

माजी आमदार राजन पाटील यांनी उमेश पाटील यांना स्वतःच्या निर्णयाने उमेदवारी दिली होती, शरद पवार किंवा अजित पवार यांच्या आदेशावर नव्हे, असे स्पष्ट केले.
त्यांनी आरोप केला की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुसुत्रतेचा अभाव आणि बेशिस्तपणा वाढल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे.
राजन पाटील यांनी उमेश पाटलांना आव्हान दिले की “मतदारसंघ निवडा, माझ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्याला उभा करेन. जनतेचा पाठिंबा कुणला किती आहे, हे त्यावेळी कळेल. ’’
Solapur, 02 November : जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत तिकिट वाटपावेळी ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे आमच्यापासून दूर गेले होते. आम्हाला पुढची आमदारकी आणायची होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा होता, त्यामुळे एक नवीन चेहरा म्हणून मीच उमेश पाटील यांना नरखेडमधून उमेदवारी दिली होती. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी द्या, असे कधीही सांगितले नव्हते. आता उमेश पाटलांनी मतदारसंघ निवडावा, आमचा तिसऱ्या फळीतील कार्यकर्ता मी त्यांच्यासमोर उभा करेन. जनतेचा आशीर्वाद कोणाला आहे, हे त्यावेळी कळेल, असे सांगून माजी आमदार राजन पाटील यांनी उमेश पाटलांना चॅलेंज दिले.
राजन पाटील (Rajan Patil) म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आमची कोणतीही चर्चा झाली नव्हती. पण, सहा महिन्यांपूर्वी किंवा वर्षभरापासून सोलापूर जिल्हा आणि मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेशिस्तपणा आला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुसुत्रता नाही. हे पक्षाला हानीकारक ठरू शकते, हे आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना वेळोवेळी सांगितले होते. मात्र, त्यांनी त्याची फारशी दखल घेतली, असे मला वाटत नाही.
गाडीखाली चालणाऱ्या कुत्र्याची उपमा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेश पाटील (Umesh Patil) यांना नाव न घेता दिली होती. मात्र त्याच उमेश पाटील यांना पुन्हा गाडीत घेतले. त्याबाबत कदाचित आम्हीच कमो पडलो असेल, असंच मी समजतो. मोठ्या माणसांचं चुकलं किंवा बरोबर आहे, असे मी म्हणणार नाही. कदाचित आम्ही अजितदादांच्या विश्वासाला पात्र राहिलो नसावं. त्यामुळे त्यांना कदाचित गाडीत घेतलं असेल, असे माजी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आपल्याचा पक्षाच्या आमदाराला पाडणाऱ्यांना पक्षाचं जिल्हाध्यक्ष देण्यात आलं. त्यामुळे पक्षात शिस्त राहिली नाही, असं मी प्रत्येकाला सांगतोय. भारतात असा पहिला पक्ष असेल की जिथं पक्षाचा उमेदवार विरोधकांच्या व्यासपीठावर जाऊन पाडण्याचा प्रयत्न केला. त्याला बक्षीस म्हणून जिल्हाध्यक्ष करण्यात आलं.
विशेष म्हणजे आपलं पक्षनेतृत्व माणसं ओळखायला अपुरं पडतंय, असं माझं मत झालं. कारण जेव्हा त्यांची (उमेश पाटील) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हा ते गृहस्थ बाकीच्या सगळ्या पक्षांकडे जाऊन आले. कुठल्याही पक्षाने त्याला आपल्याकडे घेतलं नाही, म्हणून ते निवांत बसले आणि पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले.
जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत तिकिट वाटपावेळी मोहोळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे हे आमच्यापासून दूर गेले होते. आम्हाला पुढची आमदारकी आणायची होती. पक्ष वाढवायचा होता. त्या वेळी मी एकटाच असल्याने कदाचित तालुक्यातील सर्व वातावरण गढूळ होईल. त्यासाठी एक नवा चेहरा आहे; म्हणून उमेश पाटील यांना मी नरखेडमधून तिकिट दिलं. त्यासाठी शरद पवार किंवा अजित पवार यांनी मला कधीही उमेश पाटील यांना तिकिट द्या, असं सांगितलं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढावा, संघटना मोठी व्हावी म्हणून मी प्रामाणिकपणे त्यांना नरखेडमधून तिकिट दिलं होतं, असेही त्यांनी नमूद केले.
राजन पाटील म्हणाले, माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी उमेश पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. मला आमदारकी महत्वाची होती. आमदारकी जिंकण्यासाठी बेरजेचे राजकारण करायचं म्हणून कोणतेही डावपेच न करता सरळमार्गाने मी त्यांना उमेदवारी दिली होती. निवडून आणण्याचे काम आम्हीच केलं होतं. आता जर त्यांना कुठं उभं राहायचं असेल, तर त्यांनी मतदारसंघ निवडावा. मी माझ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ता त्यांच्यासमोर उभा करेन आणि जनतेचे मतं, आशीर्वाद कोणाला आहे, ते त्यावेळी जनता दाखवून देईल.
Q1. राजन पाटील यांनी उमेश पाटलांना उमेदवारी का दिली होती?
A1. राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार आणि नवीन चेहरा पुढे आणण्यासाठी त्यांनी उमेश पाटलांना तिकीट दिलं होतं.
Q2. उमेश पाटलांच्या निवडणुकीबाबत शरद पवार किंवा अजित पवार यांचा काही निर्देश होता का?
A2. नाही, राजन पाटील यांच्या मते त्यांना कोणताही निर्देश देण्यात आला नव्हता.
Q3. राजन पाटील यांनी पक्षात शिस्त नसल्याचे का म्हटले?
A3. कारण विरोधकांच्या व्यासपीठावर जाणाऱ्या कार्यकर्त्यांनाच जिल्हाध्यक्ष बनवले गेले, असे त्यांनी सांगितले.
Q4. राजन पाटील यांनी उमेश पाटलांना कोणते आव्हान दिले?
A4. त्यांनी म्हटले की, “उमेश पाटलांनी मतदारसंघ निवडावा, मी माझ्या कार्यकर्त्याला उभा करेन आणि जनता कोणासोबत आहे ते ठरेल.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.