून महिन्यातही विक्रीचा सपाटा कायम राहिला असून, 49,340 कोटी रुपये बाजारातून बाहेर काढण्यात आले आहेत. या सातत्यपूर्ण भांडवल बाहेर पडण्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर दबाव वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि परकीय चलन साठा मजबूत राखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) परदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. आता या उपाययोजनांना किती प्रतिसाद मिळतो याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (CDSL) ताज्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी वगळता 2026 वर्षाच्या सर्व महिन्यांत भारतीय (India) बाजारपेठेतून परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्री करणे सुरूच ठेवले. जानेवारी महिन्यात 35,962 रुपये काढून घेतले. फेब्रुवारीत गुंतवणूकदारांनी 22,615 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली. ही देखील मागील दीड वर्षातील सर्वाधिक मासिक गुंतवणूक होती.
परंतु मार्चमध्ये लगेच विक्रमी 1.17 लाख कोटी रुपये काढून घेतले. एप्रिलमध्ये 60,847 कोटी रुपये तर मे महिन्यात 32,963 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्यामुळे आणखी दबाव वाढला. जूनमध्ये 49,340 कोटी रुपये भांडवली बाजारातून काढून घेण्यात आले. या महिन्यात रोखे बाजारात मात्र 21,652 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यामुळे भारतीय शेअर बाजारावर सतत विक्रीचा दबाव कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जून महिन्यात समभाग विक्री सुरू असतानाच, रोखे बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी 21,652 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी इक्विटीपेक्षा सुरक्षित पर्याय म्हणून बाँड मार्केटकडे कल वाढवल्याचे संकेत मिळत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, महिन्याच्या सुरुवातीला विदेशी गुंतवणूकदार जागतिक जोखीम टाळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा कल विकसित अर्थव्यवस्थांकडे जास्त असतो. सध्या, अमेरिका सरकारने रोख्यांवरील परतावा वाढवला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अमेरिकन बाजाराकडे वळत असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, इराण आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या करारामुळे कच्च्या तेलाच्या किमती काहीशा कमी झाल्या असल्या तरी जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम आहे. भारतीय शेअर्सचे वाढलेले मूल्यांकनही चिंतेचा विषय विदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांचे सध्याचे मूल्यांकन जास्त असल्याचे मानत असल्याने त्यांचा गुंतवणुकीचा कल बदलल्याचे दिसत आहे.
याबाबत माॅर्निंगस्टार इन्व्हेस्टेमंट रिचर्स इंडियाचे मुख्य संशोधन व्यवस्थापक हिमांशु श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारतीय समभागांचे मूल्यांकन आणि जागतिक बाजारातील बदलती परिस्थिती यामुळे विदेशी गुंतवणूकदार अधिक सावध झाले आहेत.
विदेशी गुंतवणूक सतत बाहेर पडत असल्याने चालू खात्यातील तूट सांभाळणे आणि परकीय चलन साठा मजबूत ठेवणे हे सरकारसमोर मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जून महिन्यात विदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन उपाययोजना जाहीर केल्या आहेत. आता येत्या काही महिन्यांत सरकारच्या या निर्णयांचा परिणाम काय होतो आणि विदेशी गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजाराकडे वळतात का, याकडे संपूर्ण आर्थिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.