

Kolhapur News : इचलकरंजी महानगरपालिका घोषित झाल्यानंतर यंदा पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचा त्यावर डोळा आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणुकीची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीचा शड्डू ठोकला आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असल्याने कमी कालावधी लक्षात घेऊन मंगळवारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत.
भाजपकडे इच्छुकांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे बंडखोरीचा धोका त्याहून अधिक आहे. त्यामुळे सुरवातीपासूनच भाजप या निवडणुकीत ताक देखील फुंकून पित असल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे इचलकरंजी महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीचे चर्चा सुरू आहे. मात्र सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस या चर्चेपासून दूर असल्याचे चित्र आहे.
शहरात सध्या भाजप (BJP) तसेच महाविकास आघाडीतील अनेक जागांवरील उमेदवारी अजूनही गुलदस्त्यातच आहे. उमेदवारी निश्चित न झाल्याने इच्छुकांमध्ये कमालीची धाकधूक निर्माण झाली आहे, तर पक्षाकडून राजकीय दबावतंत्र आणि अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, भाजपकडून इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याने उमेदवारी जाहीर करण्यास पक्षनेते सावध भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
तज्ज्ञांच्या मते, घाईघाईने उमेदवारी जाहीर केल्यास नाराज इच्छुक उमेदवार बंडखोरी किंवा फुटीचा डाव खेळू शकतात. याची भीती भाजप नेतृत्वाला सतावत आहे. त्यामुळेच उमेदवार निश्चिती मुद्दाम लांबवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडी (MVA) व इतर मित्र पक्षही सध्या संयमाची भूमिका घेताना दिसत आहेत. भाजपमधील संभाव्य नाराज उमेदवार किती प्रमाणात गळाला लागतात, याची चाचपणी करण्यासाठी आघाडीकडून अद्याप उमेदवारी जाहीर न केल्याचे बोलले जात आहे. भाजपमधील नाराजीचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी आपली राजकीय खेळी आखत असल्याचे संकेत मिळत आहेत.
एकंदरीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय वातावरण अनिश्चित बनले आहे. उमेदवारी निश्चिती, युतीचे गणित, नाराजांची भूमिका आणि स्थानिक प्रभावी चेहरे या सर्व घटकांवरच आगामी निवडणुकीचे राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या घडामोडींनी महापालिका निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार आहे. पक्ष नव्हे, उमेदवार महत्त्वाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षापेक्षा उमेदवाराचा थेट जनसंपर्क, सामाजिक कामकाज आणि स्थानिक विश्वास याला अधिक महत्त्व असते.
या निवडणुकांत उमेदवार थेट नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने पक्षाची भूमिका दुय्यम ठरत असल्याचे चित्र अनेक वेळा दिसून आले आहे. याच कारणामुळे भाजपमधील नाराज गट जर महाविकास आघाडीच्या पारड्यात गेला तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजप सध्या अत्यंत दक्ष व सावध भूमिका स्वीकारताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.