
बातमीत थोडक्यात महत्वाचे :
शशी थरूर यांच्यानंतर काँग्रेसचे पंजाबमधील खासदार मनीष तिवारी यांनीही पक्षाविरोधात नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर सूचक पोस्ट करत बंडाचे संकेत दिले आहेत.
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सहभागी होण्याची तिवारींची विनंती असूनही त्यांना वक्त्यांच्या यादीत समाविष्ट न केल्यामुळे त्यांनी “भारत की बात सुनाता हूं” अशा देशभक्तीपर गीताच्या ओळी पोस्ट करत अप्रत्यक्ष टीका केली.
पक्षातील इतर नेत्यांनी परदेशात गेलेल्या शिष्टमंडळावरील नाराजी व्यक्त केल्यानंतर तिवारींचे नाव यादीतून वगळल्यामुळे पक्षात अंतर्गत विसंवाद आणि थरूरनंतर तिवारींचीही भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.
Operation Sindoor Debate : काँग्रेसचे केरळमधील खासदार व माजी मंत्री शशी थरूर यांच्याविषयी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मागील काही महिन्यांतील त्यांची विधाने पक्षाच्या भूमिकेशी विसंगत आणि मोदी सरकारला पूरक असल्याचा दावा पक्षातील नेते करत आहेत. त्यात आता आणखी एका बड्या नेत्याची भर पडली आहे.
काँग्रेसचे पंजाबमधील खासदार व माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी पक्षाविरोधात तलवार उपसली आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच त्यांनी काँग्रेसला देशभक्तीचे आठवण करून देणाऱ्या एका हिंदी गीताच्या काही ओळी सोशल मीडियात पोस्ट केल्या आहेत. त्यामागे एका बातमीचा संदर्भही दिला आहे.
तिवारी हेही परदेशात गेलेल्या एका शिष्टमंडळाचे सदस्य होते. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरवर संसदेत सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होण्याची त्यांचीही इच्छा होती. पक्षाला तशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, वक्त्यांच्या यादीत थरूर यांच्यासह तिवारी यांच्याही नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे तिवारी प्रचंड नाराज झाल्याचे दिसते.
सोशल मीडियात सूचक पोस्ट करत तिवारी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यादीत समावेश नसल्याच्या बातमीसह त्यांनी गीताचा चार ओळी पोस्ट केल्या आहेत. ‘है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूं, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं’, या ओळी त्यांनी पोस्ट केल्या आहेत.
तिवारी यांनी एकप्रकारे पक्षाला आरसा दाखवल्याचे मानले जात आहे. परदेशात गेलेल्या शिष्टमंडळाकडून मोदी सरकारचे मोठे कौतुक करण्यात आल्याचा दावा काँग्रेसमधील नेत्यांनी केला. थरूर हे भाजपचे प्रवक्ते बनल्याची टीकाही एका नेत्याने केली होती. यापार्श्वभूमीवर परदेशात गेलेल्या एकाही नेत्याचा समावेश संसदेतील चर्चेच्या यादीत करण्यात आलेला नाही. मात्र, तिवारी यांच्याविषयी यादरम्यान फारसे वाद समोर आले नव्हते. त्यानंतरही त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यावरून ते नाराज झाल्याची चर्चा आहे.
वारंवार उपस्थित होणारे प्रश्न :
प्रश्न: मनीष तिवारी का नाराज आहेत?
उत्तर: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत त्यांचे नाव वक्त्यांच्या यादीतून वगळल्यामुळे.
प्रश्न: मनीष तिवारी यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केलं?
उत्तर: देशभक्तीपर गाण्याच्या ओळी — “भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं.”
प्रश्न: या प्रसंगात कोणता आणखी काँग्रेस नेता वादात आहे?
उत्तर: शशी थरूर, ज्यांच्यावर भाजपला पूरक भूमिका घेतल्याचा आरोप आहे.
प्रश्न: काँग्रेस पक्षात यामुळे काय संकेत मिळत आहेत?
उत्तर: पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आणि अंतर्गत विसंवाद वाढत असल्याचे संकेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.