
Marathwada Political News : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभेतील विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचा फारसा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसला नाही. उलट त्यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड लोकसभेची जागा भाजपाच्या हातून निसटली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नांदेडसह राज्यात पानीपत झाले. मात्र यात अशोक चव्हाण यांचा किंवा त्यांच्या नेतृत्वाचा फारसा रोल नव्हता.
भोकर विधानसभा मतदारसंघातून मुलीला आमदार करण्यातच त्यांची शक्ती खर्ची पडली. त्यामुळे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना तसा भाजपाच्या संघटनात्मक बांधणीत फारसा उपयोग झाला नाही. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता अशोक चव्हाण यांनी टॉप गिअर टाकल्याचे चित्र आहे. भाजपाच्या संघटनात्मक निवडीमध्ये आपल्या समर्थकांची वर्णी लावत आधी स्वत:चा नांदेड जिल्हा बळकट करण्याच्या दृष्टीने चव्हाण यांनी तयारी सुरू केली आहे.
याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींची अधिकृत घोषणा होण्याआधी मराठवाड्यातील आपल्या काँग्रेस मधील जुन्या सहकाऱ्यांचा व इतर पक्षातील माजी आमदारांचा एक मोठा गट अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) येत्या 26 तारखेला नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या आधीच अशोक चव्हाण यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना भाजपाचे कमळ हाती घेण्याची गळ घातली आहे.
अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री, विविध खात्याचे मंत्री, खासदार, प्रदेशाध्यक्ष व पक्षाच्या केंद्रातील समितीवरही होते. त्यामुळे त्यांचा मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आमदार, खासदार व इतर पदाधिकार्यांशी कायम संपर्क होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याचा अनेकांना धक्का बसला असला तरी त्यांच्या या प्रवेशाची कुणकूण त्यांच्या जवळच्या समर्थकांना होती. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काँग्रेस खिळखिळी होईल, असे चित्र निर्माण झाले होते.
अशोक चव्हाण ताकद दाखवणार
मात्र कुठल्याही प्रकारची घाई न करता चव्हाण यांनी अत्यंत शांतपणे वाटचाल करत टप्प्या टप्प्याने काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना भाजपमध्ये आणून आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीत देगलूर- बिलोली मतदारसंघातून जितेश अंतापुरकर आणि भोकर या आपल्या हक्काच्या मतदारसंघातून कन्या श्रीजया चव्हाण यांना आमदार केल्यानंतर खऱ्या अर्थाने आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना भाजपमध्ये आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली अशा सगळ्याच जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांना मानणारा एक वर्ग आजही काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यात या आपल्या जुन्या समर्थकांना भाजपमध्ये आणून अशोक चव्हाण हे काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, पाथरीचे सुरेश वरपूडकर, गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित यांच्यासह सात ते आठ माजी आमदारांचा अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यात भाजपामध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्या दृष्टीने अशोक चव्हाण यांनी भेटीगाठींचा सिलसिला सुरू केल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी नांदेडमध्ये काही माजी आमदारांच्या भेटी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय नांदेडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांची अशोक चव्हाण यांनी स्वत: त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना भाजपा प्रवेशाची निमंत्रण दिल्याची चर्चा आहे. जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या पर्यायाच्या शोधात आहेत.
जालन्यात धक्का
भाजपचे जिल्ह्यातील नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सुरुवातीला त्यांनी पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केल्याचे बोलले जाते. परंतु दानवे यांनी त्यांना चुलत बंधु भास्कर दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम करावे लागेल. शिवाय कुठलीही शब्द दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले त्यामुळे गोरंट्याल यांनी आता रावसाहेब दानवे यांना बायपास करत थेट अशोक चव्हाण यांच्यामार्फत प्रयत्न सुरू केल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि त्यांची भेट झाल्याची देखील चर्चा आहे.
जालना नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत करण्यास गोरंट्याल यांचा कडाडून विरोध होता. मात्र रावसाहेब दानवे यांच्यासोबत असलेली त्यांची मैत्री देखील त्यांना कामाला आली नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने जालना नगर परिषदेला महापालिका करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जालन्यात सध्या कैलास गोरंट्याल यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. अर्जुन खोतकर हे पुन्हा आमदार झाल्यामुळे त्यांना जिल्ह्यात मोठा विरोधक निर्माण झाला आहे. अशावेळी महापालिकेतील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आधार गोरंट्याल यांना आवश्यक वाटतो आहे.
अशीच परिस्थिती मराठवाड्यातील काँग्रेसच्या अनेक आमदारांची आपापल्या मतदारसंघात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. तेव्हा काँग्रेस मधील या आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय बाजूला ठेवला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची झालेली दयनीय अवस्था पाहता या आमदारांची घालमेल कमालीची वाढली आहे. विरोधी पक्षात राहून काही हाती लागणार नाही याचा अंदाज आल्यामुळे किमान सत्ताधारी पक्षात जाऊन आपापल्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद दाखवून वर्चस्व कायम राखण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौर्यात काँग्रेसमधील या अस्वस्थ असलेल्या माजी आमदारांचा एक गट भाजपमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता असून त्याचे श्रेय अर्थात अशोक चव्हाण यांना जाईल. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे प्रवेश यशस्वी झाले तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांनाही स्थान दिले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. एकूणच गेल्या दीड वर्षापासून फारसे सक्रिय नसलेल्या अशोक चव्हाण यांनी आता मात्र टॉप गिअर टाकत 40 वर्षांचा राजकीय अनुभव पणाला लावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.