

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरावर असून सध्या फिश पॉलिटिक्सनं जोर धरला आहे. नुकतेच भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी इथं मासे खाल्यानं चर्चेत आले होते. त्यानंतर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत मासे खाण्याची पैज लावली आहे. त्यांच्या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
पश्चिम बंगालमध्ये सध्या प्रचाराचा शिगेला पोहोचला असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते मंडळी हातात मासे घेऊन प्रचार करताना दिसत आहेत. याला बंगालमध्ये फिश पॉलिटिक्स असं संबोधलं जात आहे. पण अशा पद्धतीनं हातात मासे घेऊन प्रचार करण्यामागचं कारण काय? तर तृणमूल काँग्रेसकडून भाजपच्याविरोधात प्रचार सुरु आहे. कारण देशात भाजपशासित बऱ्याच राज्यांमध्ये मांसाहारावर बंदी घालण्याचे प्रकार झाले आहेत. बऱ्याचदा सणावाराच्या काळात मांस आणि मासे विक्रीची दुकानं बंद ठेवली जातात. अनेक ठिकाणी गोमांस खाल्याच्या संशयावरुन झुंडीन मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याचाच पश्चिम बंगालच्या प्रचारात वापर करुन जर भाजप इथं सत्तेत आली तर इथल्या नागरिकांच्या मांसाहारावर बंदी येईल. मासे हा तर बंगालच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, इथल्या दुर्गापुजेच्या काळात माशांचा नैवद्य दाखवला जातो. तर हे मासं खाणं देखील भाजप सत्तेत आल्यास बंद होईल, असा प्रचार तृणमूल काँग्रेसकडून केला जात आहे.
दरम्यान, भाजपचे खासदार अनुराग ठाकूर हे पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरले आहेत. काल ते कोलकात्यातील एका हॉटेलमध्ये जेवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरुन त्यांना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्रोल केलं. त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील ठाकूर यांच्यावर निशाणा साधला होता. पण असं करण्यामागं कारण हे होतं की, अनुराग ठाकूर हे फिश करी खात होते, म्हणजेच मांसाहार करत असताना त्यांच्या कपाळावर हिंदू धर्मात धार्मिक पुजाअर्चा केल्यानंतर जो टिळा लावतात तसा टिळा लावलेला होता. त्याचबरोबर तो मंगळवारचा दिवस होता. म्हणजेच हिंदू धर्मात मंगळवारचा दिवशी पुजाअर्चा केल्या जातात आणि त्यामुळं या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो. भाजपकडून हिंदू धर्माच्या धार्मिक प्रथांचा कायम आग्रह धरला जात असताना अनुराग ठाकूर यांनी या सर्व गोष्टी बासनात बांधून मनसोक्तपणे फिश करीवर ताव मारला. त्यामुळं ठाकूर यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं.
यानंतर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा हे आसामची विधानसभा निवडणूक संपल्यानं पश्चिम बंगालमध्ये प्रचारात दाखल झाले आहेत. इथं एका राजकीय सभेला संबोधित करताना त्यांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी मासे खाण्याची पैज लावली. त्यांनी म्हटलं की, "हे काय बोलतायत की भाजप निवडून आल्यास पश्चिम बंगालमध्ये मांस आणि मासे खाण्यावर बंदी येईल. अरे बाबा आसाममध्ये भाजपचंच सरकार आहे, पण आसामचे सर्व नागरिक मांस आणि मासे मनभरुन खातात. त्यामुळं मला दीदींना सांगायचं आहे की, एकदा तुम्ही माझ्या घरी जेवणासाठी या किंवा मी तुमच्या घरी येतो, आपण मासे खाण्याची पैज लावूयात. यावेळी तुम्ही खात राहा आणि मी पण खात राहीन, पण शेवटी मीच जिंकणार कारण मी किलोभर तरी मासे तुमच्यापेक्षा जास्त खाईन"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.