Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. दिवाळीनंतर निवडणूका होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे एकमेकांवर टीका टिपण्णी करण्याची संधी एकही पक्ष व नेतेमंडळी सोडत नाहीत. मनसेच्या मेळाव्याप्रसंगी बोलताना राज ठाकरे यांनी मनसे, शिवसेना या दोघांचीच तळागाळापर्यंत ताकद असल्याचे सांगत पहिल्यांदाच भाजपला शिंगावर घेतले. त्यानंतर तासाभरातच सीएम फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या दाव्याची चिरफाड केली. मुंबईत कोणता पक्ष मोठा आहे, याबद्दल सर्वांना माहिती आहे. त्याची आकडेवारी सांगतच त्यांनी कोणाला काय बोलायचे ते बोलू द्या, असे म्हणत राज ठाकरेंच्या विधानाची फडणवीस यांनी फिरकी घेतली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने एमआयजी क्लब येथे मनसे नेते, शहराध्यक्ष, सरचिटणीस, विभाग अध्यक्ष हे सगळे बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना दिल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
मनसे गटाध्यक्षांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागा, मतदार याद्या तपासा या सूचना मनसे अध्यक्ष मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मतदार यादीतील घोळ हे 2017 पासून सांगत आहोत, आता बाकीच्यांनी हा विषय घेतला आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे. या दोन पक्षाव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही, त्यामुळे कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरे यांनी बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्याना दिल्या आहेत. तर दुसरीकडे युतीच्या दृष्टीने महत्त्वाची मानले जात असलेले विधान केले आहे. या विधानांमधून राज यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा मनसेच्या गोटात आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून तयारी करीत असलेल्या भाजपच्या जिव्हारी ही टीका लागली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना सीएम फडणवीस म्हणाले, 'कोणालाही मुंबईत मोठे वाटत असले तरी 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा क्रमांक एकवर राहिला आहे. 2017 सालच्या निवडणुकीत भाजपकडे 82 नगरसेवक होते. तर, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपचे 15 आमदार निवडून आले आहेत. जे इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. त्यामुळे कोण काय बोलते? दावा करते, त्याकडे फारसे लक्ष न देता, आपण आपल्या कामावर आणि जनतेच्या सेवेकडे लक्ष केंद्रित करावे.'
तर दुसरीकडे एका कर्यक्रमावेळी भाजपचा सहभाग ना स्वातंत्र्य लढ्यात नाहीये. इतकेच नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा त्यांचा सहभाग नाहीये. असे हे लोक आयत्या बिळावर नागोबा आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. डाव्या पक्षांच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, 'उद्धव ठाकरे यांचा ठाकरेंचा दिल्लीत मान काय ते समोर आले आहे', अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी केली होती. "आमच्याकडे ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्या पेक्षाही पहिले ते राहिले. त्यामुळे आता तिथे त्यांचा काय मानसन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे. भाषणामध्ये खूप म्हणायचं की, दिल्लीसमोर मान झुकणार नाही, दिल्लीसमोर पायघड्या टाकणार नाही. पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे, विशेष म्हणजे सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे ते बघितल्यावर थोडं दु:ख होतय,' असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.