
Congress News : लोकसभेच्या जालना मतदारसंघातून भाजपाच्या प्रस्थापित उमेदवाराचा पराभव करून विजयी झालेले काँग्रेसचे खासदार कल्याण काळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पाच वर्षापुर्वी छत्रपती संभाजीनगर काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेल्या काळे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने सोपवली होती. गेल्या पंधरा वर्षापासून जिल्ह्यात काँग्रेसला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यश मिळालेले नाही. तरीही पक्ष श्रेष्ठी संघटनात्मक बदल करण्यास तयार नाहीत.
एक पक्ष एक पद याला तर सगळ्याच पक्षांनी हरताळ फासला आहे. त्याला काँग्रेस देखील अपवाद नाही. कल्याण काळे (Kalyan Kale) खासदार असतांना त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदही कायम आहे. त्यांनी स्वतःही ते सोडले नाही आणि पक्षातील वरिष्ठांनीही याबाबत निर्णय घेतलेला नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका पाहता खासदार काळे जिल्हाध्यक्ष पद सोडतील आणि नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, अशी चर्चा आहे.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण काळे यांनी भाजपाचे पाच टर्म खासदार राहिलेल्या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव केला. काळे यांच्या या विजयाची चर्चा राज्यभरात झाली. (Congress) पण निवडणूक होऊन दहा महिने उलटून गेले तरी जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांचे निमंत्रण खासदार म्हणून काळे यांना दिले जात नाही. भोकरदन येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा नामकरण सोहळा असो की मग भोकरदनचे तहसिलदार अध्यक्ष असलेल्या मतदारसंघातील राजूर देवस्थानच्या धार्मिक कार्यक्रम. काळे यांना ना निमंत्रण पाठवले जाते ना त्यांचे नाव पत्रिकेत असते.
अर्थात यावर काळे यांनी आक्रमक भूमिका घेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा संबंधित यंत्रणेला दिला होता. भोकरदन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी काळे यांची माफी मागत आपली सुटका करून घेतली. भोकरदनच्या तहसिलदारांनी नेमके काळेंना काय उत्तर दिले याची आता उत्सूकता आहे. एकीकडे खासदार झाल्यावर मतदारंसघातच काळे यांना डावलले जात आहे, तर दुसरीकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद ते सोडत नसल्याने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.
जून 2020 मध्ये कल्याण काळे यांच्याकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी मंत्री पैठणचे अनिल पटेल यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार देण्यात आला होता. तर कल्याण काळे हे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
पाच वर्षापुर्वी पक्षाने काळे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून ते कार्यरत आहेत. दरम्यान, झालेल्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात फार काही प्रभावी कामगिरी करता आली नाही. 2024 मध्ये जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाला, स्वतः काळे विजयी झाले. त्यामुळे पक्षाला जिल्ह्यात अच्छे दिन येणार अशी अपेक्षा होती. पण विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी पलटवली आणि काँग्रेस जिल्ह्यात पुन्हा शून्यावर आली.
एकमेव फुलंब्री मतदारसंघाची जागा पक्षाच्या वाटेला आली होती. कल्याण काळे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले असल्यामुळे आणि ते जिल्ह्याचे विद्यमान खासदार झाल्याने ही जागा काँग्रेस जिंकेल, असा विश्वास काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना होता. पण इथेही काँग्रेसचा पराभव झाला, आता या पराभवाच्या कारणांमध्ये काळे यांची मतदारसंघावरील सैल झालेली पकड हे देखील एक कारण असल्याचे सांगितले गेले. काळे यांना मतदारांनी दिल्लीत निवडून पाठवले आहे. तेव्हा त्यांनी आता जिल्हाध्यक्ष पद नव्या नेतृत्वाच्या हाती सोपवावी, अशी अपेक्षा स्थानिक काँग्रेसकडून केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.