
Delhi Marathi Sahitya Sammelan News : मराठी साहित्य संस्कृती टिकवून ठेवण्याचा आग्रह प्रत्येकांनी केला पाहिजे. त्यासाठी टोकाचा आग्रह आपण धरला पाहिजे. मराठी साहित्य, लोककला, चित्रपट, संगीत असा मराठी समाज बोलणारा व ऐकणारा टिकवला पाहिजे. मराठी भाषेला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी त्याची कालबद्ध योजना आखली पाहिजे. साहित्यिक, विचारवंत व शासनाकडून त्यासाठी संयुक्त प्रयत्न व्हायला हवेत. मराठी साहित्य संस्कृतीचा गजर करत राहणे, ही सर्वांची जबाबदारी असलयाचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोल्ट होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर, मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत, पी. डी. पाटील, विजय दर्डा, उषा तांबे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच छावा या हिंदी सिनेमाचे तोंडभरून कौतुक केले. त्यासोबतच हा सिनेमा लवकरच मराठी भाषेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सगळयात जास्त सह्या करणारा व सगळ्यात जास्त सेल्फी देणारा मुख्यमंत्री म्हणून माझी अडीच वर्षाची कारकीर्द चांगलीच चर्चेत असल्याचे सांगत त्यांनी मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा संगम आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नसल्याचे स्पष्ट केले. मराठी भाषेला मोठा इतिहास व परंपरा लाभली आहे. ती पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पेलत आहात. महाकुंभातून घरी जात असताना आपण ज्याप्रमाणे गंगेचे पाणी घरी घेऊन जातो. त्याच प्रमाणे या ठिकाणाहून सर्वच जण मराठी भाषा संवर्धनाचा वसा या ठिकाणाहून घेऊन जाणार असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
अनेक कारणामुळे दिल्लीतील हे साहित्य संमेलन लक्षात राहणार आहे. सुमारे ७० वर्षांनंतर दिल्लीत हे संमेलन पार पडले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या साठी सुमारे अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास मांडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले संमेलन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी लेखक नाही, साहित्यिक नाही, मी एक साधा कार्यकर्ता आहे. पण माझे मराठी भाषेवरील प्रेम टोकाचे आहे. ही भाषा माझ्या आईची भाषा आहे. ही भाषा ज्ञानेश्वर माऊलींची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भाषा आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्यांची हीच भाषा आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांची हीच भाषा आहे. लोकमान्य टिळक व देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हीच मातृभाषा आहे. ही आपल्या सर्वांची भाषा असल्याचे ते म्हणाले.
भाषेच्या नावाखाली भेदभाव होता कामा नये. कोणत्याही भाषेचा द्वेष करून आपली भाषा मोठी होत नाही. व्यवाहारिक भाषेचे महत्व ओळखून आपल्या मराठी भाषेचा वेलू गगनावर घेऊन जायचा आहे. जे-जे मराठी आहे ते आपण जगवले पाहिजे. ते सर्व वाढवले पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.