
Dharashiv News : पालकमंत्री झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिवला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन सोहळ्यासाठी आले होते. त्याचवेळी काही घोषणादेखील त्यांनी यावेळी केल्या. राजकीय घडामोडींवर वेगवेगळी विधाने करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे पुढे काय होते ते. धाराशिव जिल्ह्यातदेखील काही बदल झाला तर तुम्हाला वेगळे काही वाटायला नको, असे विधान त्यांनी केले होते.
धाराशिवमधील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील महायुतीसोबत जातील, असा आशावाद व्यक्त केला जात असतानाच. शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ची खिल्ली उडविताना ओमराजेंनी धाराशिवमध्ये यवतमाळहून आलेला वाघ आधी पकडा, असा टोला लगावला.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही दिवासांपूर्वी प्रसार माध्यमाशी बोलताना राज्यात ऑपरेशन टायगर व ऑपरेशन धनुष्यबाण सुरु असल्याचे सांगितले होते. या माध्यमातून राज्यातील अनेक आमदार, खासदार शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्याच अनुषंगाने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सत्ताधारी मंडळींच्या आरोपाचा समाचार घेतला.
बालाघाटमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून यवतमाळमधील टिपेश्वर जंगलातून आलेल्या वाघाचे वास्तव्य आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यतील शेतकरी भयभयीत झाले आहेत. तो वाघ अद्यापही वन विभागाला सापडला नाही. त्यामुळे, आधी यवतमाळच्या वाघाला पकडा, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांना लगावला.
उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार आणि शिवसेना फुटणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतरच ऑपरेशन टायगरची बातमी पेरण्यात आली असल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांनी केला. या 'ऑपरेशन टायगर'ची खिल्ली उडवताना ते म्हणाले 'इथं यवतमाळहून आलेला वाघ हिंडायलाय तो आधी पकडा, ते ऑपरेशन टायगर करा. त्याच्यासोबतच दोन बिबटे आलेले आहेत,' असा मिश्कील टोला ओमराजे यांनी लगावला आहे.
सध्या संघर्ष आणि संकटाचा काळ आहे, या काळात आम्ही पक्षासोबतच आहोत. माझ्या भूमिकेबद्दल कोणीच काही शंका घेण्याचे कारण नाही. आम्ही ज्याठिकाणी आहोत त्याठिकाणी खंबीरपणे खुट्टा रोवून उभे आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाला पात्र राहून एकनिष्ठपणे काम करीत राहणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे शिवसेना पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबतच एकनिष्ठ राहिले. तर लोकसभा निवडणुकीत ओमराजे राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. तर, आमदार कैलास पाटील हेही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे या दोघांनी येत्या काळात कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.