
रायगडचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महायुतीमध्ये युती झाली नाही तर स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे.
गोगावले यांनी “सत्ता कोणाकडे आहे हे महत्त्वाचं नाही, जनतेच्या मनात कोण आहे हेच बळ” असे स्पष्ट केले.
या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि राजकीय समीकरणांवर चर्चेची जोरदार हवा निर्माण झाली आहे.
Raigad News : रायगडचे राजकारण सध्या शिंदे शिवसेनेचे नेते रोहयो मंत्री भरत गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या भोवती फिरत आहे. येथे सुरू असणाऱ्या पालकमंत्री पदाच्या वादानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून वाद सुरू झाला आहे. येथे अद्याप महायुतीकडून युतीबाबत कोणतीच घोषणा झालेली नाही. तोच राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून जिल्हा नेत्यांकडून स्वबळाची चाचपणी केली जात आहे. अशातच गोगावले यांनी जिल्ह्यातील महायुतीत युती झाली तर ठीक; अन्यथा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा! असे निर्देश शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. यामुळे आता रायगडमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
नुकताच गोगावले यांनी रायगडमधील वादाला थांबवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी दोन पावले मागे हटत राष्ट्रवादीकडे युतीसाठी हात पुढे केला होता. मात्र तटकरे यांनी आपल्यापर्यंत किंवा जिल्हाध्यक्ष यांच्यापर्यंत तसा कोणताच प्रस्ताव आलेला नाही, असे म्हणत टीका केली होती. यामुळे नंतर गोगावले नरमले, युतीसाठी राष्ट्रवादीकडे गेले अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
पण आता या सर्वच गोष्टींना मागे सोडत गोगावले यांनी तटकरेंच्या प्रमाणेच जिल्ह्यात राजकारण खेळण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे युतीचा प्रस्ताव पुढे करत दुसरीकडे तटकरेंना जोरदार धक्का दिला. त्यांनी तटकरे यांचे निकटवर्तीय विकास गायकवाड यांना शिवसेनेत घेत राष्ट्रवादीला सुरूंग लावण्याची रणनीती आखली. यामुळे आगामी स्थानिकच्या तोंडावर राष्ट्रवादीसह तटकरेंना मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली.
गोगावले यांनी आता युतीसह आगामी स्थानिकबाबत सुचक इशारा दिला आहे. त्यांनी जिल्ह्यात युती झाली तर ठिक अन्यथा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा! सत्ता कोणाच्या हातात आहे हे महत्त्वाचं नाही, जनतेच्या मनात कोण आहे हे महत्वाचं आहे. तेच आपलं बळ असल्याचे म्हटलं आहे.
ते श्रीवर्धन तालुक्यातील दांडा तरिबंदर समुद्रकिनारी सेल्फी पॉईंट व सुषोभीकरण प्रकल्प, तसेच जीवनेश्वर कोंड येथील संरक्षक भिंतीचे बांधकाम या महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमानंतर बोलत होते. यावेळी कोकणातील प्रत्येक किनाऱ्यावर पर्यटन व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जातील असे आश्वासन गोगावले यांनी श्रीवर्धनकरांना दिले आहे. तर आमचं ध्येय फक्त राजकारण नाही, तर विकासकारण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
युती होईल की स्वबळावर लढाई, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गोगावले यांच्या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण केलं आहे. तर त्यांच्या या दौऱ्याने श्रीवर्धनच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. यावेळी गोगावले यांनी, जनतेने आमच्या कामावर विश्वास ठेवला आहे. विकासाच्या बळावर आम्ही कोणासमोर झुकणार नाही, असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांची दिशा स्पष्ट केली.
केवळ सत्तेसाठी युती नको
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. काहीजण फक्त सत्ता मिळवण्यासाठी युती करतात, पण आम्ही जनतेच्या मनाशी युती केली आहे. विकासाच्या मुद्यावर आम्ही तडजोड करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील गटबाजी संपवून एकसंघ राहणे हाच विजयाचा मार्ग आहे. कोकणातील प्रत्येक कार्यकर्त्याने आता सज्ज होण्याची वेळ आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
1. भरत गोगावले यांनी काय विधान केले आहे?
गोगावले यांनी महायुतीत युती झाली नाही तर स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा असा इशारा दिला आहे.
2. हे विधान कोणत्या पार्श्वभूमीवर केले गेले?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आले.
3. त्यांनी कोणाला उद्देशून हा इशारा दिला?
हा इशारा महायुतीतील मित्रपक्षांना आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
4. या विधानाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले असून स्वबळाच्या चर्चेला वेग आला आहे.
5. गोगावले कोणत्या पक्षाचे नेते आहेत?
भरतशेठ गोगावले हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि मंत्री आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.