
New Delhi News : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अखेर पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी मोठं पाऊल उचललं होतं.ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं जवळपास पाकव्याप्त काश्मीरमध्ये 100 किलोमीटर आतमध्ये घुसून हल्ला केला होता. पण या कारवाईनंतर चवताळलेल्या पाकिस्ताननं आता सीमारेषेवर गोळीबार सुरू केला आहे.
तसेच काही सैन्यदलाच्या काही ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र,भारतानं तो प्रयत्न उधळून लावला. भारतासाठी आता पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे राहणार आहे.तर ऑपरेशन सिंदूरनंतर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) गेल्या 40 तासांत मोठी पावलं उचलली आहेत. यामुळे पाकचे धाबे दणाणले आहे.
भारतानं पाकिस्तानात विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे (Operation Sindoor) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. या ऑपरेशनला आता जवळपास 40 तासांहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या काळात दिल्लीत तिन्ही दलाच्या लष्करी घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑपेरेशनच्या वेळेपासूनच सक्रिय आहेत. ते स्वतः या लष्करी कारवाईवर लक्ष ठेवून होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'ऑपरेशन सिंदूर'नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी भारतीय सैन्यदलाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव केला.
याचवेळी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईची माहिती आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिली. यावेळी कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वावर विश्वास व्यक्त करतानाच संपूर्ण देश तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
पंतप्रधान मोदींनी त्यानंतर जागतिक अंतराळ अन्वेषण परिषदेला मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भारत लवकरच विशेष जी-२० उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याची माहितीही दिली. पंतप्रधान मोदी एकीकडे ही कारवाई करत असताना दुसरीकडे बैठकांवर बैठका पार पडत होत्या. या बैठकीत मोदी व्यस्त होते. ते सतत लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होते. यावेळी पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले.
यानंतर बुधवारी(ता.7) संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’विषयीची माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सध्या मोदी हे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी सिंधू जल करार रद्द करतानाच पाकिस्तानसोबतचा व्यापारही रोखला आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका, चीन,रशिया,जर्मनी,ब्रिटन, फ्रान्स या बलाढ्य देशांसह संपूर्ण जग भारताच्या पुढील कारवाईवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 ते 17 मेपर्यंत नॉर्वे, नेदरलँड आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर जाणार होते.पण मात्र, भारत पाकिस्तानमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल,परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यातच भारतानं ऑपरेशन सिंदूरनंतर आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.