Raigad News, 20 Feb : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले तरीही अद्याप रायगड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी कोणत्याच पक्षाकडून ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सत्तास्थापनेसाठी पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. रायगडमधील राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यातील वाद पाहता या ठिकाणी शिवसेनेला डावलून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्लॅन राष्ट्रवादीने केला होता.
मात्र, राष्ट्रवादीच्या या निर्णयाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सध्यातरी याबाबत वेटिंगवर ठेवण्यासाठी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे झेडपी निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच गोव्याला सहलीला गेलेले राष्ट्रवादी आणि भाजपचे सदस्य आता पुन्हा जिल्ह्यात परतणार आहेत. एकीकडे अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात सोसल मीडियावर टीकेचा सूर उमलट आहे.
त्यामुळे याचा परिणाम राज्यातील आगामी निवडणुकांवर पडण्याची शक्यता असल्याने भाजपकडून रायगडमधील सत्तास्थापनेचा विषय सावधपणे हाताळला जात असल्याचं दिसत आहे. रायगड जिल्हा परिषदेत एकूण ५९ सदस्यसंख्या असून सत्तास्थापनेसाठी ३० सदस्यांची आवश्यकता आहे. निकालानंतर राष्ट्रवादीचे १६ आणि भाजपचे १५ सदस्य निवडून आल्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र आल्यास सत्तास्थापन होऊ शकते.
त्यामुळे २१ सदस्य निवडून आलेल्या शिवसेनेला बाजूला ठेवत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली भाजप राष्ट्रवादीकडून सुरू होत्या. मात्र, त्याला आता भाजपच्या वरिष्ठांनी तुर्तास ब्रेक दिला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेला पूर्णपणे सत्तेबाहेर ठेवून सत्ता स्थापन करणे, ही सध्याची योग्य वेळ नसल्याचा सल्ला भाजपच्या वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या निर्णयाच्या पाठीमागे राज्यातील इतर जिल्हा परिषदेतील आकडे असल्याचंही बोललं जात आहे. कारण एका रायगड झेडपी मध्ये जर भाजपने शिवसेनेला लांब ठेवलं. तर राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेला वगळून सत्ता स्थापन करणं भाजपसाठी अवघड जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी रायगडमध्ये शिवसेनेला लांब ठेवून सत्तास्थापनेचा निर्णय मागे घेण्यात आल्याचं दिसत आहे.
भाजपला सातारा आणि सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करायची असेल तर शिवसेनेची साथ लागणार आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपचे १६, राष्ट्रवादीचे (अजित पवार) ६ तर शिवसेनेचे ७ सदस्य निवडून आलेत. इथे बहुमताचा ३१ आकडा गाठण्यासाठी महायुतीतील हे तिन्ही पक्ष एकत्र असणं गरजेचं आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे १८, काँग्रेस ११ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा १ सदस्य विजयी झालेत.
तर इतर पक्षांचे २ सदस्य आहेत. त्यामुळे सांगलीत शिंदेंच्या शिवसेनेला डावलणं भाजपला परवडणारं नाहीये. अशीच काहीशी परिस्थिती साताऱ्यात आहे. सातारा जिल्हा परिषदेतेत काहीही झालं तरी भाजपचाच अध्यक्ष बनवणार अशी घोषणा मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. मात्र, सध्या तरी शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. त्यामुळे गोरेंचा दावा खरा ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
साताऱ्यातील संख्याबळ पाहता एकट्या भाजपचे २७ सदस्य, दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून २० तर शिवसेनेचे १५ सदस्य आहेत. तर इतर पक्षाचे सदस्य आहेत. तर इथे सत्तास्थापनेसाठी ३३ संख्याबळ पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी देखील शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हीच सर्व राजकीय समीकरणं आणि आकजेवारी पाहता रायगडमध्ये शिवसेनेला लांब ठेवण्याचा निर्णय तुर्तास तरी भाजपने थांबवल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.