
Mumbai News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा लढा उभारणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (ता.25) पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा सरकारविरोधात लढाई छेडली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र उपसलं आहे. त्यातच आता त्यांनी थेट फडणवीसांनंतर भाजपमधील नंबर दोनच्या नेत्यालाच टार्गेट केलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागच्यावेळी आंदोलन,मोर्चे,बैठका,मेळावे,सभा यांमधून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्यानं शाब्दिक हल्ले चढवले होते. पण यावेळी त्यांच्या टार्गेटवर फडणवीसानंतर आता दुसरा भाजपचा बडा नेता असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आठ प्रमुख मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठवली. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावरच तोफ डागली. जरांगेंनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच फटकारलं आहे.
जरांगे पाटील म्हणाले, समाधान नव्हायला तुम्ही काय केले,फालतू बोलायचं नाही, आम्ही तुम्हाला सन्मानाने बोलतो, वाकड्यात शिरायचं नाही. तसा शहाणपणा इकडे नाही शिकवायचा, माजुरड्यासारखं बोलायचं नाही, अशा शब्दांत जरांगेंनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले.
मराठा समाजाच्या भावना सरकार समजून घ्यायला तयार नाही. तुमचा राजकीय विरोध असेल किंवा मतभेद असतील,पण गरीबांशी सूड भावनेने का वागत आहे अशी विचारणा करतानात त्यांनी सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी शिंदे नाहीच, शिवाय शिंदे समितीचे कामही बंद करून टाकले,ही कोणती पद्धत आहे, ही वागणूक चांगली नसल्याचंही जरांगेंनी यावेळी सांगितलं.
यावेळी मनोज जरांगेंनी मराठ्यांशिवाय महाराष्ट्रात कोणाचेही पानसुध्दा हालत नाही, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो,पण ही आमची हक्काची लढाई आहे, आता मुख्यमंत्री फडवणीस यांनी बेईमानी करू नये, आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आमची वर्चस्वाची लढाई नाही,आमचे समाजासाठी प्रामाणिक काम सुरू आहे,असंही जरांगे पाटील म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले,जरांगे पाटील यांचं हे सामाजिक आंदोलन आहे. सरकारने त्यांना न्याय दिला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे, आणि आम्ही त्यांना न्याय देणार आहोत. त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे. एवढे न्याय देणारे सरकार राज्यात कधीच आले नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं.
तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजासाठी अनेक बाबी केल्या आहेत, जरांगेंचे समाधान होईल, पण जर मनोज जरांगेंचे समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही. मराठा समाजाकरता ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी सवलती अन् आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे. अजूनही मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होत नसेल तर मग आता ते निर्णय घेतील त्यावर मी काही बोलू शकणार नाही अशी भूमिकाही मांडली होती.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यांसह इतर आठ प्रमुख मागण्यांसाठी सरकारविरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहेत. सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून त्याचा कायदा करण्यात यावा,थांबलेलं शिंदे समितीचं पुन्हा सुरु करावं,गॅझेट लागू व्हावं,मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, दीड वर्षांपासून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरसकट कुणबीतून आरक्षण द्या अशा मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.