

Mumbai News : धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 13 मार्चला निवडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे आता सत्तास्थापनेबाबत हालचालीना चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे भाजपने, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन सदस्य सोबत घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यातच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भेट घेतली. त्यामुळे आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचा होणार हे आता निश्चित झाले आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील महायुतीचा फॉर्म्युला ठरविण्याबाबत आता सोमवारी धाराशिवमध्ये स्थानिक नेत्याची बैठक होणार आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीने बहुमत मिळवले आहे. मात्र, भाजपला (BJP) विरोध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तानाजी सावंत गट व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालीमुळे सत्तास्थापनेबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र, आता दुसरीकडे भाजपने तानाजी सावंत यांचा गट वगळून सत्तास्थापन करण्याचे समीकरण जुळवले आहे. भाजपचे 19, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, अपक्ष 3, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 असे 30 जणांचा आकडा गाठत भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे.
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे घडामोडीना वेग आला असून महायुतीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेत्यांनी शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते मल्हार पाटील उपस्थितीत होते. त्यासोबतच अपक्ष निवडून आलेले धनंजय सावंत हे सुद्धा यावेळी सोबत होते. त्यामुळे सत्तास्थपनेतील अडचणी दूर झाल्या आहेत.
धनंजय सावंत यांनी आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या विरोधात राजकीय बंड करून जिल्हा परिषद निवडणुक लढवली होती. ते बहुमताने निवडुन आले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजप, शिवसेना युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी तानाजी सावंत यांचा गट वगळता महायुतीचे सर्व जण एक झाले आहेत.
यावेळी शिवसेनेकडून शहापूर गटातून निवडून आलेले सदस्य सुनील बनसोडे यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली, बनसोडे यांच्यासह इतरांना भाजपने आपल्या गटात पळवून घेऊन गेल्याचा दावा तानाजी सावंत गटाने केला होता, त्यांना परत द्या नंतर बोलणी चर्चा करू, असे म्हटले होते. मात्र आता सर्वजण एक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचा होणार हे निश्चित मानले जात आहे. या पदासाठी भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांचे नाव आघाडीवर आहे.
सत्तास्थापनेचा फॉर्म्युला सोमवारी ठरणार
दरम्यान, या सर्व नेत्याच्या बैठकीत अध्यक्ष महायुतीचा होणार यावर एकमत झाले आहे. तर दुसरीकडे धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील महायुतीच्या फॉर्म्युलाबाबत सोमवारी स्थानिक नेत्यांची धाराशिवमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत भाजप व शिवसेनेतील सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने 'सरकारनामा'ला बोलताना दिली.
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी धाराशिवमध्ये बॅनरबाजी केली असून भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील झेडपीच्या अध्यक्षा होणार? असे बॅनर लावले आहेत. तर दुसरीकडे पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला असून 13 मार्चला बैठक बोलावली आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.