

Chhatrapati Sambhajinagar Suresh Patil Death Case : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराविरोधात कायदेशीर मार्गाने तक्रारी करणे आणि न्यायालयीन दाद मागणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी सदाशिव गायके यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या आत्महत्येनंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गायके यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल करण्यात आले. या कारवाईविरोधात गायके यांनी ॲड. एस. जी. लड्डा यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
सुनावणीवेळी ॲड. लड्डा यांनी पाटील यांच्या आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत गेल्या २० वर्षांपासून विविध केसेस व कायदेशीर कारवायांद्वारे मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. सुनावणीअंती याचिकाकर्ता आणि मृत व्यक्ती यांच्यात राजकीय मतभेद असले तरी कायदेशीर अधिकारांचा वापर करून केलेल्या तक्रारी किंवा न्यायालयीन कारवाईला केवळ त्या कारणावरून आत्महत्येस प्रवृत्त करणारी कृती म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. एस. जी. लड्डा यांनी बाजू मांडली. राज्य सरकारच्यावतीने एपीपी एस. बी. नरवडे, तर फिर्यादीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आर. एस. देशमुख, मीनल देशमुख व आर. आर. जयस्वाल यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने गायके यांच्याविरुद्धची फौजदारी कारवाई रद्द केली.
काय आहे नेमके प्रकरण?
२५ फेब्रुवारी २०१९ रोजी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी समर्थनगर येथील आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या खोलीत विषाची बाटली आणि एक पानी आत्महत्येची चिठ्ठी आढळली होती. न्यायालयीन कामकाज आटोपून पाटील घरी परतले. पत्नीला आपण थकलो असल्याचे सांगून ते खोलीत गेले. त्यानंतर त्यांनी विष प्राशन केले.
रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. सुरेश पाटील यांच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीत सदाशिव गायके आणि नाना पाटील यांच्या नावांचा उल्लेख होता. गेल्या २० वर्षांपासून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यात लिहिले होते. आत्महत्येच्या चिठ्ठीत गायके यांचे नाव आल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अॅड. सदाशिव गायके यांनी सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा बँकेच्या कारभारावर आक्षेप घेतले होते. ५२ सहकारी संस्थांचे सुमारे ८.५० कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याची तक्रार त्यांनी केली होती. या प्रकरणात पाटील आणि अन्य संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
गायकेंची भूमिका..
अॅड. गायके यांनी स्वतःवरील आरोप नाकारले होते. गायके यांच्या म्हणण्यानुसार, पाटील यांच्यावर जिल्हा बँकेतील भरती घोटाळा आणि अन्य प्रकरणांमुळे न्यायालयीन कारवाईची भीती होती. त्यामुळे त्यांनी कुटुंबातील सदस्यांना वाचविण्यासाठी आत्महत्या केली असावी, असा दावा गायके यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.