

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता पुन्हा उमटू लागले आहेत.
भाजप पदाधिकारी ओमनाथ नाटेकर यांच्यावर हल्ला प्रकरणात शिंदे गटाच्या दोन माजी नगरसेवकांना जेलवारी करावी लागली आहे.
महायुतीचे सरकार सत्तेत असतानाही स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
Dombivli News : राज्यात महायुतीचे सरकार असून भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. पण सध्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद काही थांबताना दिसत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या हिंसक राड्याचे पडसाद आता उमटू लागले असून राजकीय संघर्षाची धार अद्याप कायम असल्याचेच आता दिसत आहे. येथे भाजप पदाधिकारी ओमनाथ नाटेकर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून माजी दोन नगरसेवकांना अटक झाली आहे. आता या प्रकरणात या दोघांना जेलवारी करावी लागणार असून या अटकेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. यामुळे येथे शिवसेना-भाजप संघर्षाच्या दुसऱ्या अंकाला सुरूवात झाल्याचे आता बोलले जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 29 मध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपाटले होते. डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरात पैसे वाटपाच्या संशयावरून शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमने सामने आल्याने राडा झाला होता. तर या हाणामारीत भाजप पदाधिकारी ओमनाथ नाटेकर हे गंभीररीत्या जखमी झाले होते. ज्यानंतर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत गुन्हा दाखल करत शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते.
या हल्ला प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिवसेनेच्या माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह 7 जणांना कारवाई केली होती. त्यांना ताब्यात घेत अटक केली होती. पण ज्या दिवशी त्यांना ताब्यात घेतले, त्याच दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर न्यायालयीन कोठडीतच ठाणे येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पण त्यानंतर पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेत कल्याण न्यायालयात हजर केले.
या प्रकरणात न्यायालयाने गांभीर दखल घेत दोन्ही पाटील बंधूंना 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या कारवाईमुळे शिंदेंच्या शिवसेनेतील या दोन्ही माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा तुरूंगात जावे लागणार असून पुढचे तीन दिवस कारागृहात राहावे लागणार आहे. दरम्यान दोन्ही बंधूंच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने तातडीने निर्णय न देता पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला ठेवली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळणार की कोठडी वाढणार हे त्याच दिवशी कळणार आहे.
1. कल्याण डोंबिवलीतील हिंसाचार कशामुळे झाला होता?
महापालिका निवडणुकीदरम्यान राजकीय वादातून हा हिंसाचार झाला होता.
2. हल्ला कोणावर झाला होता?
भाजपाचे पदाधिकारी ओमनाथ नाटेकर यांच्यावर हल्ला झाला होता.
3. या प्रकरणात कोणाला अटक झाली आहे?
शिवसेनेच्या शिंदे गटातील दोन माजी नगरसेवकांना जेलवारी करावी लागली आहे.
4. या घटनेचा राजकारणावर काय परिणाम झाला?
महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघड झाला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
5. सध्या राज्यात कोणाचे सरकार आहे?
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.