

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गत चार-पाच दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रानंतर या घडामोडींना सुरुवात झाली आहे. या पत्रामुळे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पक्षातील मोठी जबाबदारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पटेल-तटकरे नाराज असल्याचे वृत्त पुढे आले आहे.
त्यातच सुनेत्रा पवार यांनी ट्विटरवरून या पत्रात काही तांत्रिक चुका असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मात्र या सर्व प्रकारानंतर पटेल-तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना 'योग्यवेळी बोलेन' असं म्हणत तटकरे यांनी सूचक विधान केले. त्यामुळे पटेल-तटकरे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत? आहेत का अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदासोबतच सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सुत्रे आपल्या हाती घेतली. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुढे येत आहे. नुकतेच निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यालयातील यादीतून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे नाव अनुक्रमे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय महसचिव म्हणून नाव वगळल्याने वादाला तोंड फुटले आहे.
यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या दोघांना पक्षातून साईडलाईन करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सुनेत्रा पवार यांची या दोन्ही नेत्यांवर खप्पामर्जी झाल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच नाराज असलेले सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी अचानक 12 मे रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. मात्र, त्याचदिवशी प्रफुल पटेल हेदेखील शरद पवार यांना भेटून गेले होते, अशी नवीन माहिती शनिवारी समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही १२ मे रोजी आसाममधील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी गुवाहाटी येथे गेले होते. यावेळी सुनेत्रा पवार यादेखील गुवाहाटीत होत्या. मात्र, परत येताना सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानातून येणे पसंत केले.
12 मे च्या रात्री सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या दोघांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे उघड झाले आहे. प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची वेळ घेतली होती. ऐनवेळी सुनील तटकरे भेटीसाठी पोहचल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत तिन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
या दरम्यानच शनिवारी सुनील तटकरे यांनी मोठे विधान केले. माझा 42 वर्षाचा राजकीय प्रवास आहे, ज्यावेळी बोलायचे त्यावेळी मी बोलेल. मला राजकीय बोलायचे त्यावेळी मी नक्की बोलेल. माझा गेल्या 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत करायचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाचे प्रमुख नेते आम्ही एकत्र बसून त्यातून मार्ग काढू. आमचे धोरण एनडीएमधील आहे. आम्हाला एनडीए मजबूत करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करायचा आहे. त्याकरिता प्रफुल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, वळसे पाटील असतील आणि छगन भुजबळ असतील आम्ही एकत्रपणे बसू. प्रत्येकवेळी राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात, असेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दाैऱ्यावर असताना त्यांनी तटकरे यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे, हे समजत नाही. त्यातच या पूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे दोनवेळा पंख छाटले आहेत. त्यामुळेच पटेल-तटकरे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत? असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.