

Manoj Jarange Patil: ''माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. असं छक्के पंजे तुम्ही करू नका. मी तुमच्या हाताला कधीच लागणार नाही. तुमचा कधी न होणारा देव्हारा होईल, तुमचं न होणार वाटोळ माझ्या हातून होईल, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनाकारण माझ्या नादी लागू नये.''अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जरांगे पाटील कोल्हापुरात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या न्यू पॅलेस या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी मराठा आरक्षण मागणी संदर्भात मराठा गॅजेटचा विचार करण्यासाठी गॅजेटची प्रत त्यांना भेट देण्यात आली.
"मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील, आमदार लाड यांच्या माध्यमातून जी गरिबांची कामं करत आहेत ती करावी, याआधी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी केली, पुढच्या काळात मुख्यमंत्र्यांनी करावे. आमचं आणि मुख्यमंत्र्यांचे वैर नाही. मराठा समाजाशी वैर म्हणून वागू नये, आई अंबाबाईच्या पवित्र भूमीतून मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. आमचं तुमचं वैर नाही, मराठ्यांवर अन्याय करून वैर घेऊ नका. आता जर तुम्ही काम केलं नाही तर मराठ्यांचा रोष भयानक अवघड असणार आहे, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. चांगलं काम करा, राजकारणाची आम्हाला गरज नाही. मराठ्यांपुढे सरकारचं शहाणपण चालत नाही. आज आई अंबाबाईचे दर्शन घेतलं. सरकारला सद्बुद्धी दे असं साकडं घातलं. शेतकरी संकटात आहे. पाऊस लवकर पडू दे यासाठीही अंबाबाई चरणी प्रार्थना केली" असेही जरांगे म्हणाले.
"कोल्हापूर आपली राजगादी आहे. आपण कधीच विसरत नसतो. मी असं कधीच होऊ देणार नाही. खासदार शाहू महाराज साहेबांनी हाक द्यावी आणि आम्ही उभ राहावं. उपोषण संपल्या संपल्या लगेच महाराज साहेबांना भेटायला आलो. आता सातारा गॅझेट घेत आहेत. कोल्हापूर बाबतपण अभ्यास सुरू आहे" असे म्हणत, खासदार शाहू महाराजांशी चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे हे सरकारला सांगणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
''याआधी सरकार आम्हाला नक्कीच फसवत गेलं. मात्र आता थोडासा विश्वास बसला आहे. सरकारने आतापर्यंत शासन निर्णय, ५८ लाख कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटप करणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे, आरक्षण आंदोलनात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत, आंदोलनातील गुन्हे मागे घेतलेत यामुळे थोडासा विश्वास बसला आहे. विश्वास ठेवणं आमची जबाबदारी याचा अर्थ असा नाही वाटोळं केलं तरी शांत बसेल. एखादी गोष्ट दिली तरी आभार मानणाऱ्यातला मी नाही. फसवलं तर सोडणार सुद्धा नाही. तुम्ही दगा फटका केला तर आंदोलन करण्याऐवजी आम्ही २०२९ ची तयारी करू, आम्ही १०० टक्के पाडू" असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला.
मुख्यमंत्री फडणवीस माझे वेगवेगळे विरोधक पुढे आणून काय साध्य करणार आहेत, तुम्ही माझ्यावर आरोप करताय मात्र तुम्ही लोकांना काय दिलं असा माझा विरोधकांना सवाल आहे. आपलेच असून माझ्यावर टीका करणार असाल तर लाज वाटते माझ्या समाजाचा तुम्हाला म्हणण्याची. यश येईल की नाही माहित नाही. मात्र लढत राहिले पाहिजे अशी माझी भूमिका आहे. माझ्या विरोधात कितीही टीका केली तरी मी थांबणार नाही. समाजातील मुलांना अधिकारी झालेलं मला पहायचं आहे. अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.